शुक्रवार, २२ मे, २००९

आई च्या आठवणीत मी.....

मातृदिवस परवा आला व गेला. मातृदिवस-पितृदिवस.... ह्या असल्या दिवसांची गरजच नाही असं वाटतं. आई वडिल नजरेसमोर असतील तर.. बरोबर असतील तर त्यासारखा आनंद नाही पण काळाच्या पडद्याआड गेले असतील तरी ते तर आपल्या नजरेत... ह्रदयात ...रक्तातच आहेत..कधी विसर पडणार का आपल्याला की त्यांच्या आठवणी काढाव्या लागतील. मनाचा एक कोपरा असा आहे की जिथे ते नेहमीच वसत असतात. आपण मनोमन सतत त्यांना स्मरतच असतो.

आज
१५ मे... काळ असा जातोय.. क्षणभर ही माझ्या मनातुन जी गेलीच नाहीये त्या आईला जाऊन आज पूर्ण तीन वर्ष झालीत. तेंव्हापासून प्रत्येक कृतित आई हा पदार्थ असा करायची...आई हे असं करायची...आई हे तसं करायची..असं म्हणत म्हणतच माझा दिवस सुरू होतो. सकाळी सकाळी भाजीत घालायला लागणार्‍या गोडा मसाल्यापासून तर संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून रामरक्षा-शुभंकरोती म्हणण्यापर्यंत तुलनाच तुलना.
दुसर्‍या आई चे (माझ्या सासूबाई) पण असंच होतं सगळं. संसार कसा करायचा हे मी त्यांच्याकडुनच शिकले. रुचिर शिशिर जुळे असले तरी त्या बरोबर असल्यामुळे त्यांना वाढवणे कधी कठिण गेलेच नाही। कुवैत ला आम्ही आल्यामुळे त्या मुंबईतच होत्या. दर वर्षी चक्कर असायचीच आमची. माझे आई बाबा व त्या....कुवैत भेटीत कायम बरोबर यायचे... गप्पांमधे दिवस घालवित असत पण इथे यायचाच कंटाळा करत कारण इथे बाकी काहीच विरंगुळा नाही। भारताच्या झटपट-पळापळीच्या जीवनाची इथे काय ती सर येणार... दिवस जात होते.

२००३ पासून गेली ४-५ वर्षें बरीच धकाधकीत गेलीत. माझे कुवैत ला राहणे कमी व भारतभेट चकरा वाढतच होत्या. माझे आई बाबा आणि सासूबाईंच्या तब्येतीच्या कुरकुरी सुरू झाल्या होत्या. तिघांचेही वय बोलू लागले. २००४ च्या जून महीन्यांत आमच्या आई आजारी पडल्यात. दवाखान्यात आहेत म्हंटलं की.....धावत मुंबई गाठली. माझ्या सौं वीणावंस त्यांची अतोनात सेवा करतच होत्या. मोठ्या बहीणीची, सौ.वीजूवंसची साथ होतीच. गरमीची रणरण..माझे आई बाबा भाऊ भावजय सगळेच गाडीने आईंना भेटायला पुण्याहून आलेत. आईंना असे हॉस्पिटल मधे बघून सौं. आई हबकली. आमच्या आईंना म्हणते, ''सिंधूताई, हे असं कसं चालेल, लवकर उभ्या रहा, तब्येत सावरा..''आईंच्या चेहर्‍यावर सौं. आईला बघून स्मितहास्य. सगळ्यांनाच बरं वाटलं. पुढे म्हणते...''आपण ठरविले आहे नं की लवकरच आपल्या रुचिर शिशिर कडे त्यांचे घर बघायला जायचे आहे. इतका लांबचा प्रवास आहे, आपल्याला तिघांना हिम्मतीने सगळे पार करून अमेरिका गाठायची आहे नं...''

आमच्या
आईंच्या मधून मधून होणार्‍या नागपुर भेटीमधे गप्पांमधे नातवांच्या घरी अमेरिकेला जायचे स्वप्न तिघे मिळून रंगवायचे. सिंगापुर बैंकाक, युरोप नंतर आता अमेरिका वारी नातवांच्या घरी होऊ घातली होती. काय काय दोघींचे बेत ठरले होते ते कधी कळलेच नाहीत.

आई
बर्‍या होऊन घरी आल्यात. आम्ही दोघे कुवैत ला परत आलोत. थोडेच दिवस गेले होते मधे तर आता सौं आईसाठी धावत जाणं झालं.. डायबिटीस ने शरीर थकत चालले होते. मे नंतर ३ महीन्याचत म्हणजे ऑगस्ट मधे भाचीच्या लग्नाला औरंगाबादला जायचे होते तर जाता-जाता आई बाबांना भेटून पुढे जावे अशा विचाराने पुणे गाठले. तिथली परिस्थिति माझी जून महीन्याची भेट आणि त्यावेळी असलेल्या परिस्थितिपेक्षा फारच वेगळी होती. फक्त ३ महीन्यांतच सौ. आई सगळीकडूनच थकलेली मला भासली. माझे भाऊ भावजय प्रचंड सेवेत होते आई बाबांच्या. त्यांच्या तब्यतीकडे बघून माझा पाय निघेना व भरीत भर ते दोघेही काढू देईनात त्यामुळे भाचीच्या लग्नाच्या १ आठवडा आधी सौं वीणावंसकडे पोहोचायचे असे ठरवून कुवैतहून निघालेली मी जेमतेम लग्नाच्या २ दिवस आधी औरंगाबादला पोहचु शकले.. लग्न आटोपून मी कुवैत ला परत आले. लग्नांत आमच्या आईंची तब्येत बरीच सावरली होती. नातीचे लग्न त्यांनी छान अनुभवले, लग्नाची मजा घेतली. सगळ्या कार्यक्रमात प्रयत्नांति सहभागी झाल्यात.

दोघी
आयांच्या तब्येती बाबत मधले ५-७ महीने असेच फोनाफोनी...''वरखाली होतच राहणार..इथला काळजी करू नका...चलता है..'' अश्या वाक्यांचा कुठे तरी दिलासा भारतातून मिळत राहिला व दिवस-महीने पुढे जात गेले. २००५ च्या मार्च मधे १५ तारखेच्या सुमारास आम्हाला फोन आला की सौं. आईला आयसीयू मधे ठेवले आहे तर लवकर ये.. दुसर्‍याच दिवशी मी पुण्यात पोहोचले. नंतर समजले की हार्ट अटॅक आला होता व एंजिओग्राफी करून कळले की बायपास सर्जरी करावी लागणार. धाबे दणाणलेच होते आमचे सगळ्यांचे पण हल्ली ते पण इतके सोपे झाले आहे... आणि आमच्याच घरांत बरेच आहेत ज्यांचे बायपास नंतर जीवन एकदम सुरळीत सुरू पण आहे. हो हो नाही नाही, एकमेकांना धीर देणे, संदीप चा हात हातात घेऊन तिचे रडणे, पुढची सांत्वने, एका आठवड्यांत पुन्हा घरी परत येण्याचा शेवटचा मिळालेला दिलासा.... ह्या सगळ्याची काही तासांत देवाणघेवाण झाली व शेवटी बायपास झाली.

आमच्या
आईंना तिला खूप भेटायला यायचे होते. ती दवाखान्यातुन घरी परत आली की या असे मी म्हंटले होते कारण त्यांची पण तब्येत कुठे ठीक होती इतकी. ९ मे २००५ ला तिची बायपास झाली. १० मे ला सौं. आईचा ६९वा वाढदिवस झाला. सगळ्या डॉ. नी व आम्ही बाहेरून तिला शुभेच्छा दिल्यात. (ती आय.सी.सी.यु. मधे होती तर भेटता येतच नव्हते) असे समजत होतो की तिच्यात सुधारणा होते आहे, पण तिला तिथे खूप एकटे वाटत असावे. सौं मनीषा (तिची सून.....माझी भावजय) च्या नावाचा जप सुरू होता. डॉ. नी तिची परिस्थिति बघुन सौ. मनीषा ला भेटण्याच्या तिच्या इच्छेला मान दिला. सौ. मनीषा ने आंत जाऊन तिला समजावले की उद्या इथून बाहेर स्वतंत्र खोलीत आपण जाऊ या. १६ मे ला सकाळी आयसीसीयू मधून बाहेर वॉर्ड मधे आणणार वगैरे सगळे ठरले असतांना अचानक १५ च्या रात्री काय घडले असावे आंत काही कळलेच नाही. अत्यधिक परिस्थितिची जाणीव होण्यापुर्वीच तिच्या जाण्याचा निरोप येणे आमच्या समजण्या पलीकडचे होते. इतके जिवाला थकवून गेले की शब्दांत सांगणे खूपच कठीण. रात्री मी व सौ. मनीषा दवाखान्यात राहात असू. त्यामुळे आम्हालाच त्या हळव्या व कठिण प्रसंगाला तोंड द्यावे लागले. सगळंच कसं सुन्नं झालं होतं. कधीच आम्हा कोणाला त्या 'बायपास' ची भिती वाटली नव्हती. मग असे का व्हावे. डॉ तरी काय उत्तर देणार..आमचे प्रश्न तर अनंत होते. सगळ्यात वाईट ह्याचे वाटत असतं सतत की तिला आम्ही कधीच एकटे सोडले नाही, बाहेर बसून सतत तिच्या बरोबर असण्याचे आम्हाला भासत होते पण ती एकटीच आहे, तिच्याजवळ कोणी नाहीये हे तिला भासत होते व त्याच दुःखात ती आम्हाला सोडून निघून गेली.

