मंगळवार, १ डिसेंबर, २००९

नवआयुष्याचे गीत गाऊ

सध्या लग्नाचा मौसम सुरू आहे. डिसेंबर मध्यापासून तर जानेवारी मध्यापर्यंत.. एक महीना विवाह-मुहूर्त नाहीत म्हणे त्यामुळे तर फारच ज्यास्त धूम सुरू आहे लग्नांची. नोव्हेंबर च्या शेवटच्या दोन आठवड्यात ३-४ लग्नांसाठी पुण्याला जायचा योग आला. सगळ्या लग्नपत्रिका समोर होत्या.... एप्रिलमधील आमच्या मुलांच्या लग्नाच्या आठवणी एकदा पुन्हा जाग्या झाल्यात. ह्या सगळ्या नवदांपत्यांना शुभेच्छा द्याव्यात आणि हे सुंदर चित्र समोर होतेच तर ह्या कवितेने त्या चित्राला सजवले इतकेच काय ते.....





















दीपिका 'संध्या'

शनिवार, १४ नोव्हेंबर, २००९

आनंदाची बरसात....

सप्टेंबर महिन्यात काही कामाने पुण्याला जायचा योग आला. त्याच दरम्यान अमेरिकेला वेगळेच वारे वाहत होते. तिथली आमची चारही मुलं वेगळ्याचं विचाराने व्यापले होते. सध्याच्या परिस्थितिचा फायदा घेऊन मोठ्या मोठ्या बंगल्यांचे मालक होण्याचे मनांत घोळू लागले होते. बने-बनाए घर घेण्याची पद्धत, त्यामुळे नेट वर शोधाशोध सुरू होती. साधारण महिन्याच्या प्रयत्नांना यश आले आणि रुचिर-प्राची आणि शिशिर-लीनू जोडीने आपापली घरं कोणती असणार ह्यावर शिक्कामोर्तब केले.
नोव्हेंबर मधे राहते घर सोडायचे असल्यामुळे वेळेचा अभाव होताच. उत्साहात वास्तुपुजा लवकर करू दिवाळीच्या सुमारास असे त्यांचे मत होते. सगळ्यांचेच आई बाबा असावेत ह्या खुशी मधे सहभागी होण्यास असे वाटणे साहजिकच आहे. कोणाचाच विचार ठरला नव्हता.

जेंव्हा जमेल तेंव्हा मुलांची घरे बघायला जाऊच ह्या विचाराने मुलींना विचारून नेहमीप्रमाणे पुण्याहून आणायच्या सामानाची यादी हनुमानाचे शेपुट बनत चालली होती. काही आठवल्यास पुण्याला फोन करून बिनधास्त कळवा असे सांगून आम्ही पुणे गाठले. ३-४ दिवसांच्याच वास्तव्यात बर्‍याच कामांचा उरका पाडायचा होता. पुण्याला जायच्या आधीच अमेरिकेचे पक्के ठरवावे असे माझे मत होते आम्ही २० सप्टेंबर ला जाऊन २६ सप्टेंबर ला परत येणार होतो. व अमेरिकेला जायचेच असेल तर अगदी १ ऑक्टोबरला निघणे होते. पण ह्यांच्या सुट्टी प्रकरणात तसे होऊ शकले नाही. डामाडोल परिस्थितिमधे अमेरिका वारी होऊ शकेल की नाही....सगळेच प्रश्नचिह्न होते. चौघा मुलांना मनांची तशी तयारी ठेवायला सांगितली होती की येणे जमले तर मज्जा.. नाही तर चौघे मिळून वास्तु पुजा करून घ्यावी लागणार...व लगेच जसे जमेल तशी चक्कर तर मारणारच होतो तिकडे त्यामुळे पुणे खरेदीला उधाण आले होते.

भरपुर खरेदी करून मोठ्या मोठ्या बॅगा भरून आम्ही पुण्याहून २६ सप्टेंबर ला ठरल्याप्रमाणे परतलो. अजूनही काही ठरवता येत नव्हते. २९ तारखेला शेवटी तिकीट घेतलं व आमचा प्रवास कॅन्सस च्या दिशेने १ ऑक्टोबर ला रात्री KLM ने सुरू झाला. २ ऑक्टोबर ला संध्याकाळी कॅन्सस ला पोहोचलो. चौघेही गाड्या घेऊन आमच्या स्वागताला तयारच होते. कॅन्सस विमानतळ जरा छोटे असल्यामुळे थेट आत येता येतं तर आंतच मिठ्या मारून झाल्यात एकदम. ५ महिन्यांनंतर आमची व आमच्या चारही मुला-मुलींची भेट होती ही. माझ्या फिरक्यांना सुरूवात झाली......(कदाचित जोड्या ह्याची वाटच बघत असतील...कुठेतरी गुदगुल्या होतातच नं फिरक्यांनी...आवडतं... पण सांगणार कसं नं....)

खरं तर अमेरिकेच्या मानाने मी म्हणेन की खूपच लवकर योग आला होता. आत्ता आमच्या जाण्यामागचे खरे कारण तर त्यांनी घेतलेली घरे बघायला जाणे हाच एकमेव होता. अन्यथा विचार झाला असता की नाही...सांगता येत नाही. वेळ अशी मस्तं साधली गेली होती की वास्तु पूजा आणि दिवाळी मुलांबरोबर घालवता येणार होती.

इथून निघायच्या आधीच सर्वानुमते असे ठरवले होते की जितके दिवस आम्ही तिथे आहोत (बरोबर २० दिवस) तेव्हढ्यात अर्धे दिवस शिशिर-लीनू कडे आणि अर्धे दिवस रुचिर-प्राची कडे सगळ्यांनी मिळून रहायचे. कारण लग्नानंतरचा मुलींचा सहवास आम्हाला खास हवा-हवासाच होता. त्यामुळे ठरल्याप्रमाणेच सगळे घडले.














५ ऑक्टोबर, सोमवारी शिशिर-लीनू च्या घराची वास्तुपूजा झाली. सामान सगळे आधीच नेऊन ठेवले होते. ...नटून-थटून.. ह्या जोडीने फुलांचे तोरण, दारांत सुंदर रांगोळी अशा सजलेल्या घरात प्रवेश केला. होम-हवन करून पूजा यथासांग तिथल्या गुरुजींनी साधारण २ तासांत साध्य केली. सगळा साग्रसंगीत स्वयंपाक करून आमची जेवणे झालीत. सुट्टीचा दिवस नसल्यामुळे व अपरिहार्यतेमुळे रुचिर ला ऑफिसमधे जाणे होते. म्हणून जेवणे जरा विभागून केली गेली हीच खंत.... संध्याकाळी तेथील मंदिरात जाऊन सगळ्याच देवांचे दर्शन घेतले.

मंगळवारपासून रुचिर शिशिर सकाळी डब्बा घेऊन ऑफिसला रवाना होत असत की आम्ही दोघे आणि आमच्या मुलींचेच राज्य... खूप गप्पा-टप्पा.. त्यांचे लहानपण, शाळा कॉलेज.... मैत्रिणी..... रुचिर शिशिर चे लहानपण.....खूप विषय होते बोलायला. ३-४ दिवस कधी नाश्ता राहून गेला तर कधी आंघोळीला उशीर झाला...कोणालाच भान राहत नसे....उरलेल्या वेळांत थोडे फार घर लावण्याच्या कामांला पण लागत असू. मागच्या पॅटिओ मधे सोफा ठेवा, झूला लावा.....पाऊस आला आला... त्या सोफ्यावरील गाद्या उचला उचला....धम्माल एकदम...शनिवारी संध्याकाळी बारबीक्यू करायचे ठरले. थंडी म्हणते मी पण काय तो उत्साह सगळ्यांनाच... थंडी मुळे सगळे त्या भल्या मोठ्या बारबीक्यू च्या अवती-भवती उभे....पण मधे मधे आम्ही मात्र दूर पळत होतो कारण त्या लॉन्ग कोट ची मज्जा आम्हाला दोघांना घ्यायची होती..नाही तर तो घालणार कधी हो...कौतुकाने मुलांनी आणुन दिलेल्या त्या कोटांचा तिथे त्या एकच दिवशी खूप उपयोग झाला... तरी इतक्या थंडीत तो मस्तं गरम आल्याचा चहा घेतांना काय मज्जा आली असेल सगळ्यांना म्हणून सांगू...घराचे आवार भलतेच मोठे... त्यात असलेली झाडे फॉल सीजन मुळे लाल पिवळे रंग बदलतांना दिसत होती.... सोमवारी दारासमोरचे झाड हिरवे कंच होते.....रोज फोटो घेऊन त्या झाडाचे बदलते रंग कॅमेर्‍यामधे टिपले आहेत.....शुक्रवार पर्यंतच्या ४ दिवसांत ते झाड रंग बदलून पूर्ण लाल झाले होते...काय निसर्गाची किमया असावी...

तळघरांत व बैठकीमधे सोफे ठेवून बसण्याची सोय खूपच गमतीदार वाटते. भला मोठ्टा टीवी वगैरे म्हणे फक्त तळघरांतच जाऊन बघायचा. बैठक सोडून बाकी.. स्वयंपाकघर, झोपायच्या खोली...सगळ्यादूर वेगवेगळे टीवी स्थानापन्न झालेले आहेत...आहे नं गमतीदार...सगळीकडे जीनेच जीने... मस्तंच एकदम...

११ ऑक्टोबर रविवारी रुचिर-प्राची च्या घराचा वास्तु ठरला होता. शनिवारी मोठ्ठा ट्रक आणून जुन्या घरून सामान हलविण्याचे काम करायचे होते. ट्रक रुचिर ने चालवला पण बाकी आम्ही सगळ्यांनी मिळूनच केले...असा काय तो वेळ लागणार होता..
संध्याकाळी बाहेर जाणे, घरचे सामान तर कधी बाकी काही खरेदी चालत असे. ११ तारखेच्या वास्तुची पण तयारी झालीच होती. शिशिर-लीनू कडे रोज काही तरी नवीन पदार्थांची फर्माईश असायची...कधी मुली बनवत असत कधी मी....थट्टा-मस्करी मधे कोणीच कुणाला पुरे पडत नसत...सगळेच बरोबरीचे, बोलण्यास धरबंध नसल्यासारखेच करत होतो, त्यात आगळे-वेगळेपण होतेच......नात्याची सीमा न ठेवण्यात मला यश आल्यासारखे त्या क्षणी वाटत असे. मी त्या चौघांची 'ए आई' आणि हे त्या चौघांचे 'बाबा' होतो.


११ ऑक्टोबर ला सकाळी रुचिर-प्राची ने छान तयार होऊन सजलेल्या घरात गृहप्रवेश केला. वेळेत पुजा पण आटोपली. जेवणाचा बेत श्रीखंडाचा होता. सुट्टी असल्यामुळे ह्या पुजेला जेवणाचा आस्वाद आम्हाला सगळ्यांना मिळून घेता आला. संध्याकाळपर्यंत सगळी आवरासावर करून निवांत बसता-बसताच मंदिरात दर्शनाला जायची वेळ आली. खूप प्रसन्न वाटतं मंदिरात सगळ्या देवांच्या दर्शनाने आणि तेथील संध्याकाळच्या आरतीने.
ह्या घरी तर ज्याला पॅटिओ म्हणतात तसे दोन आहेत... एक स्वयंपाकघराला व दुसरा बैठकीला लागून. तिथे पण सोफा, झूला...सगळे सेट केले गेले. इथे मागच्या व पुढच्या मोठ्या अंगणात भली मोठी झाडे आहेत. रंग बदलण्याची मजा इथे पण आम्ही घेतच होतो सगळे... इथे पण बारबिक्यू चा भरपूर उपभोग घेतला...रात्र झाली होती पण तितकीच ती रंगली होती.
रुचिर-प्राची चे घर गारमिन पासून खूपच जवळ आहे. गाडीने ३ मिनिटांचा रस्ता...बस... तर इकडे होतो तितके दिवस रुचिर शिशिर एकाच गाडीने ऑफिसला फक्त नाश्ता करून जात व १ वाजता गरम डब्बा घेऊन दुसर्‍या गाडीने आमची चौकडी जात असे. घरून निघतांना फोन करून त्यांना ह्या मुली येण्याची सुचना देत व आम्ही तिथे पोहोचपर्यंत दुक्कल खाली हजर असे. त्या दोघा-दोघांची डब्बा देऊन थोड्या प्रेमबोलांची देवाण-घेवाण.. आम्ही दोघे गाडीतच बसून कौतुकाने बघत बसत असू.. घरी जाऊन आमचे जेवण होईपर्यंत गारमिन मधून दोन मोबाईल वर त्यांच्या त्यांच्या राण्यांना फोन हजर.... ''वॉव..काय जेवण झक्कास होतं आजचं....हेहे...'' आता डब्बा कोणी दिला त्यावर गोडी वाढणारच नं....अरे...अरे....आता पुढे ज्यास्तं सांगणे न लगे...

१६-१७ तारखेला दिवाळी मनवली. दोन्ही घरी पुजा, संध्याकाळी दिवे लावणे, आरती... सगळ्यांचे छान तयार होणे आणि मग दोन्ही घरी आमचे फोटो काढायची प्रक्रिया बरीच लांबत लांबत लांऽऽऽऽऽबत गेली. कारण असा योग पुन्हा कधी येणार नं... घर नवीन.. तिकडची घरे वेगळीच...खूपच धम्माल...ह्या जिन्यात..त्या जिन्यात....असे बसू...तसे उभे राहू.....ओफ......





निघायच्या एक दिवस आधी अचानक हवा खूपच छान झाली, ऊन पडले...अहाहा!!!





तसेही शनिवारी बारबिक्यू करतांना रात्रीच ठरले होते की उद्या... रविवारी सुट्टीच्या दिवशी दिवसभर फिरून यायचे. ३ दिवसांचा बेत आधी ठरवून ठेवलेला होता चौघाही मुलांनी पण दिवाळी असल्यामुळे थोडा आमच्याकडून विरस केला गेला ह्यात शंका नाही. पण मुलींचा दिवाळसण, एकत्र दिवाळी ती पण त्यांच्या स्वतःच्या घरांत...हा योग आम्हाला गमवायचा नव्हता. असो...

एक दिवस तर एक दिवस असा विचार करून रविवारी आनंदाने बाहेर पडलो. जायचे कुठे तर रुचिर-शिशिर चे एम.एस. (KSU) वाले कॉलेज बघितले नव्हते मुलींनी तर तिकडे जाऊ या... ते शिकत असतांना आम्ही गेलो होतो पण आठवणींना उजाळा द्यायला काहीच हरकत नव्हती. जायचे तर सगळ्यांनी एकाच गाडीत त्यामुळे मोठी SUV भाड्याने घेतली. मस्तं गाणी ऐकत, गप्पा मारत, दिवाळीचा फराळ... चिवडा लाडू, चकली, मठरी... मधे थांबून आवडती व्हॅनिला कॉफी घेत मैनहट्टन (ही त्यांची युनिव्हर्सिटी मैनहट्टन ला आहे) ला कधी पोहोचलो हे कळलेच नाही.















मस्तं ऊन, झाडांचे बदलते रंग, रुचिर शिशिर चा कॉलेज चा अभिमान, मुलींना आम्ही काय धम्माल करत होतो हे सांगण्याची घाई, मधेच तिथल्या KSU च्या दुकानांत जाऊन कुठे टीशर्ट घे, कुठे काही घे.... असे सगळेच आपापल्यापरी बोलत होते.... सगळेच बघत होते आणि मजा घेत होते. त्यांचे बास्केटबॉल चे स्टेडियम बघायला गेलो. दोघे काय तिथे गुंगले होते जुन्या आठवणीत की काय वर्णावे. खंत व्यक्त केली गेली की जेंव्हा इथे होतो तेंव्हा अभ्यासामुळे त्या खेळाची मजा घेताच आली नाही, त्यात रममाण होणे, खूप आरडा-ओरडा करून खेळाडूंना प्रोत्साहित करणे वगैरे करता आले नाही जे आता टीवी समोर घरी बसूनच करावे लागते. युनिवर्सिटी शी इमानदार राहणे अमेरिकेमधे खूपच दिसते. रुचिर-शिशिर सारखी उत्साही मुले तर एखादा महत्वाचा जेमतेम २ तासांचा गेम बघायला ८ तासांचे ड्राइविंग करून जातात. आत्ता पण ऑफिस संभाळून जरी कामाच्या वारी असा चा गेम असेल तर ही जोडी आजचे ऑफिस संपवून ३ तासांचा रस्ता पार करून मैनहट्टन गाठते व रात्री १२ ला घरी परत पोहचून पुन्हा दुसर्‍या दिवशी कामांवर हजर असते. (लग्नानंतर हे होणे नाही हे त्यांना माहीत होते म्हणून असे पण अनुभव गाठीशी आधीच ठेवून घेतलेत...हुश्श्शारच बाबा...)तर हे असे आहे....
मुलांच्या प्रेमांत जरा भरकटले नं......हं तर काय सांगत होते...

दिवसभर त्यांच्या कॉलेजच्या आवारांत फिरून तिथल्याच एका रेस्टॉरंट मधे 'चिपोटले' नावांचा छान पदार्थ....पूर्ण जेवणच असते म्हणा...खाऊन रात्री घरी आलो. दुसर्‍या दिवशी सोमवारी दुपारी आम्हाला निघायचे होते. नेहमीप्रमाणे कोणी पण गांवाला जाणार असेल तर आधल्या रात्री आपण बसतो व ज्यास्तं गप्पा मारतो पण सगळेच थकले असल्यामुळे तसे घडले नाही व सगळे आपापल्या खोल्यात गट्टम झालेत.

आम्ही निघणार म्हणून मुलींनी मस्तं भरली वांगी, फ्रूट सैलेड- कस्टर्ड चा बेत केला होता. रुचिर शिशिर दुपारी घरी जेवायला आलेत. जेवून विमानतळावर रवाना व्हायचेच होते. सगळ्यांचेच चेहरे उदास झाले होते.

डोळे आनंदाश्रुंनी भरलेले होते माझे.... अभिमान वाटावा असाच तो क्षण होता. लहान वयातील इतक्या मोठ्या उपलब्धिला तोड नाही हेच खरं... माझी आणि मुलींची निरोपाची मिठी-भेट सुटेना.... आवर घालायलाच हवा होता.

आम्ही तृप्त पण थोडे भारी मनाने त्यांचा निरोप घेतला. कदाचित त्यांना पण घरी जाऊन आमची उणींव भासलीच असेल. २७ तासांचा प्रवास करून आम्ही कुवैत ला परत पोहोचलोत व तिकडे त्यांची आपापली दिनचर्या सुरू झालीय. बस...पुन्हा नेट वर गप्पांमधे समाधान मानण्याचे दिवस परतले आहेत....समोरासमोरच्या फिरक्या संपून नेट वर बोलतांना माझ्या फिरक्या सुरूच आहेत...माझ्या हसवणार्‍या स्वभावाचे कौतुक झाले मुलींकडुन हे ही नसे थोडके ...माझ्यासाठी....




