शनिवार, १ मे, २०१०

सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र दिन



महाराष्ट्र दिन

आज १ मे, महाराष्ट्र दिन. कालच्याच वृत्तपत्रात वाचले की महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेसाठी वेगळे खाते तयार केले आहे. असे करून मायमराठीचा किती सन्मान केला जाईल हे बघणे आहे. ''मी महाराष्ट्रात जन्माला आलो-आले ह्याचा मला अभिमान आहे, मी मराठी-माझी मराठी'' वगैरे वगैरे आजकाल खूपच ऐकायला येतंय. किती खरंय हे पडताळून पाहण्याची वेळ आता आली आहे आणि ही वेदना देणारी बाब आहे. मुंबई-पुणे सारख्याच शहरांमधे मराठीला तितके महत्व दिले जात नाही. आणि त्यातल्या त्यात दुःखाची गोष्ट अशी पण आहे की मराठी विषयाची मानसिकता न्यूनगंडाची आहे. घरांत जरी मराठी बोलत असतीलही तरी घराबाहेर हीच आपली मराठमोळी मुले सर्रास फक्त इंग्रजीच बोलतात. परप्रांतात राहणारे आपले मराठी लोक घरांत पण मराठी बोलतांना दिसत नाहीत. आंतरजातीय विवाहांचे सध्या चलन आहे त्यातही पुढच्या पीढीसाठी भाषेचा तोडगा म्हणून इंग्रजी भाषाच निवडली जाते. मातृभाषा व जर पितृभाषा वेगळी असेल तर ती पण घरांत शिकवली जायला हवी असे वाटते. मातृभाषा उपेक्षिली जाऊ नये हा मराठी माणसाने प्रयत्न सतत करायला हवा. परदेशातील महाराष्ट्र मंडळांमधे इंग्रजी चे च चलन असते. हा अनुभव मी स्वतः घेतला आहे.

वर्षानुवर्षे गेलीत.. काही शब्द इंग्रजी मधले मराठी मधे आले आणि ते मराठीचेच होऊन राहीले आहेत ज्याचा वापर झाला तरी गैर वाटत नाही. त्याला समानार्थी मराठी शब्द वापरला तर अर्थ समजेल की नाही अशी परिस्थिति आहे. सकाळ ची सुरूवात Good morning ऐवजी सुप्रभात, Good night ऐवजी शुभ रात्री,  Happy b'day ऐवजी वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा hi च्या जागी नमस्कार व्हायला हवे.  

 मी स्वतः मातृभाषा मराठी व अधिकृत मानली जाणारी हिंदी ह्या भाषांना प्रामाणिक पणे जगणारी व जगवणारी आहे. सतत मराठी लोकांबरोबर मराठीतच व अन्य भारतीयांबरोबर आपल्या हिंदीचा वापर करणे ह्यावर माझा कटाक्ष असतो. 'मी मराठी-माझी मराठी' म्हणणारेच पुढच्या पावलांवर इंग्रजी बोलतांना दिसतात. संगणकावर आता प्रत्येक भाषेमधे काम करण्याची संधी आहे व उपलब्धता पण आहे. देवनागरी वापरण्यास थोडेच प्रयत्न करावे लागतात. जीटॉक, एमएसएन, याहू सारख्या ठिकाणी पण बोलतांना मिंग्लिश लिहीण्याची आता गरज नाही. ऑरकुट मधे सोय असून पण ६० टक्के लोक तर मराठी असून पण इंग्रजी मधेच बोलताना आढळतात. उरलेले कदाचित २० टक्के मिंग्लिश व २० टक्केच देवनागरीचा वापर करतांना दिसतात. जीटॉक मधे देव काकांनी 'मराठी माणसाशी संवाद साधतांना रोमन लिपीत न लिहीता देवनागरीतच लिहावे आणि कटाक्षाने मराठीत बोलावे' असे लिहून ठेवले आहे. हे शंभर टक्के खरे आहे पण किती जण ही गोष्ट अमलांत आणतात? आमचे नेहमी ह्या विषयावर बोलणे होत असते. परदेशांत एकीकडे खूप मराठी लेखन होतेय.. मराठीमधे ब्लॉग्स बनवले गेले आहेत. उत्कृष्ट दर्जाचे साहित्य वाचकांच्या पुढे येतेय. त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो. एक आहे ह्या गोष्टी अशाच हळूहळू पुढे जातील व मराठीचे साम्राज्य महाराष्ट्रात व भारतात हिंदी ला पण प्रोत्साहन मिळेल अशी आशा आपण का ठेवू नये? भारतात व भारताबाहेर आपल्या मराठी जनांनी मराठीला आपलेसे करण्याची जबाबदारी समजायला हवीय.

दूरदर्शन वर मराठी वाहिन्या बर्‍याच सुरू झाल्या आहेत. मराठी आणि हिंदी वाहिन्यांवर इतके प्रत्येक वाक्यागणिक इंग्रजी असते की ज्याला पर्यायी मराठी शब्द आहेत जे अगदी नेहमीच्या वापरातले आहेत पण लक्ष दिले जात नाही. असे पण आहे की हल्ली दूरदर्शन गावोगावी पोहोचला आहे जिथे हिंदी मराठी समजण्यास सोपे असेल जितके की शिक्षणा अभावी इंग्रजी समजणे कठिण आहे. पण कोण विचार करतो ह्याचा.. चालू आहे.. चालू आहे... जसे तसेच चालू आहे!!!!

परप्रांतात राहून मुलांना आम्ही मराठीची व्यवस्थित संवय लावली होती पण आता परदेशात स्थायिक झालेल्या त्याच मुलांची पुढची पीढी किती मराठी भाषेशी प्रामाणिक राहते तेच बघणे आहे. जसे मातृभाषेचे व हिंदी भाषेचे प्रेम त्यांना घालून-समजावून दिले तसेच पुढे तो वारसा चालवणे सर्वस्वी त्यांच्या हाती आहे.

चला तर आजच्या ह्या महाराष्ट्र दिनाच्या सुवर्णमोहोत्सवाच्या निमित्याने ठरवू या की शक्यतोवर मराठी माणसाशी बोलतांना मराठीतच बोलू या...

दीपिका 'संध्या'

बुधवार, २८ एप्रिल, २०१०

२८ एप्रिल तारीख आली.. सकाळपासून बहीण भावांचे फोन, मुलांचे फोन येऊन शुभेच्छांना सुरुवात पण झाली. पण मलाच कुठेतरी कमी जाणवत होती म्हणुन तासांभरात हा सगळा खटाटोप केला. प्रेमामधे असे पण घडते... वेळ कितीही कमी असो... तर...

माझ्या जीवलगाला ह्या प्रेमाने ओथंबलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा... !!!  



दीपिका 'संध्या'