मुंबईला
आमच्या आईंना कळल्याबरोबर त्यांची सौं आईला भेटायला न मिळण्याची खंत खूपच वाढली. आल्याच धावत त्या आईला भेटायला व असे कधीही न बोलणार्‍या सुधाताईंना बघायला.... त्यांच्या मनांत खूपच वादळ सुरू झाले असावे. त्या वादळाची काय....पण साधी हवेची झुळुक पण आम्हाला जाणवलीच नाही. मुंबईला परत जाता-जाताच त्यांचे सुरू झाले की मला आता जगायचं नाही. आयुष्य ही देवाची देण आहे, मनांत काही आले तरी असलेले आयुष्य जगणे तितकेच अपरिहार्यच आहे हे कळत असूनही त्यांना वळत मात्र नव्हते. तशा तर त्या खुप विचारी व जग...जगातली सुख दुःख बघितलेल्या...टक्के टोणपे खाल्लेल्या असल्याने खंबीर भासत असत पण कधी कधी असले धक्के त्यापलिकडे जाऊन खंबीर असलेल्या माणसाला कोसळायला भाग पाडतात..तसंच झालं.

दुःखातच
सतत राहिल्याने त्यांच्या तब्येतीवर परिणाम जाणवण्याइतका झाला. ४ जूनला दवाखान्यांत भरती करण्यापर्यंत मजल गेली. ३ दिवसांनी म्हणजे ७ जून ला हे मुंबईला त्यांच्याजवळ दुपारी पोहोचले. (३ जून ला च माझे एक मोठे ऑपरेशन झाले त्यासाठी हे पुण्याला आलेच होते. ते पार पडल्यावर व मी दवाखान्यातुन घरी आल्यावर हे मुंबईला आईंकडे गेलेत ते पण सरळ दवाखान्यातच) ह्यांना आलेले बघितले...दोन-चार शब्द काही तरी बोलल्या मुलाशी. संध्याकाळ होता होता घर-घर वाढलीय असे वाटले आणि कळायच्या आंतच आईंनी पण शेवटचा श्वास घेतला. जशी ह्यांचीच वाट बघत असल्यासारखे ह्यांना भेटून बघूनच मग गेल्यात. माझी परिस्थिति अशी की उठायचेच नव्हते. किती कमनशीबी मी की शेवटचे बघता पण आले नाही मला....माझी आई त्यांची छान मैत्रीण, आपल्या मैत्रीणीलाच भेटायला गेल्यासारख्या त्या इथे आम्हा सगळ्यांना पोरके करून गेल्या होत्या. दोघींची आपल्या नातवांचे अमेरिकेतले सुंदर घर, त्यांचे वैभव बघण्याची इच्छा मात्र मागे ठेवून...बरोबर राहून दोघींचे एकसारखेच वेळोवेळी आशीर्वाद होतेच आणि नंतर ही राहणारच...पण...

कुठलाही
क्षण असा नाहीये आम्हा दोघांचा की मनांत त्या नाहीत....मागे राहिलेल्या सुखद-दुःखद आठवणींना तर अंतच नाही दोघींच्या पण....
दोघी आई माझ्या आठवणीतच.... सतत माझ्या बरोबरच राहणार्‍या...
आमच्या दोघी आयांसाठीच हे चार शब्द...

कठिण आई बद्दल लिहीणे
'आई'ला ते व्यक्त करणे
शब्द अपुरेच हो पडती
आई... बस ती आईच होती

वेदनेत आईच सदा आठवली
उन्हात असते तीच सावली
मायेची उब थंडीत मिळती
आई... बस ती आईच होती

परिसापरी ती सदैव झिजली
पण, दिन आम्हा आले सोनेरी
मान-स्वाभिमान ठेवून होती
आई...बस ती आईच होती

जुळ्या नातवांवर माया भारी
दुधावरच्या सायी सम प्यारी
आजी सदैव कौतुक करती
पण....आई...बस ती आईच होती
आई...बस ती आईच होती

दीपिका 'संध्या'
१५ मे २००८

काही प्रतिक्रिया

आशा जोगळेकर

खूपच भावस्पर्शी लेख. आई म्हणजे आई..फक्त आईच असते. तिची तुलना आणखी कशाने होतच नाही.

असा माझा ऑरकुट परिवार...

ऑरकुट परिवाराची रंगत-संगत

मध्यंतरी ४-५ वर्षाच्या काळात घरातील बाकी काही कारणांमुळे सतत भारतात जाणे होत असे. मी घरीच असल्यामुळे कधी काही निरोप मिळाला की लगेच भारत गाठायचे हाच नियम होऊन बसला होता. कुवैत महाराष्ट्र मंडळात सभासद होतो पण वर्षभर होणार्‍या कार्यक्रमांत सहभागी होताच येत नसे. त्यामुळे हळू हळू बाकी इतरत्र आपल्या मराठमोळ्यांच्या पण गाठी भेटी कमी होत गेल्यात. तुमच्या कायम होणार्‍या अनुपस्थिति ने आपण सगळ्यांच्या विस्मरणांत जातो. चार पाच आप्तस्वकीय राहिलेत ज्यांच्याशी कुवैत मधे आल्यापासून जी मैत्री झाली होती ती तशीच टिकली त्या मुळे घनिष्ट होती. त्यांच्याच बरोबर दिवस जात होते. सुख-दुःखात तेच होते बरोबर...

कुवैत
मधे आल्यापासून माझा आवडता हा संगणक आणि मी.. असे समीकरण झाले आहे. जालावर (नेट वर) खूप मित्र मैत्रिणी भेटल्या आहेत. मला कामाची, काही करून दाखविण्याची थोडी दिशाही मिळाली. गेली ७-८ वर्षे मी त्यात पूर्णपणे गुंतलेली आहे. त्यामुळे वेळेचा सदुपयोग आणि बरोबरच मनोरंजन सुरू असतं..

ऑरकुट
ऑरकुट चा हो-हल्ला ऐकून होते पण फारसे लक्ष दिले नाही त्याकडे. आपल्या कामांतच दिवस जात होते. सहा महीन्यांपुर्वी ठामपणे ठरविले की आता बघायचेच हे ऑरकुट काय भानगड आहे ती. जीमेल ची सभासद होऊन एकदाचे ऑरकुट सुरू केले. प्रोफाइल लिहीण्यापासून सुरूवात झाली. आपल्याबद्दल काय काय लिहायचे हे अगदी विचार करून करून लिहीत होते कारण सगळ्यांनीच (इथे कोणी यावे कोणी जावे असे आहे नं) ते वाचण्यासारखे पण असावे. ( ही झाली जरा गंमत.. :-) ). मग शिकले की मित्रमंडळी कशी गोळा करायची. सगळ्यात आधी माझ्या रुचिर शिशिर ला माझ्या मित्रांच्या यादीत सामिल केले. कुवैत मराठी मंडळींची कम्युनिटी वैभव काजरेकर (वैशाली चा मुलगा) ने सुरू केल्याचे दिसले त्यात मी सहभागी झाले. तिथे तर इथले सगळेच दिसले मला...वा!! काय आनंदाचा क्षण होता तो माझ्यासाठी. सगळ्यांना धडाधड माझे मित्र होण्यासाठी अनुमति (friend request) मागितली आणि सगळ्यांनीच मान्य केली. महीन्याभरांत माझे स्क्रॅप बुक वाढत चालले होते...मित्रमंडळींची संख्या तर विचारूच नका... मस्त वाटत होतं.