रुचिर-प्राची चे घर
वनराईतच जणु घर हे
शृंगारात नटले हसले
उधळू आशीर्वादांची फुले





शिशिर-लीनू चे घर
रंग ढगाळ असा माखुनी
ऐश्वर्यात जणू घर नाहले
उधळू आशीर्वादांची फुले








शतायु व्हा!!!








बुधवार, १९ ऑगस्ट, २००९

क्षण आला मम भाग्याचा....

१५ एप्रिल २००९ ला रुचिर शिशिर चे लग्नं झाले. मुलींच्या आगमनाची आस वर्षानुवर्षांची होती. दोघांची लग्नं ठरल्यानंतर एक वेगळेच आकर्षण आणि आनंद होता. त्याचे शंभर टक्के कारण मुलींचे आमच्या घरांत आगमनच होते. एक लीनू ठाण्याला आणि प्राची बंगलोरला होती. हल्लीच्या फोन आणि संगणक-इंटरनेट मुळे त्या दूर आहेत असं कधी वाटलंच नाही. सुट्टीच्या दिवशीच बोलणं होत असे. मी शनिवार रविवारची वाट बघत असे. कधी इकड-तिकडच्या गप्पा...कधी त्यांची आम्हांबद्दलची आपुलकीने चौकशी करणे... कधी साड्या खरेदी..बरेच विषय असत बोलायला. मला तर खूपच मस्तं वाटायचं...मुलींबरोबर अशा गुजगोष्टींचा खूप आनंद मी घेत होते. लीनू चा वाढदिवस आला मधे तर तिला छानशी फुले, चॉकलेट ह्या आई बाबांनी नेटद्वारे पाठवली. वाढदिवसाचा दिवस तिच्या शिशिर ने पाठविलेल्या गुलाबांना आईबाबांनी पाठविलेल्या गुलाबांची जोड मिळाली. आणि लीनू ने फोन करून घर फुलांनी आणि त्याच्या सुवासाने दरवळल्याचे सांगायला लगेच आम्हाला फोन केला. तिचे घर आणि इकडे आमचे घर आनंदाने नाहून निघाले.....

प्राची चा वाढदिवस नेमका तेव्हढ्या काळात नव्हता. पण असा भेदभाव हे आई बाबा कधीच करणार नाहीत. एका लेकीचे कौतुक झाल्यावर दुसरीचे होणारच.. रुचिर ने तिला काही भेटवस्तू व फुले पाठविल्यानंतरच्या आठवड्यात आम्ही तिला एक छानशी पर्स आणि फुले पाठवलीत. तिच्यासाठी आम्ही पाठविलेली भेट आश्चर्य देणारी असेल..... फोन करून तिने सांगितले की सकाळी सकाळी मला अकस्मात आनंद मिळून पुढचा दिवस छान गेला.


असेच उरलेले दिवस प्रतीक्षेत चिंब भिजत गेलेत. तिकडे त्यांची दोघींची वेगळी चलबिचल असेल आणि इकडे आमची वेगळीच.... ह्या ३-४ महीन्यांच्या मधल्या काळात अशा गप्पा मारून आमच्यात नातं निर्माण झालेच होते. त्यांना सुरूवातीपासूनच 'ए आई' वर सीमित केले होते त्यामुळे लेकींची जवळीक झाली असं म्हणता नाही येणार कारण आम्ही दूर कधी नव्हतोच... बस आता त्यांच्या आगमनाची तयारी करता करता दिवस गेलेत व लग्नं होऊन राण्या आपल्या घरी आल्यात.... क्षण असे भाग्याचा....

एकदम दोघी मुलींचा गृहप्रवेश झाला....इथे चार शब्द माझ्या दोन्ही राण्यांसाठी पण संबोधन एकीलाच उद्देशुन....


वाटेवरीच जिच्या हे
डोळे होते लागलेले
आगमन झाले तिचे
अमुच्या चौकोनी घरकुली
सून नव्हे आम्हा लेक लाभली

स्मित गोड गालावरी
गूज प्रीतीचे सांगूनी
गुंफित नव प्रेमबंधने
हळूवार ती लाजत आली
सून नव्हे आम्हा लेक लाभली

तरुवेली वर गंधसुमने
फुलोरा जाईचा फूले
दरवळली रातराणी
फुलली अंगणी सदाफूली
सून नव्हे आम्हा लेक लाभली

छेडत सूर आसावरी
गान गाता ताल सुरी
सुस्वागत करण्या तिचे
गीत घेऊनी सांज आली
सून नव्हे आम्हा लेक लाभली

दीपिका 'संध्या'

शनिवार, १५ ऑगस्ट, २००९

१५ऑगस्ट चा माझा दुहेरी आनंद...

आज १५ ऑगस्ट
स्वतंत्रतादिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा!!!






अमुचा तिरंगा अमुच्या हाती.....


स्वतंत्रता दिनाच्या जुन्या आठवणी तर खूप आहेत. जेंव्हा शाळेत होते तेंव्हा १५ ऑगस्ट ची तयारी १४ ऑगस्ट च्या संध्याकाळीच सुरू व्हायची. आई पांढरा स्वच्छ फ्रॉक धुवून इस्त्री करून तयार ठेवलेला असायचा. पांढरे स्वच्छ कॅनवास चे बूट तयार करणे महा कर्म कठिण. कारण पावसाळा दिवस आणि दर शनिवारी पांढरे बूट घालावे लागत शाळेत. त्यामुळे त्यावर कळाच चढलेली असे पण १५ ऑगस्ट ला नीटनेटके जाणे मनामधे ठाम असे. खूप स्वच्छ धू-धा करून बुटाला पांढरे पॉलिश करत असे मी. १५ ऑगस्टला पांढरा फ्रॉक, लांबसडक केसांना लाल रंगाची रिबन लावून त्या दोन वेण्या, पांढरे बूट घालून आम्ही सगळीच मुलं खूप उत्साहात आनंदात ध्वजवंदनाला जात असू.

माझ्या मुलांपर्यंत जरा चित्र बदलेलं होतं. १५ ऑगस्ट ला शाळेत जाण्याचा उत्साह कमी झाला होता मुलांमधे. बाकी मुलांचा कसाही कल असेल... 'कुठे जाता शाळेत सकाळी सकाळी ७ वाजता.. झोपू या झालं...' असा विचार मित्रांचा असला तरी त्यांच्या म्हणण्यात रुचिर शिशिर कधी आले नाहीत. माझ्या शाळेत जाण्याच्या आग्रहाला कधी विरोध केला नाही. बोलता बोलता आम्ही काय करत होतो ते सांगत असे त्याचाही परिणाम असू शकतो.. पण मित्रांना पटवून त्यांना पण शाळेत जायला भाग पाडत. माझी तयारी मी करून घेत असे शाळेत जाण्याची...आता थोडा फरक असा होता की मीच कटाक्षाने सगळी त्यांची तयारी करून देत असे. पाऊस असेल तर त्यांचे बाबा त्यांना शाळेत घेऊन जात असत. मी सांगत असे की शाळेत गोड खाऊ मिळेल... शाळेत जरी नाही मिळाला तरी मी घरी ह्या दोघांसाठी व बरोबर येणार्‍या मित्रांसाठी काहीतरी खाऊ (निदान एक छोटे छोटे चॉकलेट तरी...) आणून ठेवत असे. शाळेत काय भाषण झाले... कोणत्या शिक्षकांनी स्वतंत्रता ह्या विषयावर काय माहीती दिली विचारत असे... (फारसे काही सांगता येत नसे कारण ध्वजवंदन व राष्ट्रगीत जरी उत्साहात म्हंटले असेल तरी बाकीचे बरेच बरे होते....ते तर माझ्याकडून माफ होते..काही झाले तरी बालपणच होते नं...)...


पुढे जाऊन सगळंच बंद झाल्यासारखं झालं. बराच काळ तसाच लोटला. कदाचित फक्त टीवी वर बघण्यापर्यंतच सीमित राहीले. अमेरिकेला जेंव्हा उच्च शिक्षणासाठी रुचिर शिशिर गेलेत तेंव्हा पुन्हा एकदा तिथे भारतप्रेम दिसलेच. कन्सास च्या भारतीय दूतावासामधे ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला दोन्ही वर्षी उपस्थित राहीलेत. फोटो काढलेत... आम्हाला दाखवलेत....


स्वतंत्रतादिन असो किंवा प्रजासत्ताक दिन...तिरंग्याच्या सन्मानार्थ भारतीय दूतावासात जातातच पण जिथे जिथे भारताचा संबंध आहे जसे सानिया मिरझा च्या प्रोत्साहनार्थ तिच्या टेनिस मॅचसाठी ह्या जोडीने थेट न्यूयार्क गाठले होते. तसंच मित्रमंडळींना एकत्र करून विश्वचषक क्रिकेट चा अंतिम सामना भारतातून मागवलेले विश्वचषकाचे कपडे घालूनच बघितला होता. अभिमान आहे आम्हाला आमच्या मुलांचा... भारताबाहेर राहून भारतीयत्व जपताहेत ह्याचा....
भारत माता की जय!!!



स्वतंत्रता दिनाच्या माझ्या आठवणी झाल्या.... तिरंग्याचा अभिमान होताच...आजही आहेच..पण त्याचबरोबर आता गेल्या ९ वर्षापासून माझे आयुष्य इंद्रधनुषी रंगांनी रंगवले आहे आमच्या अभिव्यक्ति या साप्ताहिकाने. १५ ऑगस्ट हा अभिव्यक्तिचा वाढदिवस. १०व्या वर्षात पदार्पण करणारी 'अभि' माझ्या ह्रदयाच्या एका कप्प्यातच आहे. कधी कधी निरुत्साही वाटणार्‍या जीवनांत आनंदाची, उत्साहाची उधळणच होत असते. दिवस सकाळी ५.३० वाजता संगणकावर 'अभि' बरोबर सुरू होतो. व संपतो पण 'अभि' बरोबरच... 'अभि' च्या सहवासात 'अनु' (अनुभूति) आल्यावर तर अजूनच रंग खुललेत. कथा-कविता वाचन वाढले. हळूहळू लेखनाचा स्रोत मिळाल्यासारखे वाटले व लेखन पण जोमाने सुरू झाले.




२००० साली 'अभि' ला सुरूवात झाली. प्रथम मासिक प्रसिद्ध करत होतो. दरमहीन्याच्या १ तारखेला. सगळंच नवीन होतं आम्हाला. पण नेटाने करत राहीलो आणि १ जानेवारी २००१ ला पाक्षिक केले. चांगला प्रतिसाद आणि आमचा उत्साह वाढला. तोपर्यंत जरा स्थिरावलो होतो म्हणून १ मे २००२ पासून त्याला आम्ही साप्ताहिक बनवले. महीन्याच्या १, ९, १६ आणि २४ तारखेला प्रकाशित करत असू. बराच काळ हा असाच प्रवास सुरू राहीला. १ जानेवारी २००८ पासून मात्र त्यात पण बदल केला व आता दर सोमवारी नवीन अंक आम्ही प्रकाशित करतो.

ही ९ वर्षे कशी पळलीत-धावलीत...कळलंच नाही. खूप नव-नवीन चांगल्या व्यक्तिमत्वांची ओळख झाली. नवीन शिकायला मिळाले. माझ्या आणि पूनमच्या अथक प्रयत्नांना भरघोस यश सगळ्या वाचकांमुळे मिळत गेले व पुढे पण मिळत राहीलच.... राष्ट्रभाषीय प्रत्येक व्यक्तिचे, त्याच्या लेखनाचे इथे नेहमीच स्वागत केले जाते...

वाचकांच्या प्रतिक्रिया आणि काही चांगल्या सूचनांमुळे 'अभिव्यक्ति' वेग-वेगळ्या प्रसंगी नव-नवीन रूपात येत असते. 'अभि-अनु' चे वाढदिवस आमच्यासाठी आपल्या मुलांच्या वाढदिवसांप्रमाणे एक उत्सवच असतो... फरक इतकाच की मी व पूनम सगळे काम बरोबर करतो आणि संगणाच्या रूपाने जवळ असतो त्यामुळे 'अभि-अनु' चे वाढदिवस पण संगणकावरच मनवले जातात....अति उत्साहात..अति आनंदात..!!!!!



दिन वर्षांची उलटली पाने
'अभि' बहरली बहरतच गेली
आपुल्याच पण दूरदेशींच्या
भारतीयांना जी भावली

कधी भिजली चिंब जलधारेत
वसंतोत्सवी कधी फुलली
साहित्याचे तुषार उडवित
सगळ्यांना तू भिजवत आली

वाढता दिनोंदिन महिमा तुझा
ह्रदयी सकलांच्या विराजिली
आठवडी घेते नवरूप तू
वाढदिवशी आज 'अभि' हसली

'अभि' ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!!!

तर असा हा माझा १५ ऑगस्ट चा दुहेरी आनंद....

दीपिका 'संध्या'

रविवार, २ ऑगस्ट, २००९

आमच्या मैत्रीला सलाम....

आज ऑगस्ट महीन्याचा पहिला रविवार म्हणजे जागतिक मित्रता दिवस

जागतिक मित्रता दिवस येतो आणि जातो...खास दिवसाची मैत्रीला गरज असतेच कुठे...मैत्री जुनी असो की नवीन.....पण टिकवणे तितकेच कठिण. एकतरफी मैत्री टिकवणे जमत नाही त्यामुळे उदासीनतेत ती कमी होत होत संपुन जाते. वाईट वाटतं... आजपासुन ३०-३५ वर्षापुर्वी फक्त 'पत्र पाठवणे' हा एकच दुवा होता मैत्री मधे. शाळेतल्या, कॉलेजमधल्या मैत्रिणी ह्याच कारणाने दुरावल्यात. खरं तर माझा पत्र लिहीणे हा एक छंद आहे. सगळ्यांनीच तेव्हढ्या उत्साहाने आणि आत्मियतेने पत्र पाठवावे हा माझा आग्रहच नाही त्यामुळे दोष कोणाला देत नाही पण असं घडून जातं आणि पोकळी निर्माण होते कारण ती शाळा-कॉलेजमधील मित्रता मला आज खूप मोलाची वाटते. सध्याच्या ऑरकुट मधे पण मी खूप प्रयत्न केला की कुठे ही जुनी नाती गवसतात का....पण निराशाच पदरी आली.

इतके सगळे असतांना रुचिर शिशिर च्या लग्नाच्या वेळी मैत्री कशी असावी आणि जपावी ह्याचा प्रत्यय आला. १९७९ साली लग्न होऊन आम्ही फरीदाबाद ला गेलो. हरियाणामधे असल्यामुळे मराठी लोक जवळ येणारच. नागपुरकर, पुणेकर, मुंबईकर..सगळे खूप जवळ आलोत. सुमंत, देशमुख, मराठे, दिक्षित आणि आम्ही अशी पंचकोनी मित्रता तेंव्हा फरीदाबाद मधे प्रसिद्ध होती. नंतर बाकी मंडळी पण येऊन मिळालीत आम्हाला..पण आम्ही थोडे जुने होतो. वर्षानुवर्ष उलटलीत...सगळ्यांनी आपापली घरे बांधलीत की असेच भासत होते की आता तिथेच स्थायिक होणार पण कालांतराने आमचे, दिक्षितांचे, मराठ्यांचे फरीदाबाद सुटले.... सुरुवातीला २ वर्षात एकदा तरी फरीदाबाद चक्कर ही मैत्री आम्हाला खेचून करायला भाग पाडायची पण पुढे जमेनासे झाले त्यामुळे नंतर जेंव्हा आम्ही भारतात जात असू...फोनवर भेट होतच असते. फोनने सान्निध्य साधलेलेच आहे. मुलं मोठी झाली आहेत..एकेकाची लग्नं होत आहेत...आम्हाला कुवैतहून प्रत्येक वेळी जाणे जमलेच असे नाही. पण खर्‍या मैत्रीची साथ इथे मिळाली आणि कुठलाही किंतु मनांत न ठेवता सगळेच्या सगळे पुण्याला लग्नाला आले होते. मांडवात अभिमानाने सांगत होतो आम्ही उभयतां आमच्या ३० वर्षांच्या जुन्या पण परिपक्व मैत्रीबद्दल...

१९८९ साली फरीदाबादच्या मित्रप्रेमात नाहून नोकरीच्या निमित्याने औरंगाबादला येणं झालं. सिडको मधे बंगलेवजा घरं होती. अशा ठिकाणी रहायचे म्हणजे आधी थोडं कठिण वाटत होतं कारण लोकं फारसे मिसळत नसल्याचंच कानावर होतं. पण काय नशिब घेऊन आलो आहोत आम्ही...जिथे जाऊ तिथे खासच मित्रपरिवार तयार होतो. बिंदू काका काकू (काकूंची मुलगी स्वाती आता पुण्यातच आहे..), भैरवी-उज्वल, पद्मा-अनिल...इतकी छान मंडळी सगळी. औरंगाबाद सोडेपर्यंत खूप जगलो ह्या सगळ्यांबरोबर..खूप आठवणी साठवून आहोत मनांत. वर्ष-दीड वर्षातच पद्मा ने बदलीमुळे औरंगाबाद सोडले तर सहवास फार नव्हता पण आमची जोडी अशी जमली होती की बस....मुलांच्या मुंजीला खास अमरावती हून आली होती. प्रेम तसेच होते पण भेट मात्र अगदीच दुर्मिळ झाली होती. मध्यंतरीच्या वर्षात बाकी सगळ्यांशी फोनवर बोलणं होत असे पण पद्माला गाठणे जमलेच नाही. आठवण खूप यायची. मधे एक दोनदा बिंदू काकांनी नंबर मिळवला तिचा आणि खूप गप्पा झाल्या फोनवर.

सगळ्यांशी कधी बोलणे झाले... कधी नाही.. कधी भेट झाली...कधी नाही...पण १५ एप्रिल च्या रुचिर शिशिर च्या लग्नाला फरीदाबादकर आणि औरंगाबादकर... सगळेच्या सगळे हजर होते....फरीदाबादच्या सगळ्यांचेच रुचिर शिशिर हे पुतणे....औरंगाबादच्या बिंदू काका काकूंच्या नातवांचं लग्न, भैरवी व पद्माच्या भाच्यांचं लग्नं होतं..खरं तर ह्या सगळ्यांशी नातं मनांचं आहे...त्याला कोणतीच व्याख्या नाही..कोणतेच नांव नाही.. प्रेम किती ती तुलना नाही...तर असे सगळे लग्नाला येणारच नं...कदाचित आपले काही कार्यक्रम त्यांना मागे पुढे करावे लागले असतील...पण लहानाचे मोठे त्यांच्यासमोरच झालेल्या रुचिर-शिशिर च्या बरोबर लग्नाचं औत्सुक्य व आनंद त्यांना चैन कसे पडू देणार....

बाकी सगळ्याबरोबर ह्या सगळ्यांच्या उपस्थितिने लग्नाची शोभा नक्कीच वाढली.....आपका प्यार सर आँखों पर...

ह्या ऋणानुबंधाला आणि आमच्या मैत्रीला माझा सलाम...