रोज
सकाळी सुप्रभात चा स्क्रॅप टाकणे हा एक छंद म्हणा... नियम म्हणा... होऊन बसला आहे आता. वैशाली व विवेक काजरेकर, जयश्री कुळकर्णी अंबासकर, अदिती जुवेकर, स्मिता काळे, हर्षदा रोंघे, सुरुचि लिमये, प्रसन्न आणि अश्विनी देवस्थळी, सौदामिनी(सविता) कुलकर्णी... (सविता इथे येऊन जाऊन असते.) किती नांवे घेणार. ही सगळी कुवैत ची मंडळी... नंतर माझ्या तोंडात सारखे ऑरकुट ऑरकुट...किती मज्जा येते वगैरे समजले तर शिल्पा धुमे पण आता आमच्यात आलीय...सहीच एकदम...

आणि
त्यात अजून एक लहान बहीण भेटली...कॅनडा ची मोनिका रेगे...इतकी जवळ आली आहे की रोज तिचा मला आणि माझा तिला व्हॉइस मेसेज असतो. किती किती ह्या ऑरकुट मंडळींचे किती किती प्रकाराने प्रेम मिळतंय...शब्दात सांगणंच कठिण...

ह्या
व्यतिरिक्त खूप आप्तस्वकीय भेटले आहेत. त्यात सगळ्यात आधी देव काका...(काका म्हंटले आहे त्यामुळे ते रागवणार मला...कारण आम्ही थोडे फार एकाच वयाचे..पण थोडी फिरकी चालतेच आहे नं... ) आधी स्क्रॅप व नंतर आता तर जीटॉक जिंदाबाद..सकाळी सकाळी सुप्रभात सुरू होतं.. किती कितींबद्दल सांगावे कळत नाहीये...असे तर खूप माझी मित्रमंडळी उल्लेखामधून सुटणार...तर माफ करा मला जी सुटलीत...त्यांच्याबद्दल पुन्हा कधी..

तर
सांगत होते की सहज मनांत आले आणि विचार केला की ह्या कुवैत च्या ऑरकुट मंडळींना मस्त घरी धम्माल करायला बोलवावं.... माझीच संकल्पना माझ्याच निरनिराळ्या कल्पनांनी आकार घेऊ लागली. दूध्व(दूऱ ध्वनि- फोन) करून विचारले तर कधी हिला वेळ नाही कधी कोणाला कुठे जायचे आहे...असे सगळ्यांचे ताळ-मेळ बसवून मी ५ एप्रिल ला ठरविले रात्रि भोज चे..... ४ तारखेला आमची महाराष्ट्र मंडळाची सहल होती..तिथे सगळेच होते.. एकदा आठवण करून दिली. (सगळ्यांच्याच मनांत ऑरकुट परिवाराचे सम्मेलनच नक्की आहे की माझ्याकडे अजून बाकी काही कारणाने मी बोलवते आहे...कारण संकल्पना जरा नवीन होती...पचनी कशी पडावी... ) जेवणाचा बेत तर ठरवून ठेवलाच होता. श्रीखंड (पुरी नाही कारण हल्ली वजन वाढणे व त्यावर ताबा..ह्या भानगडीत तळकट खायला कोणी तयार होत नाही) पोळ्या, दोन भाज्या, वरण भात हिरवी मिरची कोथिंबीरीची चटणी वगैरे वगैरे...
सगळे ठरल्या वेळी आलेत....दारांत 'ऑरकुट परिवार.. स्वागत' हे रांगोळीत लिहीलेले वाचून सगळेच आनंदलेत. मग गप्पा-टप्पां बरोबर एक घास चिवड्याचा आणि एक खारा शंकरपाळा सगळेच उचलत होते. खूपच रंगली होती महफिल. जेवणाची वेळ होत आली होती. सगळे मनसोक्त कौतुक करत जेवणाचा आस्वाद घेत होते. श्रीखंड व चटणीची (काय विरोधाभास हा.. :-).) खूप तारीफ झाली. जेवणे आटोपल्यावर मसाला पानाने (विडा) अजून मजा आणली.

निरोप
घ्यायच्या वेळी जयश्री चा नवीन अल्बम आल्याबद्दल तिचे कौतुक तिला सुंदरसा फुलांचा गुच्छा देऊन केले. आनंद आमच्या दोघींच्या डोळ्यात सामावत नव्हता. आनंदाश्रु डोळ्यात होते दोघींच्या पण....पण खूप छान वाटले...

दुसर्‍या दिवशी सगळ्यांनाच ऑफिस होते त्यामुळे गप्पा अर्धवट सोडून व खंत करत सगळेच साढे दहाच्या सुमारास घरी परतलेत। फक्त असे ठरवूनच की पुढची अशी भेट गुरुवारी किंवा शुक्रवारी (कारण इथे शुक्रवार शनिवार सुट्टी असते॥)रात्रीच घडवून आणायची...म्हणजे धूम करायला सगळेच मोकळे....

बाकी सगळ्या कार्यक्रमात फोटो काढायचे राहून गेलेत...पुन्हा कधी...पुढच्या वेळी... :-)दुसर्‍या दिवशी माझ्या ऑरकुट मधे किती किती स्क्रॅप आलेत म्हणून सांगू...आनंदाने वेडीच झाले होते...सुखावले होते...
इति.....
असा आमचा ऑरकुट परिवार प्रसन्न प्रसन्न... :-)

दीपिका
जोशी 'संध्या'
७ एप्रिल २००८

लग्नाला २९ वर्षे पूर्ण होता होता.....



२१ जानेवारीलाच (श् श् २९ वर्षे उलटली त्या गोष्टीला बरं का..), आयुष्याला नवीन वळण लावणार्‍या ह्याच दिवशी हे माझे मनःपटलावरील शब्दरूप इथे साकारायचा प्रयत्न होता पण राहिलेच…आताच सही…माझ्या मनीचा हा आनंद …..


गुलाबापरी हा दिवस असा सततच हसावा
हाच हात हाती ध्यानी मनी तूच तू वसावा

बरीच पाने जीवनांतली उलटली आहेत परि
भासतो नवाच आज तू मनें आपुली जवळ खरी

वर्षांपुर्वी जो आपण होता डाव एक मांडला
वाटतो ना दोघांनाही खराखुरा आज रंगला

संसाराचा ताटवा भरघोस बघ हा बहरला
सुगंध प्रेमाचा दूरवरी त्यातून हा पसरला

आजवरी जी स्वप्ने संग-संगतीने रंगविली
प्रीत भर्‍या साथीने आपण ती साकारिली

तुझ्या ओठावरी असेच हास्य सदा खुलावे
साथ तुझीच सदा, निर्मळ प्रेम मज मिळावे

दीपिका ‘संध्या’
१८ फेब्रुवारी २००८



मकर संक्रांत २००८


इच्छामृत्यु एक वरदान...

आता थोडे गंभीर विषयावर बोलू या...
कधी मनाची खुशी समाधान किंवा काव्य कविता कथा ह्या सगळ्यांच्या पलीकडे पण मला विचार करावासा वाटतो। असे कितीतरी विषय आहेत समाजात ज्याची गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता तर आहेच... त्यावर कृति पण व्हावी असे पण वाटून जाते. 'इच्छामृत्यु एक वरदान' हा पण विषय तसाच आहे. चर्चेचा विषय असून किंवा त्यावर खोलवर दृष्टि सगळयांचीच जावी अथवा विचार व्हावा असे वाटत असून पण काही इलाज नसल्याने पुढे कोणीच धजावत नाहीत. वैद्यकीय नियमांत किंवा आपल्या संविधानांत अशा प्रकारचा काही नियम नाही.

सुलभ मृत्युची इच्छा प्रत्येक प्राणीमात्र बाळगून आहे. पण कोणाच्या नशिबाचे ह्या बाबतीत दार उघडेल हे सगळे अंधारातच आहे. समाजात किती तरी प्रकारचे लोक आहेत- गरीब आणि श्रीमंत. असे पण काही ज्यांना संपूर्ण आयुष्यभर काही न काही तरी त्रास भोगावा लागतो, हाडाची काडे करून एका हातावर मिळविणे आणि दूसर्या हातावर खाणे हा पण एक वर्ग तर ऐश्वर्यात लोळणारा- कष्टाची झळ न पोहोचणारा दूसरा वर्ग, पण शेवटी जीवन हे सगळयांचेच आहे आणि जगायचेच आहे. प्रत्येक माणूस जगतोच आहे.