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनांत मैत्रीमधे ठेच पण लागली आहे कधी तरी.......इलाज नाही.... जीवन ह्यालाच तर म्हणतात... अशा कटु अनुभवांमुळेच आमची जुनी प्रेमाची नाती अधिकच दृढ आहेत हे जाणवतं आणि अजूनच मजबूतीकडे वळतात नं...

मैत्रीवर थोड्या चार ओळी.....

असे कधी न होणे की मित्रच नसेल
वरवर पण मैत्री ही नक्कीच असेल

रक्ताच्या नात्याची ओढ असेल खरी
मैत्रीच्या नात्यात ती अधिकच असेल

लिहीले खूप गेले काव्य मैत्रीचे तरी
सूर प्रत्येक मैत्रीचा खासच असेल

गंध नसेल मैत्रीला, छंदात रंगलेली
जुनी झाली तरी रुप नवीनच असेल

विश्वासघाताने मन ठेचाळू दे कधी
अपुल्या मैत्रीत फक्त विश्वासच असेल

दीपिका 'संध्या'

तू थांब ना...

कसला पसारा आठवांचा
देही येतो आता शहारा
गुंफून घे हात या हाती
सौख्य ते वेचण्यास तू थांब ना

डोकावली नयनात तुझ्या
बावरी रे ही प्रीत माझी
पापण्यांच्या कोरीत त्या
मला वसविण्यास तू थांब ना

रात्र आजची पुरती ढळली
असतील झाल्या गुजगोष्टी
परी आहे रे मी मनकवडी
मना उमगण्यास तू थांब ना

श्रावणाच्या ह्या वीराण रात्री
आळविता सूर मेघ मल्हारी
चिंब नभासम बेहोश मिठी
धुंद धुंद होण्यास तू थांब ना

दीपिका 'संध्या'

शनिवार, २५ जुलै, २००९

लग्न आणि लग्नं.....रुचिर शिशिर चं....

गेल्या गणपतिच्या वेळी आम्ही चौघे पुण्याला गेलो होतो. उद्देश रुचिर शिशिर चे लग्न ठरवणे हाच होता. म्हणतात नं..योग जसा असेल तसेच घडत असते. अंधश्रद्धेच्या विरोधात असणारी मी मात्र योग आणि नशिबाची साथ ह्यावर थोडा विश्वास ठेवू लागलेय.

त्यामुळे नेहमी सगळ्याच गोष्टी बरोबर-बरोबर होणार हेच आमच्या मनांत घट्ट रुतलेलं आहे पण रुचिर-शिशिर च्या बाबतीत ह्यावेळी थोडे वेगळे घडायचे होते. त्यामुळे ६ सप्टेंबर २००८ ला शिशिरचा आणि २५ डिसेंबर २००८ ला रुचिर चा साखरपुडा झाला. रुचिर-प्राची आणि शिशिर-मृणालिनी, ह्या जोड्यांना १५ एप्रिल २००९ ला नवीन प्रेमाच्या नात्यात आणि लग्नबंधनांत बांधण्याचे ठरले.

इथे एक खास गोष्ट सांगाविशी वाटते की रुचिर-शिशिर चे लग्न एकाच बोहल्यावर एकाच वेळी होण्याचे-करण्याचे स्वप्न आम्ही दोघांनी बघितले होते. सगळंच बरोबर होत गेलं त्यांचं दोघांचं तर लग्नं पण तसंच व्हावं ह्या दिशेने पावलं उचलून आम्ही कसून प्रयत्नशील होतोच. पण ह्यात पूर्णपणे साथ आम्हाला मृणालिनी आणि प्राची च्या आई बाबांची मिळाली त्याचमुळे हे शक्य होऊ शकले ह्यात शंकाच नाही. कारण एक ठाण्याचे आणि दूसरे मिरजेचे... त्यांना उठून येऊन पुण्याला लग्न करायचे होते. खरं तर आम्ही पण उठूनच पुण्याला येऊन लग्नाची तयारी करणार होतो. सध्या आम्ही नुसते नांवालाच पुणेकर आहोत..पण पुणे आम्हाला पूर्णपणे नवीनच आहे. जेमतेम ३ वर्षापासुन पुण्यात स्थायिक होण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आम्ही तिघांनी पण एकमेकांच्या सहकार्याने लग्न पुण्यात साकार करण्याचे ठरवले. तसेही आमची मते थोडी वेगळी आहेत त्यामुळे मुलाची बाजू-मुलीची बाजू असले काहीच डोक्यात ठेवायचे नाही हे पण ठरलेच होते. आपल्याकडील लग्नाच्या पद्धतिप्रमाणे पाय धुणे, विहीणीची पंगत वगैरेच्या मी अगदीच विरोधात...तर कदाचित ह्यामुळे पण लग्नाच्या दिवशी वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याला मदतच होणार होती. कोणीच दडपणाखाली वावरू नये हा आमचा प्रयत्न होता. थोडी ज्यास्त जबाबदारी आम्हीच घेतली कारण त्या दोघांपेक्षा आमची आणि पुण्याची ओळख थोडी ज्यास्तं होती. सोबतीला नातेवाईक भरपुर आहेत ज्यांच्या सहकार्याने ही दोन कार्ये आनंदाने व सफलतेने पार पाडणे फारसे कठिण तेंव्हा वाटलेच नाही.

३१ डिसेंबर २००८ ला रुचिर शिशिर परत गेलेत. आम्ही दोघे पुढे थोडे थांबुन जी काही थोडी फार तयारी करता येईल ती करायचे ठरवले होते. १४-१५ जानेवारी ला माझ्या बाबांचे वर्षश्राद्ध होते, त्यासाठी मी थांबणारच होते. ४-५ जानेवारी पर्यंत ह्यांची सुट्टी होती. त्यात कशी कशी कामं करता येतील ते ठरवले.

सगळ्यात प्रथम नंबरवर काम होते ते म्हणजे लग्नाचा हॉल ठरविण्याचे... दोन लग्नं एकदम होणार आहेत तर हॉल पण मोठा लागणार. एप्रिल मधे पुण्याला गरमीचा कहर असतो त्यामुळे हॉल वातानुकुलीत हवा होता....तर त्याची शोधाशोध सुरू केली आणि अरोरा टॉवर्स हॉटेल चा हॉल ठरवला. प्रशस्त आणि छान वाटला. आणि इथे एक नमूद करावेसे पण वाटते की जरी हॉटेल चार सितारा वगैरे असले तरी फारसे महाग नाही. तिथे बाकी सजावटीची गरज नाही. जेवण उत्तम प्रतीचे आहे व बाकी पण सोय खूपच चांगली आहे. त्यामुळे आम्हा सगळ्यांनाच तो आवडला होता.

नंतरचे महत्वाचं काम होतं पत्रिकेचं. पुणेरी खाक्या पुढे आला...पुणेरी झटके व धक्के खायला प्रारंभ झाला...पण झाले पत्रिकेचे काम. ४ दिवस त्याचे प्रूफ रीडींग सुरू होते. करता करता मजकूर तयार झाला...८ दिवसांनी मिळणार होत्या. मी जाऊन आणायचे ठरवले. निमंत्रणपत्रिकेमधे छानशी कविता मीच लिहून द्यायची असं ठरलं होतं पण वेळेअभावी ते राहूनच गेले... पण तरी......पत्रिकेतील मजकूर बोलका होता....

''काही नाती फुलवायची मोर पिसार्‍यासारखी,
काही नाती जपायची बिल्लोरी कंकणासारखी,
काही नाती सांभाळायची मनांच्या कुप्पीत अत्तरासारखी
अशी नाती दृढ होऊन संपन्न होणार आहे हा शुभविवाह सोहळा!!!''

हा सोहळा होणार होता १५ एप्रिल २००९ ला दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी...

माझ्या कुवैत च्या एका मैत्रिणीने येवल्याच्या पैठणीचे प्रकरण डोक्यात बसवले होते. जर का दोन मुलांची लग्नं आहेत तर येवल्याला जाऊनच पैठण्या आणायच्या. २ जानेवारीला सकाळी ६ वाजता तवेरा ठरवून आम्ही दोघे, दिलीप भाऊजी, उत्तरा आणि मनीषा येवल्यासाठी रवाना झालोत. रस्ता ६ तासांचा तरी नक्कीच होता. प्रचंड उत्साह..... सोनी च्या दुकानांत १२ वाजता जे पोहोचलो...खरेदी करता करता तिथेच आम्हाला ५ वाजलेत. पण एकदम वेगळा अनुभव. सगळ्यांनाच मनांपासुन वाटले की जर ही संधी सोडली असती तर येवल्याला कधीच जाणे झाले नसते. तिथे भरपूर खरेदी केली. बस..एक इच्छा राहीली ती त्यांचा हातमाग बघायची. खूपच उत्सुकता होती पण वीज गेल्यामुळे बघता आले नाही. माझी जी खास पैठणी आहे ती विणायला त्यांना ३ महीने लागतात म्हणे...तर किती ही मेहनत...किती मोबदला त्या मेहनतीला मिळत असेल हा विचारच करत बसलो आम्ही....कष्टाचं आयुष्य जगत आहे संपूर्ण येवला... पण कलाकारी म्हणाल तर जगप्रसिद्ध. तिथल्या सारख्या पैठण्या मुंबई पुणे सारख्या शहरात सुद्धा मिळणे नाहीत....

तिथेच देण्याघेण्याच्या साड्या आणि खास म्हणजे माझे व माझ्या मुलींचे पैठणीच्या कापडाचे सुट चे कापड....एकदम वेगळे अलौकिक......आणि अर्थातच येवला प्रकरण पण एक अलौकिक अनुभवच आहे जो अशा लग्नप्रसंगी सगळ्यांनीच जरूर घ्यावा हे माझं प्रामाणिक मत आहे.

येवला प्रकरण व दागिन्यांची खरेदी करून हे कुवैत ला परत आलेत. मी बाकी कामं करायची ठरवलीत. एक वेळ अशी होती की कुठुन सुरूवात करायला हवी हेच कळेना. सुरूवात तर मुहूर्ताने करायला हवी होती. त्याप्रमाणे ७ जानेवारी ला मुहूर्त केला. निलीमा, गौरी, प्रिया, उत्तरा, मामी, वैष्णवी, विद्युत वगैरे सगळ्या जणी येऊन मज्जा आली. सगळ्यांसाठी मस्तं बटाटे वडे, गाजर हलवा...थंड थंड पन्हं केलं....मुहूर्त छान झाला..मग उरलेली खरेदी करायला जोर आला.

मैत्रेयीच्या लग्नाचा अनुभव ताजा असल्यामुळे उत्तरा-दिलीप भाऊजींचीच मदत ज्यास्त घेणार होतो. त्याप्रमाणे चौकशा सुरू झाल्या. फोटोग्राफर, बाकी फुलांची सजावट...सगळ्यांशी बोलून ठेवले. कुवैतहून ज्या छान पिशव्या देण्या-घेण्यासाठी नेल्या होत्या त्यात साडी वगैरे ठेवून त्यावर नांवाची चिठ्ठी लावून ठेवली. ही फक्त प्राथमिक तयारी होती. जे काय देण्याघेण्याचे उरले ते आणून ठेवले. मी १७ जानेवारी ला परतणार होते. बाकी टेंट वाला, सगळ्या जेवणाची ऑर्डर कोणाला द्यायची वगैरे मी व माझ्या भाऊ-भावजयीने मिळून ठरवून व त्यांच्याशी बोलून ठेवले. पत्रिका छापुन आल्या होत्या त्यावर तयार यादीतुन पत्ते लिहून तिकीटं लावून ठेवलीत. इतक्या लवकर तर पाठवायच्या नव्हत्या पण १५ मार्च पर्यंत पाठवायच्या असं ठरवलं होतं. दोन्ही लग्नं ठरून १५ एप्रिल तारीख लगेच नक्की झाली असल्यामुळे ह्यांनी कुवैत ला परत जाण्याच्या आधी पहिले आमंत्रण केलेच होते. कारण बहुतेक सगळे परगांवाहून येणारे असल्यामुळे तितकी वेळेची मुदत देणं आवश्यकच होतं. लग्नासाठी जेंव्हा पुन्हा पुणे गाठू तेंव्हा दुसर्‍यांदा पुन्हा फोन करणारच होतो आम्ही...

बर्‍यापैकी तयारी करून मी पण कुवैतला परतले. तसा आराखडा पूर्ण तयार असला तरी डोक्यात चक्र फिरतच असतात. लग्न म्हंटलं की वेगवेगळ्या कल्पना सुचत असतात. इथे माझ्या मैत्रिणी वेगवेगळ्या दिशेने विचार करत त्यातुन पण नवीन काही तरी पुढे येत असे. परत आले आणि ठरवले होते की मंगलाष्टका आपणच लिहायच्या. थोडे फार लेखन करत असल्यामुळे त्या लेखनाला सुरूवात केली. माझी मैत्रिण व मी मिळून छान लयीत बांधल्या. तर हे एक काम हातावेगळे झाले.

होत असं होतं की एक काम हातावेगळं करेपर्यंतच दूसरे कुठले तरी खूळ डोक्यात आलेले असायचे. बाकी तयारी बरोबर मुलांसाठी मला खास तयारी पण करायचे मनांत होते. त्यात दोन गोष्टी होत्या. फोटोफास्ट मधे त्या दोघा-दोघांचे फोटो असलेले मग्ज तयार करून घ्यायचे होते. आणि दूसरे म्हणजे सुंदर नवीन आयुष्याची सुरूवात आणि त्या नवीन दिवसाच्या नवीन भासणार्‍या नवीन सूर्याला साक्षीला ठेवणारी कविता लिहायची होती. अर्थातच दोघांना वेगवेगळ्याच. कविता लिहून झाल्यावर फोटोशॉप मधे वेगवेगळे चित्र घालून सेटिंग सुरू केले. मग्ज साठी वेगळे व कवितांसाठी वेगळे ग्राफीक्स बनवायचे होते. फोटो मुलींचे जसे हवे तसे नव्हते माझ्याजवळ...ते मी त्यांच्याकडुन घेऊ कसे ह्याचा विचार करू लागले कारण सगळं गुपित ठेवायचं होतं हे.... पण जमवलंच मी....चाह जहाँ...राह वहाँ.....

रुचिर-प्राची साठी...


नवजीवनाची नवी पहाट
सोनेरी किरणांनी नाहली

मौन स्वरांची मौन भाषा
क्षणांत परी ती उमगली
चिंब चिंब मन मोहरता
प्रीत मेंदीत भिजली
नकळत हलके हलके
प्रेमबंधना विणून गेली


शिशिर-मृणालिनी साठी...

नवजीवनाची नवी पहाट
सोनेरी किरणांनी नाहली

रंग बावर्‍या प्रीतीची
उधळण अवनीवरली
असेल मौनखेळ परी
शब्द-शब्द उमगली
मनमोर नाचता उतरे
स्वर्ग सभोवताली


कविता तयार झाल्या फोटोंबरोबर ग्राफीक्स घालून फ्रेम साठी चित्र पूर्ण तयार झाले. प्रिंट झाले...म्हणजे आता पुण्याला गेल्यावर फक्त फ्रेम करणे बाकी आणि तयार ग्राफीक्स घालून मग्ज तयार करणे बाकी....जमलं तर....

अजून एक गोष्ट मनांत घोळत होती कधीची... रुचिर शिशिर चं बालपण बाकी मुलांपेक्षा वेगळं नक्कीच नव्हतं पण दोघांचं एकदम....बरोबर.... वेगळेपणा ही घेऊनच आलं होतं. सगळ्या नातेवाईकांमधे, मित्रांमधे नेहमीच चर्चेचा विषय असायचे... लग्नाला सगळेच येणार तर त्यांचे बालपण, त्यांचे मोठे होतानाच्या ज्या काही आठवणी फोटोंच्या रुपात आहेत त्यांना सगळ्यांपुढे मांडण्याचे खूप मनांत होते. आजी आजोबा सगळेच खुश होतील, आत्या मामा काकांना मांडीवर खेळवलेले रुचिर शिशिर पुन्हा हसवून जातील... आधी काही लग्नांमधे ठिकाणी मी काही फोटोंना संग्रहित करून एका बोर्ड वर लावलेलं बघितलं होतं. त्यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा मानस होता. संगणकाची आणि माझी दोस्ती आहेच तर ह्याचाच फायदा घ्यावा. पॉवरपॉईंट प्रेजेंटेशन तयार करता करता पूर्णतेकडे जात होते. रोजचा तो एक ध्यासच होऊन बसला होता. काही तरी त्यात फेरबदल व्हायचे...मैत्रिणींना दाखवले तर अजून नवीन छान सल्ले मिळत मिळत इथून निघेपर्यंत त्यावर प्रयोग सुरूच राहीलेत.

बाकी तयारी इथुन (कुवैत) आम्हाला फारशी करायचीच नव्हती. छान छान सजावटीचे सामान, रंगीत व सुगंधी मेणबत्त्या वगैरे ची खरेदी केली.

मी २० मार्च ला च कुवैत पुन्हा पूर्ण तयारीनिशी सोडले.
फारसे काम नाहीये पण चैन पडेना म्हणून पुणे लवकर गाठले. उरलेली तयारी आणि नवीन येऊ घातलेली नव-नवीन तयारीची-कामाची यादी पुढ्यात जशी वाढू लागली तसे वाटले दिवस कमी उरलेत की काय आणि कामं होणार की नाही..... ह्या ज्या कामाचं मी म्हणतेय ती कामं निव्वळ माझ्या हौशीखातर होती हे नक्कीच. हे पण ५ एप्रिललाच पोहोचलेत पुण्याला.
मुलींच्या आणि विहिणींच्या साड्या छान छान बॅग्ज, फुलं-पानं, लेस वगैरे लावून सुंदर सजवल्या होत्या...बाकी देण्याघेण्याच्या बॅग्ज मधे आहेराबरोबर ओटी साठी तांदुळ व मोत्याची सुपारी आणि लाडू चिवड्याच्या ऐवजी थोडा सुका मेवा आकर्षक पिशव्यांमधे भरून दिला...

नवीन महत्वाचं एक काम होतं फुलांचा अंतरपाट बनवून घेण्याचं. बर्‍याच फुलवाल्यांना विचारलं पण कोणीच आधी बनवलेला नव्हता. पण बनवून देऊ ह्याचं आश्वासन देत होती ती लोकं पण मला विश्वास नव्हता की कसा बनवतील व माझा पोपट न होवो.... फुलांच्या अंतरपाटाचा माझा आग्रह व इच्छा येव्हढ्यासाठी होती की मी लिहीलेल्या मंगलाष्टकांमधे फुलांच्या अंतरपाटाचा उल्लेख होता. आणि दिसायला सुंदर दिसणार व फुलांचा दरवळणारा सुगंध नक्कीच आनंद देऊन जाईल.....शोधून शोधून एक फुलवाला भेटला ज्याने ह्या आधी बनवला होता...

गाड्यांची सजावट, घरची सजावट, जेवणावळीची तयारी (सगळ्या ऑर्डर्स), पाव्हण्यांची राहण्याची सोय, आजकाल चहा-पाण्यासाठी, नाश्त्यासाठी वगैरे प्लास्टिकच्या किंवा थरमोकोलचे कप आणि प्लेट्स वापरायचीच पद्धत आहे जी की एकदम चांगलीच आहे.....त्याची पण खरेदी झाली....सगळेच झालेय...