जीवन
सुरू झाले तर अंत निश्चित आहे, पण सुलभ होवो ही मनीषा. आपण आपल्या आजूबाजूला असे किती तरी जीव बघतो जे जगताहेत पण बघणार्यांचे काळीज पिळवटून निघते व आपसूकच मनांत का होईना पण 'देवा हयाला सोडव रे बाबा' असे आल्याशिवाय रहात नाही. इतक्या यातना, इतके शरीराला कष्ट, मृत्युजवळ तर जवळपास पोहोचलेलेच असतात पण त्याला हात लावू शकत नाहीत. अशा लोकांसाठी 'इच्छामृत्यु' एक वरदानच ठरेल. हया संदर्भात फादर लुई वेदरहेड ने म्हंटले होते, "असाध्य रोगांनी ग्रासलेल्या, शरीराची बरीचशी इंद्रियांनी काम करण्यास नाकारलेल्या जीवाला कृत्रिम मशीन लावून त्याच्या इच्छेविरूद्ध त्याला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणार्यांना देव शिक्षा का देत नाही." आणि हे लोक म्हणजे डॉक्टर्सच न! पण जर त्यांनी जीव वाचविण्याची शप्पथ घेतली आहे तर ते जीव कसा घेणार हो!

हे
सगळे नजरेसमोर ठेवता इच्छामृत्यु चा कायदा किती महत्वपूर्ण आहे आणि त्यावर विचार केला जाणे जरूरी आहे हे ठळकपणे जाणवू लागले आहे. प्रत्येक व्यक्तिला आपली मते सांगण्याचा आणि स्वयं निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, जर आपल्या शारीरिक त्रासदींना कंटाळून तो असे जाहिरपत्र लिहून देतो - "जर डॉक्टरांच्या मते आता हयापुढे मला हया शारीरिक यातनांपासून मुक्ति मिळू शकणार नसेल तर अश्या दुर्भाग्यपूर्ण अवस्थेमधे कृत्रिम उपचारांवर परावलंबी आणि लाचारीचे जीवन जगण्यापेक्षा मला इच्छामृत्यु देऊन मुक्ति द्यावी." तर अशा इच्छामृत्यपत्राचा आदर केला गेला पाहिजे. इच्छामृत्यु एक वरदान सिद्ध होऊ शकते असे फक्त म्हणून काय उपयोगाचे? हया म्हणवल्या जाणार्या वरदानाला जगात कुठेही मान्यता मिळालेली नाहीये. 'इच्छामृत्यु' वा 'दयामृत्यु' हा सध्या एक मोठा वादाचा विषय होऊन बसला आहे. विषयाच्या बाजूने आणि विरूद्ध वाद सुरूच आहे.

आजारपणांत
रोग्याचा त्रास दूर करण्यात प्रत्येक डॉक्टर प्रयत्नशील असतोच. असेच एक डॉक्टर आहेत ऑस्ट्रेलियाचे डॉ.फिलिप. त्यांच्या मते जर उपलब्ध डॉक्टरी उपाय रोगीच्या वेदना कमी करण्यात सक्षम नसतील आणि मृत्यु हा अखेरचाच उपाय डॉक्टरांच्या नजरेसमोर असेल तर त्या जीवघेण्या (पण लवकर न संपणार्या) वेदना सहन करत राहण्या व मृत्युची वाट बघत बसण्यापेक्षा त्या रोग्याला सुखद मृत्यु देण्यात यावा. त्यांचे हया बाबतीत प्रयत्न सुरू आहेतच. खूप विरोध सहन करावा लागत असतांना पण ते आपल्या हया मताशी चिकटून आहेत. इच्छामृत्यु किंवा दयामृत्यु, हयाचा ते इतक्या प्रखरतेने प्रचार करत आहेत की ऑस्ट्रेलिया मधे त्यांना 'डॉ ड़ेथ' हयाच नावाने आता सगळे ओळखू लागले आहेत.

ह्या
इच्छामृत्यु साठी तत्काळ मृत्य यावा म्हणून त्यांनी एक खास मशीन 'डेथ मशीन' पण बनविली आहे. ते कायद्याच्या विरूद्ध तर जाऊ शकत नाहीत पण त्यावर पर्याय शोधण्याच्या मागे मात्र जरूर आहेत. आंतर्राष्ट्रीय समुद्रात जहाजावर इच्छामृत्यु देणे व येथे ऑस्ट्रेलियन कायद्याला चालू न देण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांना पक्का विश्वास आहे की त्यांना यश नक्कीच मिळेल. त्यांनी असा पण दावा केला आहे कि त्यांना आजपर्यंत २०० हून अधिक लोकांनी इच्छामृत्यु मागितला आहे.

तीव्र
वेदना सहन करणारा व्यक्तिची अशी इच्छामृत्युची विनवणी समोरच्या माणसाला हलवून सोडते. जर सगळयांनी हया विषयावर थोडा जरी विचार करायला सुरूवात केली तरी कदाचित काही पर्याय शोधता येईल. प्रजासत्ताक देशात जेंव्हा सत्तापक्ष असा सामाजिक क्रांति घडवून आणणारा प्रस्ताव आणतो तेंव्हा विरूद्ध पक्षाकडून तो हाणून पाडला जातो. भारतासारख्या परंपरावादी देशात असे कायदे लागू होण्याची शाश्वती वाटत नाही. असा कायदा कदाचित लागू होणे अशक्य असेल पण रोगी स्वत: जर का ही इच्छा व्यक्त करत असेल आणि त्याच्या यातना बघवत नाहीत असे म्हणणार्या त्याच्या कुटुंबातील लोकांचे त्याला सहकार्य मिळाले तरच हे काही प्रमाणात शक्य होऊ शकते. पण कितीही झाले तरी कुटुंबातील लोक कधी हयाला तयार होतील? इच्छामृत्यु हया विषयाची दूसरी बाजू अशी पण आहे की डॉक्टर जेंव्हा पूर्णपणे रोगीच्या बाबतीत हताश आहेत तेंव्हा ते स्वत: रोग्याच्या बाजूने उभे राहू शकतात। असहय वेदनेतला रोगी सोप्या मृत्युला जवळ करू शकतो. इच्छामृत्यु आणि सहज सोपा मृत्युसाठी रोग्याला मदत करण्याला 'रोग्याचा जीव घेणे' असे म्हणू शकत नाही. सेवाधर्म हया डॉक्टरांनी सोडून दिला आहे असा विचार करणे पण बरोबर नाही.

वेळा जन्मत:च असे रोगी असतात जे मानसिक व शारीरिक दृष्ट्या लाचार असतात। समाज किंवा कुटुंबातील व्यक्ति त्यांना परावलंबी व बोझ समजत नसतील पण, पण ही सत्यपरिस्थिति आहे। हया लोकांना ही समज पण नसते। अशा व्यक्तिंसाठी डॉक्टर व कुटुंबातील सदस्य ह्यावर निर्णय घेऊ शकतात. नीदरलैंडमधे अश्या इच्छामृत्युला सुरूवात झाली आहे. हयाचबरोबर जेंव्हा नुकतेच जन्मलेले बाळ बर्‍याच गोष्टींची कमी घेऊन जन्मले असेल व पूढचे आयुष्य त्याचे अंधारात आणि खूपच भयावह असेल तर त्याला पण असा मृत्यु देऊ शकतो. फक्त सगळयांचा सहयोग इथे पण आवश्यक असतोच.

डॉ.केव्होरकीयन ने पण अमेरिकेत ८० च्या वर अशा प्रकारच्या लोकांना मृत्यु देण्यात मदत केली आहे पण त्यांना आवश्यकतेनुसार सहयोग प्राप्त झाला होता हे विशेष. इच्छामृत्यु व तो ही एकदम कमी त्रासाचा व ताबडतोब मिळवून देणार्या पद्धतींवर अधिक जोर दिला जातो.काही रोगी असे असतात जे आपल्या इच्छाशक्ति आणि आत्मशक्तिच्या जोरावर ओढवणारे कुठलेही दु:ख झेलायला तयार असतात पण काही असा वर्ग आहे जो आजाराचे नाव व तीव्रता समजताच हातपाय गाळू लागतात. अशा निराशावादी लोकांना पण जीवनाचा अंत करण्याचा हा एक पर्याय आहे.

तसे बघितले तर ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे की असा मृत्यु कोणाला देणे सोपे काम नाही। पण रोग्याची एक सारखी इच्छामृत्युची इच्छा, डॉक्टरांची सहमती आणि कुटुंबाचा सहयोग असला तर 'इच्छामृत्यु' सफल होऊ शकतो. आता हेच बघायला हवे की 'इच्छामृत्यु' ला न्यायिक सम्मति मिळून हा व्यवहारात येऊ शकतो का?