१२ तारखेपासुन पाव्हणे (खरं तर सगळेच घरचे...पाव्हणे कुणीच नव्हते) यायला सुरूवात झाली होती. ११-१२ एप्रिल च्या रात्री उत्सवमूर्ति रुचिर शिशिर पोहोचलेत. बाकी पण येऊच लागले होते. आलेल्या पाव्हण्यांबरोबर १२ एप्रिल ला रात्री मामा-मामी ने धडाक्यात केळवण करून लग्नसमारंभाची सुरूवात केली. वेळेअभावी बाकी कुठेच केळवण झाले नाही.

१३ एप्रिल ला घर ४०-४५ लोकांनी गच्च भरले होते. संध्याकाळी मेहंदी चा कार्यक्रम होता. पावभाजी, दहीभात आणि रसमलाई हा रुचिर शिशिरच्या आवडीचा बेत ठेवला होता. रुचिर शिशिर ची अमेरिकेची मैत्रिण रॉबिन खास लग्नासाठी आली होती. हातभर बांगड्या (जशा मी घातल्या होत्या तशाच आणि तेव्हढ्याच हव्या म्हणे) आणि दोन्ही हातभर मेहंदी लावून घेतली. बाकी पण सगळ्यांना मज्जा आली...मनसोक्त असे मेहंदी ने हात रंगले होते सगळ्यांचे...थोडी मेहंदी रुचिर शिशिर च्या हातावर पण काढली..

१४ एप्रिल ला सकाळी देवब्राह्मण आणि देवदेवक बसवले. पंचपक्वान्नाचे जेवण होते. संध्याकाळी व्याही भोजनाचा कार्यक्रम.... व्याही मंडळींन्ना यायला जरा उशीर झाला त्यामुळे आपले सगळे जरा कंटाळून गेले होते पण चलता है.....मुली छान नटून-थटून आल्या होत्या माझ्या...छान वाटले...

आणि आलाच की १५ एप्रिल चा दिवस....गुरूजींनी सांगितल्याप्रमाणे वेळ पाळण्याचा बराच प्रयत्न सगळ्यांनीच केला.... पण सगळे विधि वेळेत होऊ शकले नाहीत....मधल्या थोड्या वेळात दोन्ही फोटोग्राफर दोन्ही जोड्यांना घेऊन असे गायब झालेत की शोधाशोध सुरू झाली.....मज्जा आली...

मधल्या ह्या कंटाळवाण्या वेळासाठीच ते पॉवरपॉइंट प्रेजेंटेशन चा घाट घातला होता आम्ही... २ दिवस आधीच प्रोजेक्टर ची सोय हॉटेल मधे करून ठेवली होती..आम्ही बघून आलो होतो... फक्त लॅपटॉप जोडून तो शो सुरू केला...कोणालाच ह्याचा अंदाज नव्हता त्यामुळे आधी आश्चर्य आणि मग आनंद सगळ्यांच्या चेहर्‍यावर बघण्यासारखा होता.. बाकी मुलीकडच्यांना कदाचित ह्याने मजा आली नसेलही..साहजिकच आहे...पण मोठ्या पडद्यावर रुचिर-शिशिर चा आजपर्यंतचा लहानपणापासुन चा प्रवास बघतांना बाकी जोशी परिवार व सगळ्याच आप्तेष्टांना खूप खूप मज्जा आली...जुने छोटे छोटे रुचिर शिशिर पुन्हा जवळ आल्यासारखे वाटलेत......

लग्नाची वेळ आली तरी रुचिर शिशिर धोतर झब्ब्यांमधेच फिरत होते...पटापट दोन्ही मुलं आणि दोन्ही मुली तयार होऊन आलेत आणि बोहल्यावर उभे राहीलेत...
काय धन्य वाटत होते आम्हा दोघांना...अर्थात थोडे आगळे-वेगळेच दृश्य होते हे की एकाच वेळी दोन लग्नं....सगळ्यांनाच कुतुहल वाटत असेल..फुलांचे अंतरपाट बघून सगळेच आश्चर्यचकित झालेत... आणि झाले असे की ते मोगर्‍याच्या फुलांचे करून पण हलके झालेच नाहीत आणि गुरूजी आणि मुलींचा भाऊ ह्या चौघांना खूप कठिण गेले तो अंतरपाट सांभाळणे...आणि झाले असे की ज्यासाठी अंतरपाट मधे धरला जातो तो सफल झालाच नाही...पूर्ण वेळ 'नजरानजर होऊ देऊ नका' असे मंगलाष्टकांमधे सांगत होतो तरी दोघा-दोघांची नजर एकमेकांवरच खिळली होती...आहे नं मज्जा....

लग्न लागून आता जोड्या सुंदर सजवलेल्या स्टेज वर उभे होते....आनंदाने माझ्या पापण्या ओल्या होत्या...आता पूर्ण जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले... सगळ्यांना सांगितले होते की पेढ्याबरोबर एक कार्ड देऊ ते कृपा करून फेकू नका...ते एका संस्थेकडून घेतलेले होते... Foot and Mouth paintings... (ही संस्था तशी कोणाकडून मदत स्वीकारत नाही, पण तिथे असलेल्या लोकांना हात नसल्यामुळे ते तोंड आणि पायाने केलेले पेंटिग्ज विकत देतात जी आपल्याकडून त्यांना मिळणारी फूल न फूलाची पाकळी असते...) गुलाबाची फुले देऊन नंतर पायदळी तुडवली जाण्यापेक्षा ही कार्डस रूपी फुले आम्ही सगळ्यांना दिलीत.

फोटो प्रकरण इतके लांबले की जेवायला उशीर झाला... नंतर लक्ष्मीपूजन वगैरे विधि आटोपुन शेवटी आम्ही आमच्या मुलींना घेऊन ५ वाजता घरी जायला निघालो. बरीच मंडळी आधीच घरी पोहोचली होती..घरी मुलींच्या स्वागताची तयारी करायची होती.....

घरी पोहोचणार तर शेवटच्या वळणावरच आमच्या दोन्ही गाड्या थांबवल्या गेल्या कारण १०,००० फटाक्यांची लड बरीच दूरपर्यंत पसरली होती....आमच्या अमेरिकावासियांच्या मनाविरुद्धच जाऊन (कारण ते हवेचे आणि आवाजाचे प्रदुषण आहे..) माझे खरे केले होते... खूप आवाज खूप आवाज...खूप ढणढणाट..... वाजत गाजत मुली घराच्या आवारात आल्यात...

लिफ्ट ने ७ व्या मजल्यावर पोहोचल्यावर तर दृश्य बघण्यासारखे होते...काय सुंदर काय सुंदर सजवले होते... सगळीकडे फुलेच फुले....खूप दिवे...आणि मी एक आठवडा आधी ग्लासेस मधे गहू पेरून आज प्रत्येक ग्लास मधे बोटभर उंच आलेले सुंदर हिरवे हिरवे गार कोंब तयार होते ते ग्लासेस मधे मधे ठेवले होते.(असे म्हणतात की असे गव्हाचे कोंब शुभ असतात घरी येणार्‍या मुलींसाठी.)...अतिशय सुंदर...

आकर्षक माप ओलांडून राण्या घरात आल्यात... नंतर थोड्यावेळाने केक कापून थोडे अमेरिका पद्धतिने पण मुलींचे welcome home... केले...
१६ एप्रिल ला सत्यनारायण आणि सहस्र आवर्तनांनी या खास लग्नाची सांगता झाली...

हळू हळू पाव्हणे परतू लागलेत...थोडेफार कमी ज्यास्त झालेही असेल पण स्मरणात राहणारा हा सोहळा नक्कीच झाला असे प्रेमाने सांगणारे फोन पण प्रचंड आलेत व आम्ही धन्य झालोत... अर्थात मुलं आणि त्यांच्या राण्या पण खुश असतीलच...
खूप सगळ्या आप्तस्वकीयांमुळेच व त्यांच्या सहकार्य व मेहनतीनेच हे कार्य मनांसारखे पार पाडता आले ह्यात शंकाच नाही.

नवदांपत्यांना वैवाहिक नवजीवनाच्या खूप खूप शुभेच्छा....!!!

इति

दीपिका 'संध्या'

मंगळवार, २१ जुलै, २००९

आज मिलन होणार गं...

मनमोर नाचणार गं..
आज मिलन होणार गं..

निशिगंध फुलोरा दरवळतो
गुंजनात भ्रमर सैरभैरतो
मोहरली धरती, आसमंत हसणार गं
आज मिलन होणार गं

चढणार साज ह्या सुरांना
नाद पाउलीच्या पैंजणांना
स्वर भारलेले, एक तान छेडणार गं
आज मिलन होणार गं...

कळ्या नाजूक समयीच्या
खुणवणार बटा भाळीच्या
अंग अंग वसंती आज मी फुलणार गं
आज मिलन होणार गं

दीपिका 'संध्या'

तू मजसाठी असावा...

शांत काजवे
निःशब्द चांदवे
जागवाया अशा रात्री तू मजसाठी असावा

स्वच्छंदी सरिता
समर्पण धरिता
अंतरी सामावणारा तू मजसाठी असावा

सप्तरंगी नभात
बरसला मोकाट
परि रिमझिमणारा तू मजसाठी असावा

बहर वसंताचा
गंधित फुलांचा
सुवासात धुंदणारा तू मजसाठी असावा

रुतणार काटा
भिजणार वाटा
मन खुळे, हसविणारा तू मजसाठी असावा

वदली नजर
मौनांचे स्वर
स्पर्शात समजाविणारा तू मजसाठी असावा

दीपिका 'संध्या'

सोमवार, ६ जुलै, २००९

मित्रतेला समर्पण....

माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींन्नो....

गरजेसाठी कधीच दोस्तीचे नाते जो़डू नकोस
वाटले तरी तितक्या सहजतेने हे तोडू नकोस

रक्ताचे नाते नसू दे मातीमोल हे कधीच नसते
आपुलकीची मित्रता सदैव अनमोलच असते

जीवन वाटेवर मन-नवीन नाती जुळतीलच बघ
ओंजळीत प्रेमवर्षावाची फूले तर साठतीलच बघ

सामंजस्य असावे आपणांत मित्र होऊ समाधानी
ओझ्याचे हे नाते नव्हे, खूणगांठ बांधू या रे मनी

देणे घेणे व्यवहार, मैत्रीत अपुल्या नसावेत रे
मदतीचे हे अपुले हात सदैव तत्पर असावेत रे

बाकी नसे मागणे काही, चार शब्द विश्वासाचे
प्रेम असेच अनंत असावे, नसावे चार दिसांचे

दीपिका 'संध्या'

रविवार, ५ जुलै, २००९

तुझ्या माझ्यात....

झाली कशी नजरेची खेळी तुझ्या माझ्यात
श्वास होते श्वासात भिनले तुझ्या माझ्यात

ओल्या सांजवेळी जसे निनादले सूर भैरवीचे
गीत एक चिंब तसे भिजले तुझ्या-माझ्यात

नयनांची होती भाषा अपुली हात हाती गुंफले
स्पर्शातले जिव्हाळे खुदखुदले तुझ्या माझ्यात

मोकाट रानवार्‍याने वनी फुलवला मोरपिसारा
प्रीत मोर साजणी इथे नाचले तुझ्या माझ्यात

आव्हान जरी असले अपुल्या प्रेमात गं विरहाचे
आठव गुजगोष्टींचे होते रुजले तुझ्या माझ्यात

नको साठवू नयनी अश्रु नको अश्रुंची बरसात
ओघळू दे मोती शिंपल्यातले तुझ्या माझ्यात

गूढ नाते अपुले कधी उकलावे कधी उमलावे
अनेक हळवे क्षण गहिवरले तुझ्या माझ्यात

वेड्या मनाने केली असेल का रे मनाची खोडी
तरीच भुलुनी हे स्वप्न हरवले तुझ्या माझ्यात

धुंद धुंद मधुमास झाला गंधित मंद मंद श्वास
मिलन हे असे अवचित घडले तुझ्या माझ्यात

दीपिका 'संध्या'

मी तर आत्ताच हे केलंय......

काचेची बरणी आणि दोन कप चहा

आयुष्यात जेंव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी कराव्याशा वाटतात आणि दिवसाचे चोवीस तासही अपुरे पडतात तेंव्हा काचेची बरणी आणि दोन कप चहा आठवून पहा.

तत्वज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना काही वस्तू बरोबर आणल्या होत्या. तास सुरू झाला आणि सरांनी काही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात पिंगपाँग चे बॉल भरू लागले. ते भरून झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पूर्ण भरली का म्हणून विचारले. मुले हो म्हणाली. मग सरांनी दगड खड्यांचा डब्बा घेऊन त्या बरणीत रिकामा केला. आणि हळूच ती बरणी हलवली. बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले. त्यांनी पुन्हा मुलांना बरणी भरली कां म्हणून विचारलं. मुलांनी एका आवाजात होकार भरला. सरांनी नंतर पिशवीतून आणलेली वाळू त्या बरणीत ओतली. बरणी भरली. त्यांनी मुलांना बरणी भरली का म्हणून विचारलं. मुलांनी ताबडतोब हो म्हंटलं. मग सरांनी टेबलाखालून चहा भरलेले दोन कप घेतले आणि तेही बरणीत रिकामी केले. वाळूमध्ये जी काही जागा होती ती चहाने पूर्ण भरून निघाली. विद्यार्थ्यांमध्ये एकच हशा पिकला. तो संपताच सर म्हणाले, ''आता ही जी बरणी आहे तिला तुमचं आयुष्य समजा.

पिंगपाँगचे बॉल ही महत्वाची गोष्ट आहे- देव, कुटुंब, मुलं, आरोग्य, मित्र आणि आवडीचे छंद- - - ह्या अशा गोष्टी आहेत की तुमच्याकडचं सारं काही गेलं आणि ह्याच गोष्टी उरल्यात तरी तुमचं आयुष्य परिपूर्ण असेल.... दगड खडे ह्या इतर गोष्टी म्हणजे तुमची नोकरी, घर आणि कार किंवा तत्सम.... उरलेलं सारं म्हणजे वाळू- म्हणजे अगदी लहान सहान गोष्टी....ज्या आवश्यक जरी नसल्यात त्या असतांना आपल्या जीवनांतील आनंद द्विगुणित करण्यात मदत जरूर करतात.

''आता तुम्ही बरणीमध्ये प्रथम वाळू भरलीत तर पिंगपाँगचे बॉल किंवा दगड-खडे यांच्यासाठी जागाच उरणार नाही. तीच गोष्ट आपल्या आयुष्याची. तुम्ही आपला सारा वेळ आणि सारी शक्ति लहान सहान गोष्टींवर खर्च केलीत तर महत्वाच्या गोष्टींसाठी तुमच्यापाशी वेळच राहणार नाही. तेंव्हा... आपल्या सुखासाठी महत्वाचं काय आहे त्याकडे लक्ष द्या.''

''आपल्या मुलांबाळांबरोबर खेळा. मेडीकल चेकअप करून घेण्यासाठी वेळ काढा. आपल्या जोडीदाराला घेऊन बाहेर जेवायला जा. घराची साफसफाई करायला आणि टाकाऊ वस्तुंची विल्हेवाट लावायला तर नेहमीच वेळ मिळत जाईल.''

''पिंगपाँगच्या बॉल ची काळजी आधी घ्या. त्याच गोष्टींना खरं महत्व आहे. प्रथम काय करायचं ते ठरवून ठेवा. बाकी सगळी वाळू आहे.''

सरांचं बोलून होताच एका विद्यार्थिनीचा हात वर गेला. तिनं विचारलं, ''ह्यात चहा म्हणजे काय?''
सर हसले नि म्हणाले, ''बरं झालं तू विचारलंस, तुझ्या प्रश्नाचा अर्थ असा की आयुष्य कितीही परिपूर्ण वाटलं तरी मित्राबरोबर १-२ कप चहा घेण्याइतकी जागा नेहमीच असते.''

आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर हा विचार वाटून घ्या.
मी तर आत्ताच केलंय ते...तुम्हाबरोबर....खऱंय नं....

दीपिका 'संध्या'

शनिवार, २७ जून, २००९

रूपात तुझिया

अवतरला चंद्र नभीचा रूपात तुझिया
खुणवतो चंद्र अंगणीचा रूपात तुझिया

हसणे अवखळ,गात्री चैतन्याची सळसळ
असे मादक दरवळ मिलनात तुझिया

घेशील गीत माझे कुशीत जेंव्हा रात्री
स्वप्ने चांदराती रंगली रंगात तुझिया

नांव तुझे ह्या ओठावरी जणु विसावले
रोमांचित मी सामावले ह्रदयात तुझिया

आहेस अपार अथांग तू सागरासम
विरले सरिते परी अंतरात तुझिया

ऋणानुबंधच हे, होता जरी नवखा तू
जीवन मम फुलले जीवनांत तुझिया

दीपिका 'संध्या'

शब्द आणि संवाद

शब्द आणि संवाद सध्याच्या धकाधकीच्या आणि भागा-दौडीच्या आयुष्यात दुर्मिळ होत चालले आहेत. धावत-पळत काही लोक संवाद साधतात.. तर कोणी घरी वेळ मिळत नाही म्हणुन फोनवर बोलतात. वेगळ्या वेगळ्या वेळी कामावर जाणार्‍या एकाच घरांतील नवरा बायकोला चिठ्ठी लिहून संवाद साधावे लागतात. ह्या सगळ्या प्रकरणात संवादात ज्यास्त शब्दांना जागाच नसते. अगदी मोजके आणि त्रोटक असतात.

जुनी नाती जपायला जुने संवाद अनमोल ठरतात. शाळेतल्या किंवा कॉलेज च्या मित्र-मैत्रिणींबरोबरची आपली शब्दखेळी वयाच्या पन्नाशी ला पोहोचल्यावर सुद्धा मनाला आनंद देऊन जाते. ते मंतरलेले प्रेमाने भरलेले दिवस जरी उडले असतील तरी मनांच्या कोंदणात कोरलेले असतात. त्याच वेळी जुने शब्द-संवाद कटु आठवणीची सल देत असतात. अशा आठवणींना मनांत पक्के रोवू न देणेच योग्य असते. ज्यांच्याशी संबंधित ह्या कटु आठवणी असतात त्यांची नंतर आयुष्याच्या पुढच्या वाटचालीत कधी भेट पण होत नाही मग त्या संवादांची आठवण कशाला हवी... पण असं होत नाही...

शब्दांची किंवा संवादाची भाषा पण तर वेगवेगळी असते. कवि आपल्या कवितेत-शब्दात, तबला वाजवणारा त्याच्या ठेक्यात, गायक आपल्या सुरांत शब्द संवाद साधत असतो. ह्या सगळ्याची जाण असणार्‍याला त्याच्या संवादाचा अर्थ पण नक्कीच समजतो. प्रत्येक ठिकाणी अर्थांचा गाभारा खूप मोठा भासतो. तो उलगडून-समजून आपल्याला ते शब्द-संवाद जाणवावे लागतात.