दीपिका 'संध्या'
११ जानेवारी २००८

अनु चा ८वा वाढदिवस....






-९ वर्षांपासूम जीवनांत एकूण असा काही बदल घडून आलाय की त्यामुळे मी स्वतः कुठून कुठे पोहोचलीय असा विचार करत असते। नव्या दिशा नवी स्वप्ने मिळालीत. नवीन शिकायला मिळतेय ह्याचे समाधान आहेच. अभि-अनु माझ्या एकदम जवळचे आहेत. प्रत्येक क्षण त्यांच्या सानिध्यात आनंदात जातोय. त्यांचे काम करतांना भलताच एक प्रकारचा उत्साह असतो. हे काम करता करता किती तरी नवीन लोक ह्या ना त्या माध्यमाने सानिध्यात आलीत. तसेच साहित्याच्या अनेक रूपांची पण ओळख झाली जी कदाचित एरव्ही कधी होणे शक्यच नव्हते. कधी उत्साहाने लेखणी पण चालतेच....


अनु
ने १ जानेवारी ला आठव्या वर्षात पदार्पण केले आहे.. त्या निमित्याने तिच्या कौतुकात दोन शब्द.....

अनु चे आगमन
होते सुंदर सजावटीने
मन हर्षिते एक नजर फिरविता


दर आठवडी
कविता नव नवीन
घेऊन येते सगळ्यांकरिता

असंख्य कविंच्या
काव्यांचा संगम इथे
कवितांची जणु वाहे सरिता

खुलली फुलली
दर दिवशी ती बहरली
सात वर्षे संपली न उमजता

आठव्या
वर्षात अनु चे पदार्पण....तिचे खूप खूप खूप अभिनंदन

दीपिका 'संध्या'
९ जानेवारी २००८

नव वर्ष अभिनंदन २००८


मला पुन्हा शाळेत जायचंय....


आमच्या वेळेचा काळ कृष्ण-धवल. किती गोड त्या आठवणी असाव्यात शाळेतल्या. मनांत साठलेल्या, कुठेतरी जशी काय मी घडले आहे त्यात सहभागी झालेल्या.... घडलेल्याला कोरीव रेखीव बनवण्यात किती तो मोठा वाटा असतो ना त्यांचा. इतका काळ लोटला...नंतर मुलांच्या शाळेचे दिवस संपूनही बरीच वर्षे झालीत. त्यांच्या शाळेच्या दिवसांत मी पुन्हा माझे बालपण...शाळेचे दिवस जगल्यासारखे वाटून गेले होते. अर्थात दोन्हींमधे फरक तर जमीन-आसमानाचा होताच पण तरी....

एकदा कुठेतरी अशीच एक कविता वाचनांत आली होती, बरेच दिवस झालेत त्याला. आज पुन्हा प्रकर्षाने आठविण्याचा प्रयत्न करत होते। थोडी फार त्याच आशयाची ही कविता... मला खूपच आवडला होता तो विषय...

एकदा तरी मला शाळेत पुन्हा जायचेच आहे......
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय,
धावतजाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय,
रोज सकाळी खडया आवाजात राष्ट्रगीत म्हणायचय,
नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावरछान अक्षरात आपलं नांव लिहायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

मधली सुट्टी होताच वॉटरबॅग सोडून
नळाखाली हात धरूनच पाणी प्यायचय,
कसाबसा डबा संपवत तिखट मीठ लावलेल्या
चिंचा बोरं पेरू काकडी सगळं खायचय

सायकलच्या चाकाला स्टंप धरून
खोडरबर आणि पाटीने क्रिकेट खेळायचय,
उद्या पाऊस पडून शाळेला सुट्टी मिळेल का
हाविचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित सुट्टीच्या आनंदासाठी
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय

घंटा व्हायची वाट बघत का असेना
मित्रांशी गप्पा मारत वर्गात बसायचय,
घंटा होताच मित्रांचं कोंडाळं करून
सायकलची रेस लावूनच घरी पोचायचय,
खेळाच्या तासाला तारेच्या कुंपणातल्या
दोन तारांमधून निघून बाहेर पळायचय,
ती पळून जायची मजा अनुभवायला
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच
सहामाही परिक्षेचा अभ्यास करायचाय
दिवसभर किल्ला बांधत मातीत लोळून पण
हात न धुता फराळाच्या ताटावर बसायचय
आदल्या रात्री किती ही फटाके उडविले तरी
त्यातले न उडलेले फटाके शोधत फिरायचंय
सुट्टीनंतर सगळी मजा मित्रांना सांगायला
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

कितीही जड असू दे जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराचंच ओझ पाठीवर वागवायचंय
कितीही उकडत असू दे व़ातानुकुलित ऑफिसपेक्षा
पंखे नसलेल्या वर्गात खिडक्या उघडून बसायचंय
कितीही तुटका असू दे, ऑफिसातल्या एकटया खुर्चीपेक्षा

दोघांच्या बाकावर तीन मित्रांनी बसायचय,
"बालपण देगा देवा" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ
आता थोडा कळल्यासारखं वाटायला लागलंय
तो बरोबर आहे का हे सरांना विचारायला
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय...

ही कविता माझी नाहीये पण मी ह्या कवितेत जगले मात्र अगदी पूर्णपणे.......

दीपिका जोशी 'संध्या'
११ डिसेंबर २००७

गुरुवार, २१ मे, २००९

काही माझ्या मनांतले...

मंडळी!!

जीवनांत उलाढाल्या किंवा चढउतार नाहीत तर मग ते कसले जीवन! अशा पण घटना असतात ज्या मनांवर कायम कोरल्या जातात। कोणाला तरी सांगावाश्या वाटतात. त्यातीलच ही एक, कदाचित तुम्हाला पण वाचून मजा येईल असा विचार करून आपल्यापुढे ठेवण्याचा हा प्रयत्न! तशी हया घटनेला २८ वर्षे झालीत पण जेंव्हा विचार करते तेंव्हा लक्षात येते कि ही सगळी काळाची किमया आहे जो हातातून निसटतच राहतो. जेंव्हा मला समजले होते कि मी आई होणार तेंव्हा आनंदाने मी तर हरखले होते पण खुशी लाजेपाई प्रगट करू शकले नाही असा हया घटकेला माझा अंदाज आहे. पाचव्या महिन्यांतच डॉ. ने जुळे होण्याची शंका वर्तविली होती. पण त्या काळच्या सुविधानुरूप हा संभ्रम आम्हाला पुढचे दोन महिने संभाळावा लागला. तेंव्हा सोनोग्राफी नसल्याने आठव्या महिन्यात एक्स-रे जेंव्हा केला तेंव्हा हया गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले कि मला जुळे होणार. हया गोष्टीने माझ्या मनांवर काय परिणाम झाला होता हे आता फारसे लक्षात नाही पण फक्त इतके समजले होते की सगळयांपेक्षा वेगळे काही तरी होणार! म्हणायला म्हणतात कि जुळे प्रकरण अनुवंशिक आहे पण आमच्या घराण्यात आधी कुठे जुळे होण्याचे ऐकिवात नाही त्यामुळे ही परंपरा आम्हीच सुरू केली असे म्हणायला हरकत नाही. पूर्ण दिवस घेवून मला ९ मिनिटांच्या अंतराने दोन गोड मुले झालीत. जुळया मुलांना बघण्यासाठी नेहमी माझ्या खोलीत गर्दी असायची, त्या वेळी त्यांच्याबरोबर माझेही महत्व वाढल्याचे मला जाणवायचे. मुलीची मला आधीपासूनच खूप आवड, पण काही हरकत नाही, दोन्ही मुले झालीत तर.... पण मुलांकडे बघून मी खुश पण तितकीच आहे, असो. मुलगी होवो या मुलगा, आई होणे हे स्त्री जीवनाचे एक स्वप्न असते परंतु हीच जाणीव ९ मिनिटांच्या अंतराने दोनदा अनुभवणे हे तर माझ्या सारखी जुळया मुलांची आईच समजू शकते.