त्या-त्या वेळी उच्चारलेले ते ते शब्द-संवाद कधी कोणाला दुखवू शकतात तर कधी खूपच सुख देऊन जातात. परिमाण व परिणाम वेगळे-वेगळे... बोलण्याच्या व रागाच्या भरांत मने दुखवली जातात व पश्चातापाशिवाय हातात काहीच उरत नाही...नंतर असं पण जाणवतं की कधी कधी मौनाचीच भाषा.. मौन शब्द-संवादाचाच मोलाचा वाटा असू शकतो.

लहान बाळाचे बोबडे बोल बिनाअर्थाचे खूप काही सांगून जातातच. तसंच निसर्गाशी वारा-पानांची सळसळ, फुलांचा सुगंध, पक्ष्यांची किलबिल पण आपल्याशी जणू संवादच साधत असतात. जवळीक निर्माण करत असतात.

मनांतल्या मनांत साधणारे आपलेच संवाद मात्र कधी कधी वाचायचे बोलायचे राहूनच जातात.

एका आजींची गोष्ट आठवते. मुलगा राजू आधी शिक्षण आणि नंतर नोकरीच्या निमित्याने अमेरिकेत स्थायिक होतो. सुरूवातीला नियमित होणारे फोन अनियमित होतात. दरवर्षी होणारी भारतभेट पुढे जाऊन दोन-तीन वर्षाने होऊ लागली. राजू अमेरिकेला गेल्यानंतर ३ वर्षांनी त्याच्या वडिलांचा स्वर्गवास झाला. आईला पैसे पाठवणे ज्याची की खास अशी गरज नव्हतीच पण राजू स्वतःचे तेव्हढेच कर्तव्य समजून पार पाडत होता.

४ वर्षांनी जेंव्हा १० दिवसांचा वेळ काढून तो एकटाच आला कारण मध्यंतरीच्या काळात त्याने तिकडच्याच अमेरिकन मुलीशी विवाह केला होता. आई ला चालणार आहे की नाही ह्याची विचारणा पण न करता लग्नं केले.

भारतात आईला भेटायला आल्यावर त्याच्या लक्षात आले की आई स्वतःशीच संवाद करते. त्याला कळेना हे काय चाललंय... स्वावलंबन तर आई चं होतंच पण हुनर होतं की मी एकटी राहू शकते. संगी साथी असे की जे मुलाने सोडली तशी साथ कधीच सोडणारे नाहीत हा विश्वास.

'रात्री आला नाहीस म्हणुन बरी रे झोप झाली माझी' असं डासाला उद्देशून म्हणायची. नारायणा ला म्हणायची, 'चल बाबा कामाला लागू.'
दार उघडल्याबरोबर वार्‍याची झुळुक काय आली तर म्हणे आई, 'अगदी वाटच बघत असतोस रे दार उघडण्याची...' केर काढता काढता केरसुणी ला म्हणत, 'तुझं आणि माझं नशीब सारखंच गं...काम झालं की कोपर्‍यात निमुट बसून रहायचं..खरंय नं....' आणि हसली आई....
झोपाळा कुरकुरला की म्हणायची, 'कुरकुर करून कसं चालेल...जितकं आयुष्य देवानं बहाल केलं आहे ते आनंदाने जग रे बाबा...'

दिवस रात्र असे आई चे स्वतःशी संवाद ऐकुन राजू घाबरला. त्याला वाटले आई ला वेड लागले आहे व मानसिक विकार तर नाही तिला ह्या विचाराने त्याने तिला मानसोपचारतज्ञ कडे नेण्याची गरज आहे.

शेजारच्या काकूंना जेंव्हा हे समजले तेंव्हा त्यांनी सांगितले राजू ला की सगळ्याला जबाबदार त्यांचे एकटेपण आहे. त्यांना डॉक्टर ची नाही सहवासाची आणि संवादाची गरज आहे. पुढे त्या काकू म्हणल्या की त्यांच्या एकटेपणात त्यांनी ह्या सगळ्या साथादारांना आपल्या जीवनांत समाविष्ट करून घेतले आहे ज्यांच्या सहवासात त्यांना एकटेपणा जाणवत नाही त्यांच्याशी त्या गप्पा मारून आपलं मन रमवतात.

जगाने कदाचित त्यांना वेडं ठरवलं पण असेल...पण त्यांना गरज संवादाचीच आहे...

बघितलंत नं मंडळी...किती शब्द-संवादाचं महत्व आहे आपल्या जीवनांत...

शब्द शब्द गुंफुनी प्रेम धागा विणू या
नको भाषा मौना ची सुसंवाद साधू या

दीपिका 'संध्या'

शनिवार, २० जून, २००९

नको दुरावा...

मौनाचा कोलाहल आता सोसवेना
एकांताचा आकांत आता सोसवेना

व्यर्थता आहे आज जागण्यात ही
स्वगत माझे मलाच आता ऐकवेना

नाही धरबंध ह्या बोलण्या हसण्याला
स्वप्नांचा पसारा पण आता आवरेना

बेधुंद रोज रात्री आठवांत तुझिया
नयनी अश्रुंना शांत आता बसवेना

धरी हात घट्ट हातात सोडू नको
विरह अन हुरहुर आता पेलवेना

बकुळीच्या फुलांनी सजव रानवाटा
ठेचाळत काट्यांवरी आता चालवेना

दीपिका 'संध्या'

रविवार, १४ जून, २००९

तूच आठवावी....


आज अचानक....

१० जून ची गंध-सुगंधित फुले....

१० जून चा दिवस दरवर्षी येतो आणि जातो. गेल्या ५-६ वर्षात वाढदिवस साजरे करणे आमचे कमीच झाले आहे. दोघंच दोघं आणि हल्ली काही साजरं करायचं म्हंटलं की रात्री बाहेर जेवायला जाणे हेच... मधेआधे तसंही बाहेर जेवायला जातच असतो तर त्याचाही कंटाळाच येऊ लागलाय.

कालचा १० जून पण नेहमी सारखाच जाणार हे जवळपास ठरलेलंच होतं. मुलं अमेरिकेला आहेत पण त्यांच्या रात्री १२ वाजता म्हणजे इथल्या १० जून ला सकाळी चहा घेता घेताच स्काइप मधे शुभेच्छा मिळाल्यात. आणि दिवसाची सुरूवात झक्कास झाली... आणि ऑरकुट कडे वळले. ऑरकुट मधे कमीत कमी २० दिवस आधीपासुनच सांगायला सुरूवात होते की वाढदिवस येतोय वाढदिवस येतोय...

ऑरकुट ची इतकी सारी मित्रमंडळी...सगळ्यांच्याच शुभेच्छांचा पाऊसच पडला होता. खूप छान वाटलं. चिंब चिंब भिजलेच जणु. फोनवर पण शुभेच्छा सुरूच होत्या. कुठल्या न कुठल्या मेसेंजर मधे कुणी न कुणी ठक-ठक करतंच होतं. सगळ्यांशी बोलता बोलता व ऑरकुट मधे धन्यवाद देता देता दिवस सरत आला. दोघांनाच कुठे जायचा कंटाळा येतोय असं ऐकल्याबरोबर स्मिता म्हणे की आपण सगळे जाऊ या आणि आजचा दिवस नेहमीपेक्षा जरा वेगळा साजरा करू या......त्यामुळे रात्री बाहेर जेवायला जायचा कंटाळा होणार नव्हता....५ वाजतांच बहुतेक हे घरी येतील असा अंदाज होता पण तो थोडा चुकला. त्याला कारण ही तसंच होतं.

वाट बघतच होते तर फोन वाजला...एका फ्लॉवर शॉप मधुन फोन होता. तुमच्यासाठी फुलांचा गुच्छ आला आहे तर तो घरी आणुन द्यायचा आहे तर पत्ता सांगा. अंदाज आलाच होता की हे अमेरिकेहुनच आले असणार. सगळ्याच गोष्टींमधे लग्नानंतर फरक पडतो तसा मुलांच्या लग्नानंतरचा हा पहिला बदल मला जाणवला. एकदम प्रशंसनीय बदल...आमची एकमेकांची शुभेच्छा देणे-घेणे त्या-त्या महत्वाच्या दिवशी होतेच..ह्यात शंकाच नाही. ह्या चार पाच वर्षात ऑनलाइन फुले काय, वस्तु काय...सगळ्याचीच देवाण-घेवाण जगभरात कुठेही होते हे माहीत होतेच पण कधी त्या दिशेने आम्ही चौघांनी विचार केला नव्हता. मुलांची लग्न ठरल्यानंतर पण लग्नाच्या आधी माझ्या मुलींना इथुन त्यांच्या वाढदिवसाचे वगैरे काही पाठवायचे होते म्हणुन ह्या ऑनलाइन भेटवस्तु देण्याचा प्रथम प्रयोग आम्ही व अमेरिकेहून मुलांनी केला. भारतात तर पूर्णपणे यशस्वी झाला. त्याच प्रकाराने माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आमची मुलं आणि मुलींनी(सुना) अशी फुले आई ला पाठवायचे ठरवुन ह्या आईला एकदम चकित आणि आनंदित केले. जेंव्हा मला ती फुले मिळालीत...सांगता येणे अशक्य आहे माझ्या मनांतले विचार...नेहमीप्रमाणे आनंदाने, प्रेमाने, कौतुकाने....डोळे पाणावलेच.. माझा जिवलग तर जवळ आहेच...पण काही क्षण त्या विश्वात रमले जिथे माझी ही चारही मुलं ह्या फुलांच्या जागी हसत असलेली वाटली... मनांत नाच धरून नाचत असलेल्या मुलांचा (अमेरिकेत तेंव्हा सकाळ झाली होती नं...) तेंव्हाच फोन पण आला शुभेच्छांसाठी... चौघांनी पण एकाच सुरात आई ला ''आई...वाढदिवसांच्या शुभेच्छा....'' म्हंटले....(जसं तुला आत्ता छान वाटलंय नं..तसंच तुझी फुलं मिळाल्यावर आम्हाला वाटलं होतं गं आई...असं माझ्या मुली म्हणायला विसरल्या नाहीत...धन्य धन्य ही आई....)

संध्याकाळी ह्यांची वाट बघतच होते. बेल वाजली..दार उघडुन बघते तर काय...हातात सुंदर फुले घेऊन अहो उभे होते...आज तर धक्के वर धक्क्यांचा दिवस उजाडलेला दिसतोय. असे तर कधी झाले नव्हते. खुप खास वर्षांचा असावा (जसा ५० वा) असा काही आजचा वाढदिवस पण नाही...मग काय झालं बुवा एकदम... असे पण विचार डोकवुन गेले मनांत की मुलींनी आणि बाबांनी मिळुन ९ तारखेला काहीतरी चर्चा करून ठरवलेलं दिसतंय. अशी संगनमतं आई मुलींची किंवा बाबा मुलींची सुरू असतात.. मज्जा येते. आनंदात अजुनच भर पडली. आता अजुन पुढे काय काय आश्चर्य माझी वाट बघताहेत कुणास ठाऊक...
घरी थोडे फोटो काढलेत...फुलं आमची बैठक सजवत व सुगंधित करत होते. रात्री जेवायला जायचेच होते. स्मिता कडचे सगळे व आम्ही जेवायला गेलो. तिथे मेणबत्तीच्या अंधुक उजेडात....सुंदर सुंदर पेयांचे रंग-बिरंगी ग्लास, मस्तं चविष्ट जेवण.. टेबल सजले होते. जेवणाचा आस्वाद मनसोक्त घेतच होतो तर हॉटेल चे काही थोडे लोक व बाकी सगळ्यांनी गाणं गाऊन वाढदिवसाची सांगता झाली. गाणं वगैरे म्हणजे जरा लाजच वाटली...हे काय ह्या वयांत...

पण इतकं मात्र खरं की न ठरवता व ध्यानी मनी नसतांना कुठेतरी वेगळाच वाढदिवस साजरा झाला. हे माझ्या वाढदिवसाच्या कौतुकाबद्दल लिहीणे नाही तर माझा हा संपुर्ण दिवस ज्यांच्यामुळे इतका मला आनंद देऊन गेला त्या माझ्या पतिराजांचे, माझ्या मुला-मुलींचे आणि अर्थातच मैत्रिण व तिच्या परिवाराचे.....सगळ्यांचे कौतुक करण्यासाठी आहे... भावना पोहोचवायला असे काही करण्याची गरज नसते हे नक्की पण त्यांना करण्यात आणि मला करवुन घेण्याचा पण आनंद अपरिमीत आहे.

यंदाचा योगायोग पण असाच आहे की २८ एप्रिलचा ह्यांचा वाढदिवस २-३ दिवस आधीच (कारण आम्ही सगळेच पुण्याहुन रुचिर शिशिर चे लग्न आटोपुन २५ ला निघणार होतो) मजा म्हणुन चारही मुलांनी अवघ्या तासांभराच्या तयारीने आम्हाला उभयतांना उडवुनच टाकले होते. आम्ही दोघे बाहेर जाऊन तासाभरांत परत आलो तर दार उघडल्याबरोबरचे दृश्य विश्वास बसेना असे होते. एकदम जय्यत तयारीने चौघांनीही बाबांचे स्वागत केले व केक वर मॅजिक कैंडल लावुन आपल्या बाबांची खूप परिक्षा पण घेतली ज्या शेवटपर्यंत ह्यांना विझवताच आल्या नाहीत. मज्जाच मज्जा. एकमेकांना केक खाऊ घालण्यात रमले सगळेच.. त्यावेळी हे पण सगळे जाणुनच होतो की असा योग पुन्हा जेंव्हा येईल तेंव्हा...हा दिवस आमचा सगळ्यांचा..

तसाच माझा हा वाढदिवस पण सगळीकडुन आश्चर्य व आनंदाने न्हालेला अभूतपूर्व होता. काही काही क्षण असे होते कालचे की मी खूप भरभरून जगलेय..अशीच ही प्रेमभरली संजीवनी आम्हा उभयतांना मिळत राहणार हा विश्वास आहे.

तर असे ह्यावर्षी आमचे दोघांचे ही वाढदिवस काही तरी वेगळेपण जगवून गेलेत...आनंदावर बोलून गेलेत...


कुसुमासम फुलणारा दिवस आजचा
गंध सुगंधित होणारा दिवस आजचा

अवचित अगणित सुख हसले अंगणी
चैतन्याने मोहरणारा दिवस आजचा

भावना अंतरातील आप्त स्वजनांच्या
चिंब चिंब भिजवणारा दिवस आजचा

साजर्‍या स्वप्नांतच की सत्यात मी?
कधीच न विसरणारा दिवस आजचा

दीपिका'संध्या'

सोमवार, ८ जून, २००९

आजीचा खाऊ

फरीदाबाद ला होतो तेंव्हा दिल्ली ला जाणे येणे आगगाडीने किंवा बसने करत असू. मुलं लहान असतांना बस पेक्षा आगगाडीने प्रवास थोडा सुखाचा वाटत असे. एकदा असंच दिल्ली ला निघालो होतो. बसायला जागा मिळालीच होती. आमच्या समोरच्याच बाकावर एक जख्ख म्हातारी बाई बसली होती. सुरकुत्यांनी भरलेले शरीर, तोंड बिना दातांचे गोल गोल, सुपारी सारखा छोटासा आंबाडा, हातात एक पिशवी होती जी चिप्स, नमकीन, काही मिठाई, बिस्किटांनी भरलेली होती. माझ्या मनांत आले बहुतेक आपल्या नातवंडांसाठी घेऊन जातेय ही आजी इतका मोठा खाऊ...हसायलाच आले मला..

जसे एक दोन स्टेशन्स गेलेत...ती आजी उठून उभी राहीली. हात पाय थरथरतच होते. कधी लोकांच्या खांद्यावर तर कधी बाकाला धरून पुढे पुढे जात होती. जेंव्हा तिने ''चिप्स घ्या, मिठाई घ्या...आपल्या मुलांना खुश करा...'' असे म्हंटले तर माझा विश्वासच बसेना.

पण झाले असे की ती आजी दुसर्‍या दिशेला निघाली होती. ऐकायला पण बहुधा तिला कमी येत असावे त्यामुळे गाडीतल्या बाकीच्या आवाजात माझी हाक तिच्यापर्यंत पोहोचलीच नाही. उठुन जाईन म्हंटले तर मुलं मांडीवर होती व गर्दी पण खुप. व क्षणभर विचार पण मनांत आला की कुठे सामान वाढवा, मुलं बरोबर आहेत, दिल्ली ला उतरल्यावर बस रिक्षा ने पुढचा प्रवास करायचा आहे...म्हणुन पण दुर्लक्ष झाले असेल माझे. त्याचमुळे मी ह्याची काहीच वाच्यता न करता चुपचाप आपल्या दिल्ली स्टेशनची वाट बघत बसले. पण इथुन माझी नजर त्या आजीवरून मात्र ढळत नव्हती. चुकल्यासारखे वाटत होते. पुढच्या भागात बसलेल्या एका महिलेने आजीकडुन खुप सामान विकत घेतलेले मी बघत होते. मनांतुन आनंदले होते मी की त्या म्हातार्‍या आजीला थोडा तर हातभार नक्कीच लागला असेल. व तिच्या पिशवी मधला भार-वजन कमी झाले असेल.... पण माझी खंत इतकी वाढली ते बघुन की मी ती थोडी माझ्या दृष्टिपथात होती किंवा मी उठुन का गेले नाही की जेणे करून मी तिला थोडी खुशी देऊ शकले असते व त्याच खुशीत मी स्वतःला पण खुश ठेऊ शकले असते.

आता उपयोग नाही.. बराच काळ लोटला आहे पण त्या आजी ला मला भेटण्याची मनांपासुन इच्छा आहे. नंतर मुलांना गोष्टी सांगतांना त्या आजीबद्दल मी खुप काही सांगितले आहे. तर त्याच आज्जीकडुन खाऊ आणुन मुलांना खाऊ घालावा असं वाटत राहीले. माझी झालेली चुक कशी होती ते सांगत असते जेणे करून मुलांनी पुढे असा कधी प्रसंग आलाच तर नेहमी मदतीचा हात पुढे करावा. अशा स्वाभिमानी लोकांना मदतीचा हात भीक म्हणुन नव्हे तर त्यांच्या श्रमाचा मोबदला म्हणुन हवा असतो. मी त्यानंतर कधीही अशी चुक केली नाही. ठेच लागली की माणुस बघुनच पावले टाकतो. पण ही चुक पुन्हा होणे नाही आणि करणे पण नाही हं मंडळी.

आजी ती कुठे रे हरवली
खाऊ सगळ्यांनाच देणारी
पेपरमिंट चिप्स बिस्किट
बालगोपालांनाच वाटणारी

नव्हते दांत तिच्या मुखी
आशीर्वादाचे बोल बोलणारी
होई भार हा गरिबीचा अति
पण स्वाभिमानाने पेलणारी

ऐकुच येत नाही हो तिजला
साद कुठली तिला पोचणारी
नयन शोधती त्या आजीला
खंत आहे कधी न संपणारी



दीपिका 'संध्या'

गुरुवार, ४ जून, २००९

रातराणी पसरविली रे......

मज सवे स्वप्ने पाहिली रे तूच ती
रंगात मेंदीच्या रंगविली रे तूच ती

ओठावर रुळला होता मूक हुंदका
फुले हास्यांची सजविली रे तूच ती

दाही दिशा मजसि हळुवार वाटल्या
अचानक प्रीत जागविली रे तूच ती

झोपलेल्या रानांत काळोख अति गर्द
काजव्यांना वाट दाखविली रे तूच ती

दाटून आला उर कसा ह्या सांजवेळी
गोड मिठीत रात्र फुलविली रे तूच ती

चांदणे फुलांचे शिंपले कुणी आकाशी
धरावर रातराणी पसरविली रे तूच ती

दीपिका 'संध्या'

बुधवार, ३ जून, २००९

जर लक्षात आले असते तर......

आई चे स्थान अतिशय उच्च आहेच पण कधी कधी बघा कसे मनांत विचार उचंबळून येतात- तुमच्या आमच्या सारख्या सामान्यांच्या मनांत..

जीवनाच्या एका वळणावर पोहोचल्यावर मागे वळून बघता.....साधारण व्यक्तिच्या मनांत येणारी ही गोष्ट आहे....
घरोघरी घडणारी पण....काळ जातो...वेळ निघून जाते...हातात काही नाही...


जेंव्हा मी चार वर्षाचा होतो तेंव्हा- 'माझी आई माझे सर्वस्व आहे.... शी इज द बेस्ट!!'
आठ वर्षांचा झालो तेंव्हा मित्रांमधे आई चे स्थान उंचावरच - 'माझ्या आई ला सगळे काही येते हं...काय वाटले तुला यार....'

बारा वर्षाचा होता होता - 'माझी आई ना मला समजूनच घेत नाही बघ...'
जेंव्हा पंधरा वर्षाचा झालो - 'माझी आई मला सगळ्या ठिकाणी टोकतच राहते, अजिबात काही करूच देत नाही..'

अठरा वर्षाचा वाढदिवस झाल्या झाल्याच - 'कमॉन आई, आता मी कायद्याने सज्ञान म्हणवला जातो हां, माझ्या मधे मधे केले नाहीस तर नाही का चालणार तुला...'

पंचवीस वर्षाचा झालो तर सल्ले मिळू लागलेत - 'काही पण करण्याच्या आधी जर एकदा आईला विचारशील तर बरे होईल नं..'

पन्नाशी गाठतांना वाटले होते.- 'आई समोर नाहीये पण असती तर आज ह्या गोष्टीवर आईचे म्हणणे काय राहीले असते काय माहीत..'

आज माझी सत्तरी येण्यात आहे...वाटतेय - 'आज आई राहीली असती तर.....'

आई समोर असतांना गृहित धरलेच जात नाही...विचारही होत नाही तिच्याबद्दल..पण ती मात्र करत झिजतच राहते सगळ्यांसाठी... जेंव्हा महत्व कळते तोपर्यंत नको तितका काळ लोटलेला आहे हे लक्षांत येते....आहे ना...

दीपिका 'संध्या'

मंगळवार, २ जून, २००९

कशी कशी ही प्रेरणा...

रोजच्या सकाळ संध्याकाळच्या चाल-चाल-चालण्याने टस से मस फरक न पडता वजन वाढतच होते इथे ह्या कुवैत मधे... :) ५ वर्षापुर्वी जेंव्हा वजन वाढलंय ते कमी करायलाच हवंय ह्या प्रेरणेने मी पुण्यात दाखल झाले. २ महीने राहिले व हवं तेव्हढं वजन कमी करून परत आले. येतांना रामदेवबाबांच्या योग साधनेची सीडी घेतली. वजन जिथल्या तिथे ठेवायचे ते योगा व बाकी व्यायामाने ह्या मतावर मी ठाम होते.

मी व माझे पति ईमानदारीने हे सगळं करत होतो. मित्रमंडळींमधे 'दीपिकाचं वजन कमी झालं' हा चर्चेचा विषय होता. (आता पुन्हा वजन वाढलंय हा चर्चेचा विषय असू शकतो.. :) )माझा तर हे योगा प्राणायाम व व्यायामावर इतका विश्वास बसला की मी त्याचा उगीचच बिनकामाचा प्रचार करू लागले.. :)  ज्यांना गरज आहे त्यांना आणि नाही त्यांना पण मी पटवून देण्याचा प्रयत्न करत असे. इतकंच काय तोंडी बोलून-सांगून काही उपयोग होत नाही हे बघून मी त्या रामदेवबाबांच्या सीडी च्या प्रति बनवल्या व त्या द्यायला सुरूवात केली. थोडी बारीक झालीय असं तेंव्हा कौतुक करणारे लोक आता माझी खिल्ली उडवायला लागलेत. आमचा ४-५ परिवारांचा समूह एका आठवडी सुट्टीच्या दिवशी..शुक्रवारी (इथे जुम्मे जुम्मे सुट्टी नं) सकाळी आमच्याच कडे ती सीडी आम्ही लावली की मिळून बघू या. प्राणायाम ची सीडी बघता-बघतांच इतक्या त्यावर वाट्टेल तशा प्रतिक्रिया येऊ लागल्यात की दूसरी योगासनाची सीडी लावायची मी हिम्मतच केली नाही. ह्याच सगळ्यांमधे शैलेश पण होता.

कोणाला काहीच सल्ला किंवा ह्या विषयावर चर्चा न करण्याची शप्पथ घेऊन मधल्या काळांत आमचा दिनक्रम तसाच सुरू होता. शैलेश वर्षभरांपुर्वी जरा आजारी पडला. दवाखान्यात किडनी च्या थोड्या विकाराने भरती होण्याची वेळ आली. घरी आल्यावर त्याला एक दिवस लिफ्ट मधे 'आर्ट ऑफ लिविंग' बद्दल माहिती देणारा कागद मिळाला. काय विचार आला मनांत तर त्या कागदावर दिलेल्या फोन नंबर वर फोन केला. आणि 'आर्ट ऑफ लिविंग' च्या 'श्री श्री योगा' मधे जाऊ लागला. मला फक्त इतकंच कानांवर आलं त्याच्या पत्नी कडून की तो काही तरी योगा करायला जातोय. मी दुर्लक्ष केलं. :)

एक आठवडा झाल्यावर बघितलं तर भेटल्यावर फक्त योगा प्राणायाम, श्री श्री योगा, आर्ट ऑफ लिविंग शिवाय दुसरा विषयच नाही. आम्हा उभयतांना कळलंच नाही की हे काय होतंय...काय घडलंय.. आधी 'समय नहीं मिलता.. ऑफिस में बहुत काम है.. थक जाता हूँ...वगैरे वगैरे (शैलेश गुजराती आहे त्यामुळे आमचं संभाषण हिंदीत असतं). आता त्याला सकाळी ५ वाजता उठून योगा प्राणायाम व सुदर्शन क्रिया करायला वेळ मिळतोय, ऑफिसमधले काम वाढलंय पण तक्रार नाहीये, थकलो ही तक्रार तर कधी नंतर कानावर आलीच नाही.

त्याच्याच प्रोत्साहनाने त्याच्या पत्नी ने, मुलीने आणि नंतर आम्ही दोघांनी पण 'श्री श्री योगा' केले. इथे दर शुक्रवारी सकाळी ५ वाजता सराव करायला सगळे जमा होतात. कोणाला जबरदस्ती नसते पण तिथे शैलेश प्रथम क्रमांकावर आहे. (आहे नं गंमतशीर...) आम्ही नाही जात कारण एक दिवस आराम हवा तो आराम ही आम्ही इमानदारीने करतो पण बाकी आठवड्याचे सहा दिवस योगा प्राणायाम ही तितक्याच इमानदारीने करतो. हा पठ्ठा सातही दिवस करतोच करतो. त्या पुढचा कोर्स (पार्ट वन) केलाय. आता अशी परिस्थिति आहे की कुठे ही आर्ट ऑफ लिविंग चा काही ही कार्यक्रम असेल, कुठे कुठली सीडी ह्याच संदर्भातली दाखविणार असतील, कोणाचे भाषण असेल तर तिथे तो जातोच.

त्याला आता आम्ही असं चिडवतो की कुवैत ला आता नवीन श्री श्री रविशंकर म्हणून शैलेश शंकर नावारुपाला आणि त्यांची जागा घेणार, थोडेच दिवसांत 'आर्ट ऑफ लिविंग' च्या प्रचाराप्रित्यर्थ शैलेश शंकर कुवैत हून सगळीकडे जाणार....असो...हा विनोद झाला पण त्याच्या जीवनशैलीत असा वाखाणण्याजोगा बदल झालाय हे बघून खूप आनंद होतो. माझ्या सांगण्याचा न झाला तरी असाच का होईना...पण आदर्श वाटावा असा...

आयुष्यात कुठली गोष्ट कशी कधी आपल्या जीवनांत बदल घडवून आणेल, किती खोलवर परिणामकारक ठरेल काहीच सांगता येत नाही ह्याचे हे एक जीवंत उदाहरण आहे. जसे इथे कागदाचे साधे चिटोरे... ते पण लिफ्टमधे फेकलेले, पायदळी तुडवलेले, चुरगळलेले-मरगळलेले. पण बुद्धि व्हावी ते उचलून बघण्याची व वाचण्याची. त्याही पुढे जाऊन त्यावर विचार करण्याची..सगळेच योगायोग पण आनंद देऊन जाणारे...

फक्त असंच सांगावंसं वाटतं की शरीरात काही असे विकार होऊन मग शिकण्यापेक्षा आजकालच्या धावत्या-पळत्या जगात स्वतःसाठी रोजची १५-२० मिनिटं काढण्याची खूपच गरज वाटते. असेही मत असणारी लोकं भेटलीत की जेंव्हा काही होईल तेंव्हा बघू हो....पण....अहो..असं नको हो...आधीच सावरा की...पण कोणालाच जबरदस्ती नाहीये. आपल्या जीवनांवर पूर्णपणे आपलाच हक्क आहे हे ही तितकेच खरे...(आर्ट ऑफ लिविंग किंवा रामदेवबाबा..योगासन प्राणायाम हाच शेवटी दोघांचा एकच हेतु आहे.)

दीपिका 'संध्या'

मागे वळून बघता...

एक दिवस रोजचा पेपर वाचत बसले होते, एका छोट्याशा लेखावर नजर गेली, अशी मनांत रूजलीय...तुम्ही पण ऐकाच...(वाचाच)

वेस्टमिनिस्टर एबे बिशप च्या कबरी वर एक संदेश लिहीलेला होता, ''माझ्या तारुण्यात ज्यास्त जबाबदारी माझ्यावर नव्हती. माझ्या कल्पनाशक्तिला पण काही मर्यादा नव्हत्या. त्यामुळे मी पूर्ण जगाला- त्यांच्या विचारांना बदलविण्याची स्वप्ने बघत असे. जसे माझे वय वाढले, अनेक अनुभव गाठीशी जमा झालेत. रोजच्याच व्यवहारात मी काही न काही तरी नवीन शिकत गेलो. त्यामुळे हुशार ही झालो. ह्या सगळ्यातूनच मला एक गोष्ट लक्षात आली की जगाला बदलणे इतके सोपे नाही जितके मला वाटत होते.

जीवनाची संध्याकाळ येऊ घालण्याआधीच विचार केला की आपल्या परिवारातच बदल घडवून आणावा आधी, मग बघू जगाचे पुढे. पण कसले काय..अतिशय कठिण..किती ती संकटे...मनांत विचार केला होता की हे तर मी यूं करीन..पण छे... सगळेच आपल्या मर्जीचे मालक आहेत. मुलं काय, पत्नि काय कोणीच ऐकायला तयार नाहीत. कोणीच मला काय म्हणायचे आहे ते समजुन घ्यायला तयार नाही. प्रयत्नांत अजुन थोडी वर्ष अशीच गेलीत. कदाचित हार मानली असावी मी की हे माझ्या आटोक्यात असणारे काम नाहीच. आज मी मृत्युशय्येवर आहे, आणि अचानक साक्षात्कार झाल्यासारखे भासू लागलेय की सर्वप्रथम मी स्वतःलाच बदलण्याचा प्रयत्न करायला हवा होता. कदाचित असे पण झाले असते की माझा आदर्श समोर ठेवून घरातीलच बाकीच्यांमधे काही चांगले बदल घडून आले असते. आणि त्याच आशेने पुढे जाऊन, बदललेल्या आप्तस्वकीयांना बरोबर घेऊन पुढे पुढे पाऊल टाकत आपल्या समाजाला, देशाला आणि त्यानंतर जगाचा कायापालट करू पण शकलो असतो...पण...''

असा अनेक गोष्टींना आयुष्यात आपल्याला उशीर होत असतो. मागे वळून बघता तर येतंच पण हाती काहीच लागत नाही कारण सगळीकडेच गत गोष्टींचे मृगजळ दिसत असते. मी पण अशीच गत आयुष्याचा विचार करता करता कुठवर पोहोचते की हे करायचं राहून गेलं, ते करायचं राहून गेलं. काय काय ते पुन्हा कधी सांगेनच... पण गेल्या ७-८ वर्षात जी दिनचर्या बदलली, मार्ग बदललेत, वेळ घालवायचे साधन बदलले, मन साहित्यात गुंतू व रमू लागले. आता कुठलीच खंत नाही. वयाच्या ह्या पायरीवर हे ही नसे थोडके.......

दीपिका 'संध्या'

बुधवार, २७ मे, २००९

येणार कधी रे...

सजली फुलली रास फुलांची
संध्या छेडते व्यथा मनाची
कातर रात्र घायळ करी रे
सांग सजणा येणार कधी रे

जीवा जळवी वैशाख वणवा
मृगजळ तो आहेच फसवा
अश्रुतच काया चिंब ओली रे
सांग सजणा येणार कधी रे

प्रेम तराणे कानी गुणगुणावे
बेभान धुंदीत स्वप्नी विहरावे
मिसळू दे हा श्वास श्वासात रे
सांग सजणा येणार कधी रे

प्रीतीत हा दुरावा सोसवेना
व्यथित मन कुठेच रमेना
असा मजवरी रुसू नको रे
सांग सजणा येणार कधी रे

दीपिका 'संध्या'

सोमवार, २५ मे, २००९

तू येणार नाही?

बर्‍याच दिवसांनी आज लेखणी हातात घेतली आहे.

गेल्या १० मे ला झालेल्या मातृदिना च्या निमित्याने आई बद्दलच लिहून आता लिखाणात नियमितता आणण्याचा सदैव प्रयत्न करत राहीन असं ठरवलंय तरी..बघू या....

आधी आई बद्दल लिहून झालेच आहे पण तरी आई सदैव ध्यानी मनी असतेच त्यामुळे पुन्हा एकदा थोडे...

माझ्या आई ला जाऊन ४ वर्षे झालीत पण ह्यावेळी असा योगायोग होता की १० मे ला तिचा वाढदिवस व मातृदिवस पण. मागे वळून बघता वाटलं की आई ची सेवा करण्याची संधी आली पण अन गेली पण... कधी सेवा साध्य झाली कधी खंत राहीली. लग्नानंतर जी मी दुसर्‍या प्रांतात गेले ती दूर दूरच राहीले. दरवर्षी आमच्या येण्याची आतुरतेने वाट बघत बसणारी आई आज पण डोळ्यासमोर येते. नागपुर रेल्वे स्टेशनवर प्रत्येक वेळी आमच्या आगमनाच्या वेळी आनंदाने आम्हा दोघींचे पाणावलेले डोळे तर परततांना आता पुढे कधी याल...कधी भेटतील माझी नातवंडे ह्या विचाराने डोळ्यातील अश्रु पापण्यांपलीकडे लपवणारी आणि आई बाबांकडे खूप लाड करून घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेली मी अश्रु गाळत असे. कारण तिच्यासारखी सहनशील कदाचित मी नसेन. मला अश्रु आवरणे शक्य होत नसे. जसे जसे वय वाढू लागले तशी ही सहनशक्ति तिची कमी होत जातांना दिसली. गळ्यात पडून रडणारी आई सामोरी येऊ लागली.

आम्ही औरंगाबादला असतांना हे कुवैत ला आलेत आणि मी मुलांना घेऊन तिथेच राहीले. आमच्या आई कधी बरोबर असायच्या कधी कुठे गांवाला जायच्या. त्या ३ वर्षात जेंव्हा कधी मला कुवैत ला भेट द्यायची असायची तेंव्हा आई बाबा रुचिर शिशिर जवळ येऊन रहायचे. किती सारखे तिला गृहित धरले जायचे ह्याची खंत करावी तितकी थोडी आहे. त्यांचे खूप लाड करायचे. थोड्या दिवसांपुरते का होईना पण मुलांवर होणारी माझी...''हे खायलाच हवे..ते खायलाच हवे'' ही जबरदस्ती बंद व्हायची. त्यामुळे ते ही खुश. आज असं वाटतं तिच्यावर सगळी जबाबदारी टाकून मी जात असे...तिला होणार्‍या त्रासाची मी कधी पर्वाच केली नाही. कुवैतहून जे काही थोडे फार तिच्यासाठी नेले तर नको नकोच करायची. खरंच आई वडिलांची कधीच कसली अपेक्षा नसते. जेंव्हा मी परत यायचे तेंव्हा असं वाटायचं की तिच्या आवडीचे पदार्थ करून तिला खाऊ घालावे, गरम पोळी वाढावी...

प्रत्येक वेळी तिला म्हणायचे की पुढच्यावेळी मी येईन तेंव्हा कुठ्ठे जाणार नाही...आपण खूप गप्पा मारू.. पण मला बाकी माझ्या संसाराच्या रहाटगाडग्यातून तिच्यासाठी वेळ काढायला कधी जमलेच नाही. जेंव्हा जेंव्हा मी तिला आवाज दिला तेंव्हा ती धावत आली पण कधी तिने मूकपणाने हाक मारली पण असेल, मला ऐकूच आली नाही. नातेवाईकांच्या गराड्यात जेंव्हा तिच्याकडे फक्त बॅग ठेवायला जायचे तेंव्हा तिच्या प्रेमभरल्या रागाकडे पण दुर्लक्षच केले गेले. असो...

फक्त तिची एकच अपेक्षा असायची ती म्हणजे माझ्या दर आठवड्यात मिळणार्‍या पत्राची. आम्हा दोघींना इतकी हौस पत्र लिहीण्याची.. जो माझ्या मते फारच विरळा छंद असावा. किती सुख होते त्या पत्रांमधे हे शब्दात सांगणं कठिण. आज ती नाहीये पण त्या पत्रांच्या गठ्ठ्याच्या रुपाने तिच्याशी मी बोलत असते आणि ती माझ्याशी. कारण पत्रांमधे जावयाची बाजू घेऊन मला कधी रागवली आहे, मुलांसाठी कुठला उपदेश केला आहे, कधी समजूतीचे स्वर आहेत, प्रेमाने ओथंबलेली तर आहेतच आहेत. खूप आधार वाटतो ह्या सगळ्याचा मला. परदेशात एकटेपणा खूप आहे पण आमच्या आईंना व माझ्या आई ला १०-१२ दिवसांनी एकदा फोन करून आमचं बोलणं झालं की पुढच्या फोनपर्यंतचे दिवस आनंदात जायचे. आता ती पोकळी भरून कशी निघणार? हल्ली कुटुंब आकुंचन पाऊ लागली आहेत. आणि सगळेच आपापल्या विश्वात रमणारे.