त्यांची नांवे रुचिर आणि शिशिर ठेवली आहेत. मला माझ्या लहानपणी लहान मुलांचा अति लळा. छोटया छोटया मुलांमधे माझे मन खूप रमायचे. म्हणूनच जेंव्हा माझी आई होण्याची वेळ आली तेंव्हा देवाने माझी लहान मुलांची हौस जरा ज्यास्तच पूर्ण केली. मी पण आनंदाने हे जुळया मुलांचे आव्हान स्वीकारले होते।

जरी जुळे होते तरी सुरुवातीला ते अगदी वेगळे दिसत. मला कधीही असे लक्षात नाही की त्यांना सांभाळायला कधी त्रास झाला आहे. साधारण ७-८ महिन्यांचे झाल्यावर ते बरेचसे एकसारखे दिसू लागलेत. प्रकृति व उंची म्हणाल तर बरेच साम्य. एकमेकांसमोर त्यांना ठेवले तर कदाचित त्यांना मजा पण वाटत असेल, त्यांचे एकमेकांकडे बघून हुंकार देणे आमचे मात्र मन रमवित असे. एकसारखे कपडे घातले तर अजूनच कौतुकास्पद व्हायचे. एक मजेदार प्रसंग सांगते, जेंव्हा दोघे साधारण ३-४ वर्षांचे होते. मला नेहमी लोकांचा सहज प्रश्न असायचा की दोघांमधे मोठा कोण? एकदा अशाच प्रश्नाचे उत्तर देतांना मी बोलून गेले, "रुचिर मोठा आहे." जवळच बसलेल्या शिशिरला हे उत्तर पटले नाही. माझ्या उत्तराला प्रत्युत्तरच म्हणा ना, लगेच "नाही, नाही, आम्ही जुळे भाऊ आहोत त्यामुळे कोणीच मोठे नाही, आम्ही बरोबरीचे आहोत!" असे म्हणून पार झाला. माझे वक्तव्य चूकीचे आहे ही समज मला मुलांनीच दिली व ती चुक मी पुन्हा कधीही केली नाही।



जेंव्हा शाळेत जाऊ लागले तेंव्हा मित्रमंडळींची व शिक्षकांची धमाल येऊ लागली, कोणता रुचिर व कोणता शिशिर! पण हया दोघांनी त्याचा कधी फायदा घेतला नाही. लहान असतांना जेंव्हा 'अरे! जुळे दिसताहेत' असे कोणी म्हणायचे तेंव्हा त्यांना खूप मजा वाटायची. चौथ्या इयत्तेत होते तेंव्हाची गोष्ट. त्यांच्या शाळेत सकाळी प्रार्थनेच्या वेळी एका विद्यार्थ्याने ताज्या बातम्या सांगण्याची प्रथा होती. एक दिवस रुचिर चा नंबर होता, त्याने सांगितल्या. दोन तीन दिवसांनी शिशिर वर वेळ आली. जेंव्हा शिशिर तिथे उभा राहिला तेंव्हा त्यांच्या प्रिन्सीपल चे कथन खूप मजेदार होते. 'दोन दिवसापूर्वीच तर तू सांगितल्यास ना ताज्या बातम्या, आज कोणी दूसरा सांगेल' सगळया मुलांमधे हंशा पिकला. नंतर असमंजस मधे पडलेल्या प्रिन्सीपलांना हया जुळया भावांबद्दल सांगण्यात आले. मग त्यांनीच रुचिर ला पण मंचावर बोलविले व सगळयांनी टाळयांचा कडकडाट केला. त्यांच्या शाळेत हयांच्याशिवाय जुळयांची जोडी नव्हती म्हणून अजूनच सगळयांनी मजा घेतली. त्या क्षणी कसे वाटले होते, त्यांच्या त्यावेळच्या भावना मात्र ते व्यक्त करत नाहीत।


अभ्यासाच्या बाबतीत तसे दोघेही चांगले आहेत पण 'अगदी एकसारखे मार्कस कसे मिळणार' त्यामुळे अशा प्रत्येक वेळी मोठा नाजुक प्रसंग येत असे. अशा प्रसंगी त्यांना समजाविण्याचे नवीन नवीन उपाय मला योजावे लागत. जुळया मुलांची मानसिकता कशी असते हे समजून घेण्यासाठी हया विषयावरील बरीच पुस्तके मी वाचली. त्याच आधारावर त्यांची मने सांभाळण्याचा माझा प्रयत्न असे.जसे थोडे मोठे झालेत तसे तुझे माझे समजू लागले. एकमेकांच्या वस्तु वापरणे नामंजूर होऊ लागले. भांडणे सुरू झालीत पण फक्त घरात, बाहेर मात्र एकदम जीवाभावाचे भाऊ असल्याची वर्तणूक, किती गोड. ते दोघे एव्हाना एकमेकांचे मित्र पण होतेच पण त्याही पेक्षा त्यांच्यात एक वेगळाच दुवा होता जे तेच अनुभवू शकतात. असे म्हणतात कमीत कमी लहान असतांना तरी जुळया मुलांना एकमेकांपासून दूर करू नये व हया वक्तव्याला आमची पूर्ण सहमति आहे।

आम्ही सुरूवातीपासूनच स्पर्धात्मक परिक्षांसाठी त्यांना प्रोत्साहित केले आहे. पाचव्या वर्गात असतांनाच महाराष्ट्रात होत असलेल्या सैनिक स्कूल च्या प्रवेश परीक्षेपासून हयाची सुरूवात झाली. स्पर्धात्मक परिक्षा म्हंटल्या की जरा कठिण असणारच. मेहनतीला न घाबरता दोघांनीही मन लावून हया परिक्षेची तयारी केली. दोघेही पहिल्या दहा मधे येऊन गौरव प्राप्त केला. नंतर इंटरव्यू सातारा येथे होता. नऊ वर्षाच्या वयात सैनिकी ऑफिसरांसमोर होणारा इंटरव्यू पण हया जोडीने हिम्मतीने पार पाडला. आमच्या लक्षात आले ते असे की त्यांच्या लेखी 'भिती' हा शब्दच नाहीये व इथूनच त्यांच्या हिम्मतीत अधिक भर पडली.



जेंव्हा हे दोघे आठव्या वर्गात होते तेंव्हा त्यांचे बाबा नोकरीच्या निमित्याने परदेशात गेलेत. आता तर हया वाढत्या वयाच्या मुलांची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावरच होती. पण प्रत्यक्षात झाले उलटेच. जशी त्यांनीच माझी जबाबदारी घेतली होती. खूपच समजुतदार झाले होते एव्हाना. १३-१४ व्या वर्षीच त्यांचे बालपण हरवल्यासारखे झाले ही खंत माझी आयुष्यभराची आहे हयात शंका नाही. आता तर त्यांचे व माझे मित्र-दोस्तीचे नाते झाले होते. आम्ही तीघे सगळया विषयांवर बोलत असू. आम्ही त्यांना आधी तीन व नंतर दोन चाकी सायकल वेगवेगळया घेतल्या होत्या तरीही भांडणे होत असत. पण जेंव्हा स्कूटर चालवायची वेळ आली तर की मात्र एकच! दोघांनी समजूतीने चालविली खरी. दोन चाकी सायकल मी स्वत: त्यांना त्यांच्या मागे धावून धावून शिकविली होती. त्याच माझ्या चिमुकल्यांनी मोठे झाल्यासारखे माझ्या मागे बसून मला स्कूटर शिकविली व मला जाणवून दिले की किती मोठे झालेत.



दहावी व बारावी मधे अतिशय उत्कृष्टपणे पास झालेत. पुण्याला इंजीनियरिंग पूर्ण करून आपल्या पुढच्या अभ्यासासाठी दोघेही अमेरिकेला रवाना झालेत. उच्च शिक्षणपूर्ण होताच दोघेही कामाला लागले आहेत. आम्ही दोघे कुवेत मधे व ते दोघे तिकडे. ह्या वयांत पोहोचता-पोहोचता जरा ज्यास्तच जवळ आल्यासारखे वाटतात एकमेकांच्या आणि न भांडता खरे मित्र. कितीही लहान काम असो, दोघेही बरोबर जाऊनच करणार।




बाकी जुळया मुलांच्या आई बाबांचा काय अनुभव आहे हे मला माहित नाही. पण आमच्या मुलांनी आमचा नेहमी सन्मान वाढविलाच आहे. त्यामुळेच अभिमानाने म्हणावेसे वाटते की मुले व्हावीत तर जुळी व ती ही आमच्या मुलांसारखी. आज असे जाणवते की आम्ही दिलेल्या संस्कारांचे व शिक्षणाचे त्यांनी पुरेपूर चीज केले आहे. माझ्या मनांत नेहमी येते की काय मागच्या जन्मीचे माझे पुण्य आहे की हया जन्मी मला अशी गुणी मुले लाभलीत. सुरूवाती पासूनच माझे वर्तन जरा शिस्तीचे व कडक होते. त्याचा असर त्यांचे व्यक्तिमत्व चांगले घडण्यात झाला असावा असे मी समजून चालते. हया कडक शिस्तीची त्यांना काही खंत आहे का, त्यांच्या मनांत काही अढी आहे का, हे प्रश्न आज पण माझ्यापुढे अनुत्तरित आहेत.
जेंव्हा जुळी मुले झालीत तेंव्हा सांभाळायला थोडा त्रास तर होणारच होता पण त्यांना दोघांना बरोबर बरोबर वाढताना बघायला, त्यांच्या एकेक बाललीला बघतांनाची जी खुशी मला मिळाली आहे, ती अवर्णनीय आहे।

दीपिका जोशी 'संध्या'
५ ऑक्टोबर २००७

बुधवार, २० मे, २००९

आम्ही असे भेटलोत..