कुठेतरी माहेर थोडे दूर गेल्यासारखे वाटतंय....आता मातृदिनीच काय सदैव ध्यानी मनी वसणार्‍या ह्या दोघीही आई आमच्यात नसल्यात तरी आमच्यातच आहेत हा विश्वास आहे.

आपलेच सगळे माझ्या अवतीभवती
तुजसम मजला दिसले कुणीच नाही

भासले मी वेढलेली प्रेमवलयांत परी
तुझ्या प्रेमाची त्या कणभर सर नाही

जरी भिजले चिंब चिंब पावसांत मी
तुझ्या स्पर्शाचा ओलावा त्यात नाही

सुखदुःखात सगळेच माझ्या संगती
पण नयनांच्या कडा ओलावत नाही

आसवांनी भरू घातली माझी ओंजळ
पुसण्या तव कधीच तू येणार नाही?

आईचीच लाडाची लेक

दीपिका 'संध्या'
१८ मे २००९

काही प्रतिक्रिया

१८ मे २००९

स्मिता- किती सुरेख लिहीले आहेस गं दीपिका...खरंच आईबद्दल लिहावे तितके कमीच असते नं...

१९ मे २००९

अंजला- अगदी मनाला स्पर्श करून गेले....आयुष्यातील उणींव जाणवली...

बाबा एकदा तरी पुन्हा याल ना......

जेंव्हा माझी आई गेली तेंव्हा आम्ही तर खूपच काही गमवून बसलो होतो पण बाबांसाठी मनांत यायचं..त्यांच्या मनाची काय अवस्था असेल. ५ मे २००५ ला च त्यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा केला होता. आणि लगेच १५ मे ला ती गेली. इतका ५० वर्षांचा सहवास, संगिनीच्या जाण्याचं दुःख काय ते कधी बाबा बोलून दाखवित नसत. किती विचारलं तरी अवाक्षर ही तोंडातून काढले नाही. पण तिचे असे निघून जाणे आणि तो त्यांना बसलेला धक्का... त्या धक्क्यातून ते कधी वर आलेच नाहीत हे मात्र खरं.

डायबिटीस सारख्या रोगाने त्रस्त होतेच पण असं पण म्हणता येईल की त्यांनी डायबिटीस ला सुद्धा हरवले होते. एक अनोखे उदाहरणच म्हणता येईल. आम्हा मुलांना नेहमी काळजी वाटायची की ह्या डायबिटीस ने बाबांचं कसं होणार कारण कवडीचेही पथ्य पाणी मंजूर नव्हतं. आंबे खाऊ नका असं आम्ही म्हणत राहू आणि आम्ही त्यासाठी शिव्या खाव्या आणि त्यांनी खावा हापुस आंबा.... असंच सुरू राहिलं शेवटपर्यंत. जेंव्हा शुगर ४०० झाली व डॉक्टरकडे गेले तर डॉक्टरांनी काही म्हणायच्या आत ते म्हणत, ''माझी नॉर्मल शुगर इतकीच आहे हो...त्यामुळे मला काहीच त्रास नाही.''

वयोपरतत्वे व आई च्या जाण्याने व नाही म्हणता डायबिटीस ने तब्येतीत खूप फरक पडला होता. वजन कमी होत चाललं होतं. गेल्या दिवाळीला आम्ही बर्‍याच वर्षांनी पुण्यात गेल्यामुळे ते खुश होते. दिवाळी सगळ्यांनी मिळून साजरी केली. नंतर लगेच काही तरी निमित्य होऊन पडलेत. मांडीचे हाड मोडले. ऑपरेशन झाले, रॉड घातला. पण डायबिटीस ला मात देऊन जखम तीन दिवसांत बरी झाली. रक्तदाब, डायबिटीस पण, व बाकी शरीर तसं सगळं ठीक सुरू (डायबिटीस ला २० वर्षे जोपासून इथपर्यंत चा प्रवास बघता व्यवस्थितच म्हणावं लागेल) .त्यामुळे डॉक्टर पण तसे आश्चर्यचकितच होत असत. जिथे डायबिटीस ने आईचे ह्रदय, एक किडनी, डोळे, पोटाचा त्रास..सगळंच सुरू होऊन त्यातच ती हरली होती, तिथे बाबांचं हे सगळंच चांगलं होतं. नाही म्हणायला थोडा पोटाचा त्रासच काय तो सुरू झाला होता पण त्या मानाने क्षुल्लकच..

नोव्हेंबर मधे पायाचे ऑपरेशन झाल्यावर मी कुवैतला परतले. त्यावेळी नमस्कार केल्यावर मला म्हणले होते की पुन्हा आपली भेट होईल नं ग.... हे वाक्य ऐकून वाटलं की जीवनाची हार मानली होती त्यांनी व आता ह्यातुन बाबा तसे सावरायला तयार नव्हते. मनाने व शरीराने पण. झोपल्या झोपल्या सगळ्यांनाच होतात तसे बेडसोर होऊ लागलेत. अस्थिपंजर शरीर बघवत नव्हते. माझ्या भाऊ भावजयीने कष्टांची व सेवेची पराकाष्ठा केली पण १४ जानेवारीला रात्री आम्ही पूर्णपणे पोरके झालोत. ६ जानेवारीला त्यांचा ८१ वा वाढदिवस झाला होता, मी फोन केला पण त्यांना फोनवर बोलता येत नसल्यामुळे आमच्या शुभेच्छा सांगी-वांगीच त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात.

त्यात कहर म्हणजे इतक्या वर्षांत प्रथमच असं झालं की जेंव्हा बाबा गेल्याचा फोन आला तेंव्हा त्याच क्षणी इथून निघालो तर खरं पण जवळपास २४ तासांने हे नेहमीचे ३ तासांचे अंतर पार करता आले. व बाबा मला अभागीला शेवटचे दिसलेच नाहीत..पण तशी तर मी खूप भाग्यवान की बाबा माझेच बाबा होते..प्रेमळ... जीव लावणारे..दोघी नाती व दोन्ही नातवांवर अपार माया....कसे कसे त्यांना वर्णावे तेव्हढे कमीच...थोडे फार पुन्हा कधी....जानेवारी नंतर लगेच आत्ता एप्रिल मधे पुण्याला जायचा योग आला....घरांत तर खूपच बाबांची उणीव भासली.

आज पितृदिनाच्या दिवशी माझ्या बाबांना ही मानवंदना...

टाकता पाउले हळूच हात सोडत होता
जीवनाची वाटचाल कशी, शिकवित होता
पुढचा मार्ग पण तुम्हीच दाखवाया
बाबा एकदा तरी पुन्हा याल ना

बोलके हसरे तुम्ही किती आधी होतात
वयापरत्वे अबोल असे का हो झालात
पुन्हा अम्हा मुलांना तसेच हसवाया
बाबा एकदा तरी पुन्हा याल ना

ध्यानी मनी स्वप्नी तुम्हीच असता
पडद्याआड गेलात जसा लपंडाव खेळता
एकच वेळा स्नेहाचा हात तो फिरवाया
बाबा एकदा तरी पुन्हा याल ना

तुमचीच लाडकी

संध्या

८ जून २००८


काही प्रतिक्रिया

१० जून २००८

जयश्री

दीपिका…… अगं किती सुरेख लिहिला आहेस लेख !! तुझ्या लेखातून तुमच्या दोघांच्या भावजीवनाचं फ़ार सुरेख वर्णन केलं आहेस गं! अतिशय हळवा आहे लेख !!

माझी दुनिया

१० जून २००८

दिपिका…..खरंच आई वडीलांचं नसणं विशेषत: मुलीचे म्हणजे माहेरचं तुटणं……मी अनुभवतेय ही परिस्थिती…… नंतरच्या आयुष्यात कितीही माणसं आली तरी ही उणीव कधीही भरून निघू शकत नाही.

श्रीकांत सामंत

१५ जून २००९

नमस्कार दीपिका, आत्ता माझ्या लक्षात आलं की कोण ही संध्या आणि कोण ही दीपिका.

आपला ” माझे बाबा” हा पोस्ट मी वाचून माझ्या पत्नीला पण वाचून दाखवला होता.आणि दोघं अक्षरशः रडलो. एक तर मुलगी लिहीतेय-म्हणजे स्त्री आणि प्रेम हे एकाच नाण्याच्या दोन बाजू-आणि किती ते प्रेम आपल्या आईवडिलांवर?.

मला वाटलं होतं की आमचीच मुलगी आमच्यावर एव्हडं प्रेम करणारी आहे.पण ते खोटं ठरलं. आणि ते तसं ठरलं हे बरंच झालं. कारण आपल्या आईवडिलांची जागा आम्ही कदापि जरी घेवू शकलो नाही तरी आम्हाला माधवी बरोबर दीपिका पण एक मुलगी मिळाली नव्हे तर आपल्या आईवडिलांवर इतकं उत्कट, प्रेम आणि त्यापुढे जावून, वडिलांना उद्देशून अंतःकरणापासून लिहीलेली ती कविता, “बाबा एकदां तरी तुम्ही याल ना” ही कविता वाचून क्षणभर, “माझे मरण पाहिले म्यां हेची डोळा”असंच वाटलं. म्हणतात ना, “वेदने नंतरच निर्मिती होते” हे खोटं नाही. निसर्गाचाच तो नियम आहे.

माझ्या लेखनाची आपण भरून भरून प्रशंसा करता पण, “आप भी कुछ कम नही” आपल्या दुःखातही दुसऱ्याला गुलाबाचं फूल पुढे करायला धजता. खरोखरंच आपल्या आईवडिलांचे हे संस्कार असावेत. मंगेश पाडगांवकर म्हणतात,

“एक गोष्ट पक्की असते
तिन्ही काळ नक्की असते
तुमचं न माझं मन जुळतं
त्या क्षणी दोघानाही गाणं कळतं”

अगदी अगदी खरं आहे. आपले हे ही दिवस निघून जातील.

सामंत

संध्या

१७ जून २००८

ती. सामंत काका..
तशी मी तुम्हाला मेल केलीच आहे…पण..इथे पण सांगते…आता तुमच्या अभिप्रायाने माझे डोळे पाणावलेत…
खूप खूप धन्यवाद..

दीपिका ‘संध्या’

महाराष्ट्र दिन २००८

मैतर...

महाराष्ट्र दिनानिमित्य झालेल्या मंडळाच्या कार्यक्रमाला होऊन आठवडा झाला पण अजूनही आम्हा सगळ्यांमधे त्याचीच चर्चा जिकडे तिकडे आहे...ह्या वर्षी कुवैत महाराष्ट्र मंडळाच्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाची जेंव्हा रूपरेखा समजली तेंव्हापासूनच सगळेच १६ मे ची वाट बघू लागले होते. इमेल ने सगळ्यांना कळविण्यात आले होते की 'मैतर' हा कार्यक्रम होणार आहे. त्याच बरोबर कुवैत महाराष्ट्र मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन होणार होतं. यंदा २६ वर्षे पूर्ण झालीत मंडळाला. ५-६ वर्षांपुर्वी स्मरणिकेचा प्रयत्न केला गेला होता पण एक-दोन वर्षांतच ते बंद झालं. मागच्या वर्षी पुन्हा सुरू झाले ते आता दरवर्षी सुरू राहीलच ह्यात शंका नाही.

१६
मे चा कार्यक्रम होणार होणार...आणि इथल्या अमीर च्या १४ मे ला झालेल्या निधनाने सर्वत्र ३ दिवसांचा दुखवटा जाहीर झाला. आता कसं होणार.. कार्यक्रम होतो की नाही..पण मंडळाच्या कार्यकारी सदस्यांनी अथक प्रयत्न करून ह्या कार्यक्रमांत थोडा बदल करून शनिवार १७ मे ला दुपारी १२ वाजता ठरवला. कार्यकारी मंडळाबरोबरच भारतीय दूतावासाचे श्री भाटिया ह्यांचा मोलाचा सहभाग हा कार्यक्रम सफल करण्यात होता. ह्या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद व्यक्त करायलाच हवेत.

'मैतर' कार्यक्रमांत आपापल्या क्षेत्रातले सगळे हीरे च आहेत। सुबोध भावे, शौनक अभिषेकी, शर्वरी जमेनिस, डॉ. सलील कुलकर्णी, संदीप खरे आणि बेला शेंडे. ह्या सगळ्या नांवातच आहे सगळं की वेगळ्याने त्यांच्या कलेची ओळख करून द्यायचीच गरज नाही. ह्या दिग्गजांची आपापली व्यस्तता आहे, त्यांनी सगळ्यांनीच एकाच वेळी तेव्हढा वेळ काढून बरोबर येणे आणि कार्यक्रम करणे हेच कौतुकास्पद आहे.

कार्यक्रम
थोडा उशीरा सुरू झाला खरा पण इतक्या छान कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघतांना हा असा उशीर कोणाला जाणवलाच नसेल. .. सुबोध भावे ह्यांनी सगळ्या मैतर सदस्यांची ओळख करून दिली व कार्यक्रमाला सुरूवात झाली. ह्या सगळ्या मैतरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले. काही अपरिहार्य कारणांमुळे भारतीय दूतावासाचे श्री भाटिया हे कार्यक्रम सुरू झाल्यावर पोहोचले त्यामुळे मधे ५ मिनिट कार्यक्रम थांबवून श्री भाटिया ह्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांचे खूप आभार मानण्यात आलेत.

शौनक
अभिषेकींच्या आवाजाची तर जादूच आणि बेला शेंडे चा मोहक अप्रतिम सुंदर आवाज... ह्या दोघांची सुरेल गाणी, सलील कुलकर्णी संदीप खरे.. आयुष्यावर बोलू काही ची जोडी..संदीप खरे चे कविता वाचन, शर्वरी चे नृत्य..तिच्या भराभर अति वेगाने त्या गिरक्या..थिरकणारी तिची पावले आणि सुबोध भावेचा किती सहज अभिनय..बिना ग्लिसरीन चे अभिनयात डोळ्यात पाणी येऊ शकते हे आम्ही सगळेच प्रत्यक्ष बघत होतो..सगळेच शहारले असणार... नजर खिळवून ठेवली होती सगळ्यांनीच..किती वाखाणावे तेव्हढे कमीच. सगळे एका जागी स्तब्ध बसलेले...कधी हे संपायलाच नकोय....मधे मधे होणारे विनोदी भाष्य...मस्करी आम्हा सगळ्यांना हसवत होतेच.

मध्यांतरात
गरम समोसे...थंड ताक... हवा असेल तर गरम चहा कॉफी.....सगळ्यांनी आस्वाद घेतला व कार्यक्रमाचा दूसरा भाग सुरू झाला. ह्या भागात तर अनपेक्षित असंच बघायला मिळालं. खूपच कौतुकास्पद.. सगळ्याच कलाकारांनी आपापल्या क्षेत्राच्या विपरीत सादरीकरण केलं. संदीप खरे, सलील कुलकर्णी, बेला शेंडे आणि शौनक अभिषेकी ह्यांनी अभिनयाचे छोटे छोटे प्रवेश उत्तम केलेत.. बरोबरच सुबोध भावे आणि शर्वरी ने म्हंटलेलं द्वंद्व गीताने पण रंगत वाढवली. डॉ सलील कुलकर्णींच्या इंग्लिश गाण्याने सगळेच डोलायला लागले होते. मज्जा आली.....बघता बघता साडे तीन तास संपलेत पण....महाराष्ट्र मंडळ सातत्याने चांगले कार्यक्रम देतच आलेय पण ह्या मैतर कार्यक्रमासाठी तर वेगळ्याने धन्यवाद द्यायलाच हवेत महाराष्ट्र मंडळाला...

सगळेच
कलाकार इथल्या आदरातिथ्याने भारावून गेलेत....कुवैत चा हा मराठी परिवार त्यांना आपलाच वाटला ह्यात सगळंच मिळालं नं आम्हा कुवैतकरांना...

दीपिका
जोशी 'संध्या'
२६ मे २००८

शुक्रवार, २२ मे, २००९

आई च्या आठवणीत मी.....

मातृदिवस परवा आला व गेला. मातृदिवस-पितृदिवस.... ह्या असल्या दिवसांची गरजच नाही असं वाटतं. आई वडिल नजरेसमोर असतील तर.. बरोबर असतील तर त्यासारखा आनंद नाही पण काळाच्या पडद्याआड गेले असतील तरी ते तर आपल्या नजरेत... ह्रदयात ...रक्तातच आहेत..कधी विसर पडणार का आपल्याला की त्यांच्या आठवणी काढाव्या लागतील. मनाचा एक कोपरा असा आहे की जिथे ते नेहमीच वसत असतात. आपण मनोमन सतत त्यांना स्मरतच असतो.

आज
१५ मे... काळ असा जातोय.. क्षणभर ही माझ्या मनातुन जी गेलीच नाहीये त्या आईला जाऊन आज पूर्ण तीन वर्ष झालीत. तेंव्हापासून प्रत्येक कृतित आई हा पदार्थ असा करायची...आई हे असं करायची...आई हे तसं करायची..असं म्हणत म्हणतच माझा दिवस सुरू होतो. सकाळी सकाळी भाजीत घालायला लागणार्‍या गोडा मसाल्यापासून तर संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून रामरक्षा-शुभंकरोती म्हणण्यापर्यंत तुलनाच तुलना.
दुसर्‍या आई चे (माझ्या सासूबाई) पण असंच होतं सगळं. संसार कसा करायचा हे मी त्यांच्याकडुनच शिकले. रुचिर शिशिर जुळे असले तरी त्या बरोबर असल्यामुळे त्यांना वाढवणे कधी कठिण गेलेच नाही। कुवैत ला आम्ही आल्यामुळे त्या मुंबईतच होत्या. दर वर्षी चक्कर असायचीच आमची. माझे आई बाबा व त्या....कुवैत भेटीत कायम बरोबर यायचे... गप्पांमधे दिवस घालवित असत पण इथे यायचाच कंटाळा करत कारण इथे बाकी काहीच विरंगुळा नाही। भारताच्या झटपट-पळापळीच्या जीवनाची इथे काय ती सर येणार... दिवस जात होते.

२००३ पासून गेली ४-५ वर्षें बरीच धकाधकीत गेलीत. माझे कुवैत ला राहणे कमी व भारतभेट चकरा वाढतच होत्या. माझे आई बाबा आणि सासूबाईंच्या तब्येतीच्या कुरकुरी सुरू झाल्या होत्या. तिघांचेही वय बोलू लागले. २००४ च्या जून महीन्यांत आमच्या आई आजारी पडल्यात. दवाखान्यात आहेत म्हंटलं की.....धावत मुंबई गाठली. माझ्या सौं वीणावंस त्यांची अतोनात सेवा करतच होत्या. मोठ्या बहीणीची, सौ.वीजूवंसची साथ होतीच. गरमीची रणरण..माझे आई बाबा भाऊ भावजय सगळेच गाडीने आईंना भेटायला पुण्याहून आलेत. आईंना असे हॉस्पिटल मधे बघून सौं. आई हबकली. आमच्या आईंना म्हणते, ''सिंधूताई, हे असं कसं चालेल, लवकर उभ्या रहा, तब्येत सावरा..''आईंच्या चेहर्‍यावर सौं. आईला बघून स्मितहास्य. सगळ्यांनाच बरं वाटलं. पुढे म्हणते...''आपण ठरविले आहे नं की लवकरच आपल्या रुचिर शिशिर कडे त्यांचे घर बघायला जायचे आहे. इतका लांबचा प्रवास आहे, आपल्याला तिघांना हिम्मतीने सगळे पार करून अमेरिका गाठायची आहे नं...''