मी आणि पूनम






मातृभाषेवर माझे निस्सीम प्रेम आहे. वाचनाची खूप आवड होतीच. इथे कुवैत ला सप्टेंबर १९९७ मधे आल्यावर वेळ घालविण्यात ह्या पुस्तकांनी माझी खूपच साथ दिली. एकटेपणा, भारतापासून...आपल्या आप्त-स्वकीयांपासून दूर आल्याची भावना माझ्या मनांत कमी रूजली. हळूहळू मराठी व बाकी इतर मित्रमंडळी भेटलीत व इथले जीवन सुखकर होण्याच्या मार्गावर आले. त्यानंतर वर्षभरांतच कंप्यूटर व नेट च्या सहवासाने सोन्याहून पिवळे झाले. नेट वर पण बरीच मित्र-मैत्रिणी भेटू लागलीत. कॅनडा चा अश्विन गांधी आणि दुबई ची पूर्णिमा वर्मन त्यातलेच।

नेट वर अंतराला आणि कुठल्या देशांत. . .ह्याला काही महत्वच राहिले नाही नं! समवयस्क असल्याने नेट वरच छान गट्टी जमली. काही तरी भरघोस करावे असे विचार मनांत येऊ लागलेत. बाकी सविस्तर पुन्हा कधी आमच्या त्रिकुटा बद्दल... पण इतके खरे की आज आम्ही तिघांनी मिळून जे अभि-अनु सुरू केले आहेत त्यांना अभिमानाने आणि नेटाने... मेहनतीने आणि सफलतेने प्रगतीपथावर पूढे नेत आहोत. अशा माझ्या जवळच्या मित्रांबद्दल चार ओळी-

होती तहान एक थेंबाची
पुढ्यात हा सागर उसळावा
वाटे हसावे एक फूल अंगणी
असंख्य फुलांचा ताटवा फुलावा
अश्विन पूनम सम जिवलग मित्रांचा
अचानक असा लाभ व्हावा

आज बस येव्हढेच.....

पण असं म्हणुन चैन पडत नाहीये....तर थोडं पुढे जाऊच या..कारण ह्या मैत्रीची पुढची वाटचाल पण खूपच गम्मतशीर आहे......


नेट वर आम्ही भेटलो तो पण एक मस्तं मजेशीर किस्साच आहे....

"ठक, ठक!!"
कोणी तरी माझ्या कंप्यूटर वर आवाज देते होते. एक नांव दिसले, 'पर्ल'.
नाव बघून तर वाटले कोणी तरी महिला असावी, कुठल्या देशाची, किती वयाची, काय करत असावी, वगैरे-वगैरे किती तरी विचार माझ्या मनांत फेर धरून नाचू लागले. जेंव्हा त्या "ठक ठक" ला उत्तर दिले तेंव्हा कळले की तिचे नांव 'पूर्णिमा' आहे, ती पण आमच्या प्रमाणेच भारतीय आणि समवयस्क गृहिणी असून नुकतेच दुबई मधे सध्या आहेत. इंटरनेट आणि कंप्यूटर मुळे सगळे जग किती जवळ आले आहे हेच खरे. इंटरनेटशी नाते जुळले की बाकी पण बरीच नाती-गोती, मित्र-मैत्रिणी मिळू लागतात ज्यांच्याशी पुढे जाऊन मनाची जवळीक होते. आपुलकीचे संबंध व्हायला वेळ लागत नाही.जवळपास ८ वर्षांपासून इंटरनेट शी नाते आहे माझे, पण सुरूवातीला इंटरनेट फक्त वेळ घालविण्याचे साधन होते मला. खोलात शिरले तेंव्हा उमजले की इंटरनेट इतके असीम आहे की कोणत्याही दिशेला स्वैराचार आणि हवा तो विषय इंटरनेट वर उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे प्रथम मराठी व हिंदी दैनिक वर्तमान पत्र, बाकी काही साप्ताहिके वाचण्याला प्रारंभ केला. हे करता-करताच समजले की हया इंटरनेटच्या माध्यमातून मित्र-परिवार पण वाढवू शकतो, पण कसा? हा विचार मनांत असतानांच पूर्णिमा ने आवाज दिला होता.

गप्पा सुरू झाल्या, विचारांचे आदान-प्रदान झाले तर समजले की खूप साम्य आहे आमच्या दोघींच्या विचारात. ती तर हिंदी भाषी आहेच पण माझ्या हिंदी भाषेच्या प्रेमाने आम्ही दोघी अजुनच जवळ आलो. रोज सकाळी ठरलेल्या वेळी इंटरनेट वर दोघी एकमेकींची वाट बघत असू. दोन-तीन महीन्यांतच खूप आपलेपणा जाणवू लागला. पुढे वर्ष कसे संपले कळलेच नाही. आता 'तुमच्या-आमच्या' वरून गप्पा करतांना 'तुझे-माझे' वर आलो होतो. नकळत ती माझ्यासाठी 'पूनम' आणि मी तिच्यासाठी 'संध्या' झाले. माझ्यापेक्षा थोडीच मोठी आहे ती वयाने पण कधी कधी चिडवायला तिला 'ताई' पण म्हणायला मी कमी करत नाही. पण सगळयाच्या वर आमच्या मनाची जवळीक फारच अनमोल आहे. पत्रकार क्षेत्रांतील असल्यामुळे तिने आधी भारतात असतांना पुष्कळ मासिक साप्ताहिकांसाठी काम केले होते. बदलत्या काळाबरोबर कंप्यूटर क्षेत्रातले ज्ञान पण खूप मिळविले आहे. इंटरनेट मुळे खूप लोकांच्या सान्निध्यात ती आहे. नंतर समजले की ती एका इंटरनेट पत्रिकेसाठी पण काम करते.

आता आम्ही दोघी एकमेकींना खूप समजू लागलो होतो. माझ्या स्वभावानुसार आणि उत्साह बघून ती मी नवीन-नवीन गोष्टी शिकाव्यात म्हणून प्रोत्साहित करत असे. ती ज्या इंटरनेट हिंदी मासिकासाठी काम करत होती त्यासाठी मी काही लिखाण करावे असे सांगण्याचा प्रयत्न करत होती. मी कधीच काही लेखनासाठी पेन हातात घेतले नव्हते, जरा अवघड वाटणारी गोष्ट तिच्या मदतीने थोडी फार सोपी झाली व माझा पहिला लेख लिहून तयार झाला। अश्या प्रकारे तिने मला म्हणण्यासाठी का होईना पण लेखिका बनविले. पूढे आजतागायत लिहिण्याची प्रक्रिया सतत सुरू आहे. तिने मला खूप काही शिकविले आहे, कंप्यूटरची जवळून ओळख करून दिली आहे. नविन नविन चांगल्या मित्रांच्या भेटी घडवून दिल्या आहेत, जे तिच्या परिचयाचे आहेत. त्यातलेच एक आहेत अश्विन गांधी. कॅनडा ला ३० वर्षांपासून वास्तव्यात असलेले अश्विन खूपच मजेदार स्वभावाचे वाटले. आता आमच्या तिघांच्या इंटरनेट वर भेटी सुरू झाल्यात, कधी गप्पा कधी काम! कॅनडाला रात्र तर आमच्या इथे दिवस, पण आम्ही जरूर भेटत असू रोजच.तिघांनी एकमेकांना फोटो पाठविलेत की अशी पण ओळख होणे आवश्यक होते. एक दिवस अचानक पूनम ने म्हंटले, "आपण तिघे मिळून एक इंटरनेट पत्रिका सुरू करू या का!" पत्रकारिता क्षेत्रातला अनुभव पूनमचाच खूप ज्यास्त होता त्यामुळे मुख्य जबाबदारी तिचीच असणार होती. आम्हाला मात्र नवीन काही तरी करायला मिळणार हया आनंदात सगळेच सहमत झालेत. नंतर त्या दिशेने विचार व चर्चा सुरू झाली. २ महीन्याच्या अथक प्रयत्नानंतर आमच्या 'अभिव्यक्ति' चे इंटरनेट च्या जगांत पदार्पण झाले. आमचा कामाचा उत्साह अधिकच वाढला होता. आमचे तिघांचे ही कामाचे क्षेत्र अगदी वेगवेगळे आहे जे आपापल्या जागी अतिशय महत्वाचे आहे. आधी पंधरवाडयाला प्रकाशित होणारा 'अभिव्यक्ति' चा अंक लवकरच आम्ही प्रत्येक सप्ताहात प्रकाशित करू लागलो. गद्य आणि पद्य ने सजलेले 'अभिव्यक्ति' साप्ताहिकाला नंतर थोडयाच दिवसांत 'अनुभूति' हया कवितांच्या वेगळया साप्ताहिकाची साथ मिळाली. अशा प्रकारे गद्य व पद्यची साप्ताहिके वेगवगळी प्रकाशित होऊ लागलीत.अभि-अनु सुरू झाल्यापासून पूर्णपणे कामात डूबलो होतो. इंटरनेट वर भेटी तर सुरूच होत्या पण आता प्रत्यक्ष भेटावेसे वाटू लागले. अश्विन त्यांच्या कॉलेज च्या सुट्टयांमधे उन्हाळयात भारतभेट करणारच होते. त्यांना दुबई ला येण्याचा आग्रह केला. आम्हाला कुवैत हून जाणे इतके कठिण नव्हतेच. इतक्या दिवसांची मैत्री, एकमेकांना बघितले नव्हते पण आता भेटीचा योग आलेला दिसत होता. मनांतून तर मी केंव्हाच दुबईला पूनम च्या घरी पोहोचली होती.