आमच्या
आईंच्या मधून मधून होणार्‍या नागपुर भेटीमधे गप्पांमधे नातवांच्या घरी अमेरिकेला जायचे स्वप्न तिघे मिळून रंगवायचे. सिंगापुर बैंकाक, युरोप नंतर आता अमेरिका वारी नातवांच्या घरी होऊ घातली होती. काय काय दोघींचे बेत ठरले होते ते कधी कळलेच नाहीत.

आई
बर्‍या होऊन घरी आल्यात. आम्ही दोघे कुवैत ला परत आलोत. थोडेच दिवस गेले होते मधे तर आता सौं आईसाठी धावत जाणं झालं.. डायबिटीस ने शरीर थकत चालले होते. मे नंतर ३ महीन्याचत म्हणजे ऑगस्ट मधे भाचीच्या लग्नाला औरंगाबादला जायचे होते तर जाता-जाता आई बाबांना भेटून पुढे जावे अशा विचाराने पुणे गाठले. तिथली परिस्थिति माझी जून महीन्याची भेट आणि त्यावेळी असलेल्या परिस्थितिपेक्षा फारच वेगळी होती. फक्त ३ महीन्यांतच सौ. आई सगळीकडूनच थकलेली मला भासली. माझे भाऊ भावजय प्रचंड सेवेत होते आई बाबांच्या. त्यांच्या तब्यतीकडे बघून माझा पाय निघेना व भरीत भर ते दोघेही काढू देईनात त्यामुळे भाचीच्या लग्नाच्या १ आठवडा आधी सौं वीणावंसकडे पोहोचायचे असे ठरवून कुवैतहून निघालेली मी जेमतेम लग्नाच्या २ दिवस आधी औरंगाबादला पोहचु शकले.. लग्न आटोपून मी कुवैत ला परत आले. लग्नांत आमच्या आईंची तब्येत बरीच सावरली होती. नातीचे लग्न त्यांनी छान अनुभवले, लग्नाची मजा घेतली. सगळ्या कार्यक्रमात प्रयत्नांति सहभागी झाल्यात.

दोघी
आयांच्या तब्येती बाबत मधले ५-७ महीने असेच फोनाफोनी...''वरखाली होतच राहणार..इथला काळजी करू नका...चलता है..'' अश्या वाक्यांचा कुठे तरी दिलासा भारतातून मिळत राहिला व दिवस-महीने पुढे जात गेले. २००५ च्या मार्च मधे १५ तारखेच्या सुमारास आम्हाला फोन आला की सौं. आईला आयसीयू मधे ठेवले आहे तर लवकर ये.. दुसर्‍याच दिवशी मी पुण्यात पोहोचले. नंतर समजले की हार्ट अटॅक आला होता व एंजिओग्राफी करून कळले की बायपास सर्जरी करावी लागणार. धाबे दणाणलेच होते आमचे सगळ्यांचे पण हल्ली ते पण इतके सोपे झाले आहे... आणि आमच्याच घरांत बरेच आहेत ज्यांचे बायपास नंतर जीवन एकदम सुरळीत सुरू पण आहे. हो हो नाही नाही, एकमेकांना धीर देणे, संदीप चा हात हातात घेऊन तिचे रडणे, पुढची सांत्वने, एका आठवड्यांत पुन्हा घरी परत येण्याचा शेवटचा मिळालेला दिलासा.... ह्या सगळ्याची काही तासांत देवाणघेवाण झाली व शेवटी बायपास झाली.

आमच्या
आईंना तिला खूप भेटायला यायचे होते. ती दवाखान्यातुन घरी परत आली की या असे मी म्हंटले होते कारण त्यांची पण तब्येत कुठे ठीक होती इतकी. ९ मे २००५ ला तिची बायपास झाली. १० मे ला सौं. आईचा ६९वा वाढदिवस झाला. सगळ्या डॉ. नी व आम्ही बाहेरून तिला शुभेच्छा दिल्यात. (ती आय.सी.सी.यु. मधे होती तर भेटता येतच नव्हते) असे समजत होतो की तिच्यात सुधारणा होते आहे, पण तिला तिथे खूप एकटे वाटत असावे. सौं मनीषा (तिची सून.....माझी भावजय) च्या नावाचा जप सुरू होता. डॉ. नी तिची परिस्थिति बघुन सौ. मनीषा ला भेटण्याच्या तिच्या इच्छेला मान दिला. सौ. मनीषा ने आंत जाऊन तिला समजावले की उद्या इथून बाहेर स्वतंत्र खोलीत आपण जाऊ या. १६ मे ला सकाळी आयसीसीयू मधून बाहेर वॉर्ड मधे आणणार वगैरे सगळे ठरले असतांना अचानक १५ च्या रात्री काय घडले असावे आंत काही कळलेच नाही. अत्यधिक परिस्थितिची जाणीव होण्यापुर्वीच तिच्या जाण्याचा निरोप येणे आमच्या समजण्या पलीकडचे होते. इतके जिवाला थकवून गेले की शब्दांत सांगणे खूपच कठीण. रात्री मी व सौ. मनीषा दवाखान्यात राहात असू. त्यामुळे आम्हालाच त्या हळव्या व कठिण प्रसंगाला तोंड द्यावे लागले. सगळंच कसं सुन्नं झालं होतं. कधीच आम्हा कोणाला त्या 'बायपास' ची भिती वाटली नव्हती. मग असे का व्हावे. डॉ तरी काय उत्तर देणार..आमचे प्रश्न तर अनंत होते. सगळ्यात वाईट ह्याचे वाटत असतं सतत की तिला आम्ही कधीच एकटे सोडले नाही, बाहेर बसून सतत तिच्या बरोबर असण्याचे आम्हाला भासत होते पण ती एकटीच आहे, तिच्याजवळ कोणी नाहीये हे तिला भासत होते व त्याच दुःखात ती आम्हाला सोडून निघून गेली.

मुंबईला
आमच्या आईंना कळल्याबरोबर त्यांची सौं आईला भेटायला न मिळण्याची खंत खूपच वाढली. आल्याच धावत त्या आईला भेटायला व असे कधीही न बोलणार्‍या सुधाताईंना बघायला.... त्यांच्या मनांत खूपच वादळ सुरू झाले असावे. त्या वादळाची काय....पण साधी हवेची झुळुक पण आम्हाला जाणवलीच नाही. मुंबईला परत जाता-जाताच त्यांचे सुरू झाले की मला आता जगायचं नाही. आयुष्य ही देवाची देण आहे, मनांत काही आले तरी असलेले आयुष्य जगणे तितकेच अपरिहार्यच आहे हे कळत असूनही त्यांना वळत मात्र नव्हते. तशा तर त्या खुप विचारी व जग...जगातली सुख दुःख बघितलेल्या...टक्के टोणपे खाल्लेल्या असल्याने खंबीर भासत असत पण कधी कधी असले धक्के त्यापलिकडे जाऊन खंबीर असलेल्या माणसाला कोसळायला भाग पाडतात..तसंच झालं.

दुःखातच
सतत राहिल्याने त्यांच्या तब्येतीवर परिणाम जाणवण्याइतका झाला. ४ जूनला दवाखान्यांत भरती करण्यापर्यंत मजल गेली. ३ दिवसांनी म्हणजे ७ जून ला हे मुंबईला त्यांच्याजवळ दुपारी पोहोचले. (३ जून ला च माझे एक मोठे ऑपरेशन झाले त्यासाठी हे पुण्याला आलेच होते. ते पार पडल्यावर व मी दवाखान्यातुन घरी आल्यावर हे मुंबईला आईंकडे गेलेत ते पण सरळ दवाखान्यातच) ह्यांना आलेले बघितले...दोन-चार शब्द काही तरी बोलल्या मुलाशी. संध्याकाळ होता होता घर-घर वाढलीय असे वाटले आणि कळायच्या आंतच आईंनी पण शेवटचा श्वास घेतला. जशी ह्यांचीच वाट बघत असल्यासारखे ह्यांना भेटून बघूनच मग गेल्यात. माझी परिस्थिति अशी की उठायचेच नव्हते. किती कमनशीबी मी की शेवटचे बघता पण आले नाही मला....माझी आई त्यांची छान मैत्रीण, आपल्या मैत्रीणीलाच भेटायला गेल्यासारख्या त्या इथे आम्हा सगळ्यांना पोरके करून गेल्या होत्या. दोघींची आपल्या नातवांचे अमेरिकेतले सुंदर घर, त्यांचे वैभव बघण्याची इच्छा मात्र मागे ठेवून...बरोबर राहून दोघींचे एकसारखेच वेळोवेळी आशीर्वाद होतेच आणि नंतर ही राहणारच...पण...

कुठलाही
क्षण असा नाहीये आम्हा दोघांचा की मनांत त्या नाहीत....मागे राहिलेल्या सुखद-दुःखद आठवणींना तर अंतच नाही दोघींच्या पण....
दोघी आई माझ्या आठवणीतच.... सतत माझ्या बरोबरच राहणार्‍या...
आमच्या दोघी आयांसाठीच हे चार शब्द...

कठिण आई बद्दल लिहीणे
'आई'ला ते व्यक्त करणे
शब्द अपुरेच हो पडती
आई... बस ती आईच होती

वेदनेत आईच सदा आठवली
उन्हात असते तीच सावली
मायेची उब थंडीत मिळती
आई... बस ती आईच होती

परिसापरी ती सदैव झिजली
पण, दिन आम्हा आले सोनेरी
मान-स्वाभिमान ठेवून होती
आई...बस ती आईच होती

जुळ्या नातवांवर माया भारी
दुधावरच्या सायी सम प्यारी
आजी सदैव कौतुक करती
पण....आई...बस ती आईच होती
आई...बस ती आईच होती

दीपिका 'संध्या'
१५ मे २००८

काही प्रतिक्रिया

आशा जोगळेकर

खूपच भावस्पर्शी लेख. आई म्हणजे आई..फक्त आईच असते. तिची तुलना आणखी कशाने होतच नाही.

असा माझा ऑरकुट परिवार...

ऑरकुट परिवाराची रंगत-संगत

मध्यंतरी ४-५ वर्षाच्या काळात घरातील बाकी काही कारणांमुळे सतत भारतात जाणे होत असे. मी घरीच असल्यामुळे कधी काही निरोप मिळाला की लगेच भारत गाठायचे हाच नियम होऊन बसला होता. कुवैत महाराष्ट्र मंडळात सभासद होतो पण वर्षभर होणार्‍या कार्यक्रमांत सहभागी होताच येत नसे. त्यामुळे हळू हळू बाकी इतरत्र आपल्या मराठमोळ्यांच्या पण गाठी भेटी कमी होत गेल्यात. तुमच्या कायम होणार्‍या अनुपस्थिति ने आपण सगळ्यांच्या विस्मरणांत जातो. चार पाच आप्तस्वकीय राहिलेत ज्यांच्याशी कुवैत मधे आल्यापासून जी मैत्री झाली होती ती तशीच टिकली त्या मुळे घनिष्ट होती. त्यांच्याच बरोबर दिवस जात होते. सुख-दुःखात तेच होते बरोबर...

कुवैत
मधे आल्यापासून माझा आवडता हा संगणक आणि मी.. असे समीकरण झाले आहे. जालावर (नेट वर) खूप मित्र मैत्रिणी भेटल्या आहेत. मला कामाची, काही करून दाखविण्याची थोडी दिशाही मिळाली. गेली ७-८ वर्षे मी त्यात पूर्णपणे गुंतलेली आहे. त्यामुळे वेळेचा सदुपयोग आणि बरोबरच मनोरंजन सुरू असतं..

ऑरकुट
ऑरकुट चा हो-हल्ला ऐकून होते पण फारसे लक्ष दिले नाही त्याकडे. आपल्या कामांतच दिवस जात होते. सहा महीन्यांपुर्वी ठामपणे ठरविले की आता बघायचेच हे ऑरकुट काय भानगड आहे ती. जीमेल ची सभासद होऊन एकदाचे ऑरकुट सुरू केले. प्रोफाइल लिहीण्यापासून सुरूवात झाली. आपल्याबद्दल काय काय लिहायचे हे अगदी विचार करून करून लिहीत होते कारण सगळ्यांनीच (इथे कोणी यावे कोणी जावे असे आहे नं) ते वाचण्यासारखे पण असावे. ( ही झाली जरा गंमत.. :-) ). मग शिकले की मित्रमंडळी कशी गोळा करायची. सगळ्यात आधी माझ्या रुचिर शिशिर ला माझ्या मित्रांच्या यादीत सामिल केले. कुवैत मराठी मंडळींची कम्युनिटी वैभव काजरेकर (वैशाली चा मुलगा) ने सुरू केल्याचे दिसले त्यात मी सहभागी झाले. तिथे तर इथले सगळेच दिसले मला...वा!! काय आनंदाचा क्षण होता तो माझ्यासाठी. सगळ्यांना धडाधड माझे मित्र होण्यासाठी अनुमति (friend request) मागितली आणि सगळ्यांनीच मान्य केली. महीन्याभरांत माझे स्क्रॅप बुक वाढत चालले होते...मित्रमंडळींची संख्या तर विचारूच नका... मस्त वाटत होतं.

रोज
सकाळी सुप्रभात चा स्क्रॅप टाकणे हा एक छंद म्हणा... नियम म्हणा... होऊन बसला आहे आता. वैशाली व विवेक काजरेकर, जयश्री कुळकर्णी अंबासकर, अदिती जुवेकर, स्मिता काळे, हर्षदा रोंघे, सुरुचि लिमये, प्रसन्न आणि अश्विनी देवस्थळी, सौदामिनी(सविता) कुलकर्णी... (सविता इथे येऊन जाऊन असते.) किती नांवे घेणार. ही सगळी कुवैत ची मंडळी... नंतर माझ्या तोंडात सारखे ऑरकुट ऑरकुट...किती मज्जा येते वगैरे समजले तर शिल्पा धुमे पण आता आमच्यात आलीय...सहीच एकदम...

आणि
त्यात अजून एक लहान बहीण भेटली...कॅनडा ची मोनिका रेगे...इतकी जवळ आली आहे की रोज तिचा मला आणि माझा तिला व्हॉइस मेसेज असतो. किती किती ह्या ऑरकुट मंडळींचे किती किती प्रकाराने प्रेम मिळतंय...शब्दात सांगणंच कठिण...

ह्या
व्यतिरिक्त खूप आप्तस्वकीय भेटले आहेत. त्यात सगळ्यात आधी देव काका...(काका म्हंटले आहे त्यामुळे ते रागवणार मला...कारण आम्ही थोडे फार एकाच वयाचे..पण थोडी फिरकी चालतेच आहे नं... ) आधी स्क्रॅप व नंतर आता तर जीटॉक जिंदाबाद..सकाळी सकाळी सुप्रभात सुरू होतं.. किती कितींबद्दल सांगावे कळत नाहीये...असे तर खूप माझी मित्रमंडळी उल्लेखामधून सुटणार...तर माफ करा मला जी सुटलीत...त्यांच्याबद्दल पुन्हा कधी..

तर
सांगत होते की सहज मनांत आले आणि विचार केला की ह्या कुवैत च्या ऑरकुट मंडळींना मस्त घरी धम्माल करायला बोलवावं.... माझीच संकल्पना माझ्याच निरनिराळ्या कल्पनांनी आकार घेऊ लागली. दूध्व(दूऱ ध्वनि- फोन) करून विचारले तर कधी हिला वेळ नाही कधी कोणाला कुठे जायचे आहे...असे सगळ्यांचे ताळ-मेळ बसवून मी ५ एप्रिल ला ठरविले रात्रि भोज चे..... ४ तारखेला आमची महाराष्ट्र मंडळाची सहल होती..तिथे सगळेच होते.. एकदा आठवण करून दिली. (सगळ्यांच्याच मनांत ऑरकुट परिवाराचे सम्मेलनच नक्की आहे की माझ्याकडे अजून बाकी काही कारणाने मी बोलवते आहे...कारण संकल्पना जरा नवीन होती...पचनी कशी पडावी... ) जेवणाचा बेत तर ठरवून ठेवलाच होता. श्रीखंड (पुरी नाही कारण हल्ली वजन वाढणे व त्यावर ताबा..ह्या भानगडीत तळकट खायला कोणी तयार होत नाही) पोळ्या, दोन भाज्या, वरण भात हिरवी मिरची कोथिंबीरीची चटणी वगैरे वगैरे...
सगळे ठरल्या वेळी आलेत....दारांत 'ऑरकुट परिवार.. स्वागत' हे रांगोळीत लिहीलेले वाचून सगळेच आनंदलेत. मग गप्पा-टप्पां बरोबर एक घास चिवड्याचा आणि एक खारा शंकरपाळा सगळेच उचलत होते. खूपच रंगली होती महफिल. जेवणाची वेळ होत आली होती. सगळे मनसोक्त कौतुक करत जेवणाचा आस्वाद घेत होते. श्रीखंड व चटणीची (काय विरोधाभास हा.. :-).) खूप तारीफ झाली. जेवणे आटोपल्यावर मसाला पानाने (विडा) अजून मजा आणली.

निरोप
घ्यायच्या वेळी जयश्री चा नवीन अल्बम आल्याबद्दल तिचे कौतुक तिला सुंदरसा फुलांचा गुच्छा देऊन केले. आनंद आमच्या दोघींच्या डोळ्यात सामावत नव्हता. आनंदाश्रु डोळ्यात होते दोघींच्या पण....पण खूप छान वाटले...

दुसर्‍या दिवशी सगळ्यांनाच ऑफिस होते त्यामुळे गप्पा अर्धवट सोडून व खंत करत सगळेच साढे दहाच्या सुमारास घरी परतलेत। फक्त असे ठरवूनच की पुढची अशी भेट गुरुवारी किंवा शुक्रवारी (कारण इथे शुक्रवार शनिवार सुट्टी असते॥)रात्रीच घडवून आणायची...म्हणजे धूम करायला सगळेच मोकळे....

बाकी सगळ्या कार्यक्रमात फोटो काढायचे राहून गेलेत...पुन्हा कधी...पुढच्या वेळी... :-)दुसर्‍या दिवशी माझ्या ऑरकुट मधे किती किती स्क्रॅप आलेत म्हणून सांगू...आनंदाने वेडीच झाले होते...सुखावले होते...
इति.....
असा आमचा ऑरकुट परिवार प्रसन्न प्रसन्न... :-)

दीपिका
जोशी 'संध्या'
७ एप्रिल २००८