माझे पति जरा द्विधा मन:स्थितित होते, असे जावे की न जावे. पण माझी सगळयांच्या भेटीच्या इच्छेपुढे त्यांना पण जाण्याचा निर्णय घ्यावाच लागला. आम्ही कुवैत ला राहत असल्यामुळे आम्हाला दुबई बघण्याचे जरा ही आकर्षण नव्हते. दुबई साठी रवाना होण्यापूर्वी अशीच पूनम शी गप्पा मारत होते तर मला विचारू लागली, "संध्या, साडीचा रंग तर सांग जेणेकरून मला तुला एयरपोर्ट वर ओळखणे सोपे जाईल." मला खूपच हसू आले. मी मुद्दामच न सांगता, काही न बोलता इंटरनेट आणि कंप्यूटर बंद केला आणि उत्साहात दुबई ला निघालो. प्रवासात आमची दोघांची हीच चर्चा की कसे वाटेल बघून व प्रत्यक्षात भेटून. एयरपोर्ट वर एकमेकाला ओळखणे अजिबात कठिण गेले नाही. माझ्या साडीचा रंग विचारण्याची काहीच गरज नव्हती हे पूनम ला पण जाणवले. भावनेने भरलेल्या आम्ही सगळयांनी एकमेकाला मिठया मारल्यात, तो क्षण अजूनही ७ वर्षांनी पण माझ्या मनात मी जपून ठेवला आहे.














जितके दिवस बरोबर होतो सगळे, तितके दिवस सगळयाच विषयांवर चर्चा केली, इंटरनेट वरच्या आणि प्रत्यक्षात होत असलेल्या भेटीत कसा फरक आहे तो पण अनुभवला. अश्विन ने माझ्यासाठी फ्रंटपेज चे पुस्तक आणले होते, वर विचारणे कसे, "माहीत आहे ना संध्या, हे पुस्तक कशाला दिले आहे तुला! मी पण माझ्या मजेदार शैलीत उत्तर दिले, "होय तर, मग शिकायचेच आहे येऽऽऽस अश्विन।" पुष्कळ काही शिकून झाले आहे तसेच खूप शिकणे पण उरलेले आहे जे पूनम शिकविण्याचा आणि मी शिकण्याचा प्रयत्न करीतच आहोत. हे माझे मित्र अभिमान बाळगण्यासारखेच आहेत, आम्ही प्रत्येक जण आपल्याला जे येतय त्याची देवाण-घेवाण सतत करत असतो, नवीन नवीन एकमेकाला शिकवित असतो.
दुबई चा फेरफटका, सुंदर दृष्टिसौंदर्य बघता बघता खूप फोटो काढलेत, खूप आठवणी साठवल्या आहेत. दुबई चे समुद्रात स्थिरावलेले अल बुर्ज हॉटेल चे सौंदर्य रात्री बघण्यासारखे आहे, अर्थात आम्ही बाहेरूनच बघितले. आम्हाला खास आकर्षण दुबई च्या वाळवंटातील सफारी चे होते. बारीक वाळूच्या खूप ऊंच टेकडीवरून जीपने खुद्द खाली खोल उडी मारणे, खूपच भयंकर पण खूपच मजेदार! हीच तर मजा मला घ्यायची होती ज्याच्याबद्दल मी आजपर्यंत फक्त ऐकूनच होते.
दुबईतले चार दिवस कसे संपले कळलेच नाही. रात्री उशीरापर्यंत गप्पा मारत बसणे, पूनमच्या अंगणातील हिरवळीवर बसून सकाळचा गरम गरम चहा कधीच विसरता येणार नाही. परतण्याची वेळ आली तेंव्हा असे ठरविले की असेच दर वर्षी सगळयांनी भेटायचे, पुढच्या वर्षी आमच्याकडे कुवैत ला भेटू या नंतर अश्विन कडे कॅनडाला, तेंव्हा तर सगळयांनी होकारात्मक मान हलविली.

अश्विन भारताकडे आणि आम्ही आपल्या कुवैत ला परत आलो. पोहोचता क्षणीच पुन्हा इंटरनेटच्या भेटी सुरू झाल्यात. काही नाती वेळेनुसार खोलवर रूजतातच, भेटी मुळे अजूनच जवळीकीची होतात। ही आमची इंटरनेटची मैत्री माझ्या नजरेत एक वेगळाच आदर्श आहे.

जसे पहिल्या भेटीत ठरविले होते तसे कुवैत आणि कॅनडा ला तर आमचे सम्मेलन होऊ शकले नाही पण दुबईलाच पूनम कडे दोनदा भेटी झाल्यात. पहिल्या भेटीच्या वेळी कधी भेटलेलो नसल्यामुळे कुठेतरी मनांत भिती होती तोच मोकळेपणा हयावेळी अधिक होता. सगळयाच बाबतीत सगळेच खूप पूढे निघालो आहोत, ज्ञानात भर पडली आहे, 'अभि-अनु' ची पण खूप प्रगती झाली आहे, आमचा तिघांचा सतत प्रयत्न चालूच असतो त्यांना पूढे नेण्याचा. प्रयत्नाला यश पण मिळतेच आहे, आपल्या राष्ट्रभाषेला-हिंदी ला- जगात खूप पूढे नेण्याची इच्छा ठेवून आम्ही त्यात सतत व्यस्त असतो.
बघता बघता अभि-अनु चे सातव्या वर्षात पदार्पण झाले आहे. आता आम्हाला काम करायला वेळेची कमतरता भासू लागला आहे असेच म्हणा ना...एकदम खरी गोष्ट आहे हो ही.....
दीपिका जोशी 'संध्या'




दीपिका जोशी 'संध्या'

१८ जून २००६

नमस्कार...


हिंदी मराठी मधे लेखन सुरू करून ५ वर्ष झालीत। आधी याहू मधे हिंदी ब्लॉग बनवला...प्रयोग सुरू होतेच...दोन वर्षापुर्वी मराठी ब्लॉग तयार झाला. पण फारसे लिखाण तिथे झालेले नाहीये.

काही कारणास्तव मी माझे लिखाण इथे स्थलांतरित करते आहे। माझ्या लिखाणावर मला माझ्या मित्र-मैत्रिणींचा छान प्रतिसाद-प्रतिक्रिया, प्रोत्साहन, कौतुकाचे चार शब्द भरभरून मिळालेत.

ह्या स्थलांतरामधे त्या प्रतिक्रिया मी इथे फक्त त्यांच्या नांवापुढे त्यांच्याच भाषेत नमूद करतेय... तरी त्या सगळ्यांची माफी मागुन मी इथे पुढच्या नवीन लेखनाला पण सुरूवात करणार आहे...

तर भेटत राहू या....

दीपिका जोशी 'संध्या'