बुधवार, २६ जानेवारी, २०११

अविस्मरणीय दिवस...

२०१० सरले, नव्या कार्यकारी मंडळाच्या सान्निध्यात आता काय पर्वणी आहे ह्याची उत्सुकता होतीच. महाराष्ट्र मंडळाची साईट अधिकच सजली. पहिल्या आठवड्यात इमेल द्वारे कळले की २१ जानेवारी ला गजलसम्राट भीमराव पांचाळे येणार. सध्या त्यांच्या स्तुति करण्यात अख्खा महाराष्ट्र तल्लीन आहे. गेल्या वर्षी थेट अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र मंडळात पण त्यांनी आपल्या गजल गायनाने ज्यांची मने जिंकली आहेत त्यांना प्रत्यक्ष गजल गाताना बघायचा व ऐकायचा योग महाराष्ट्र मंडळाने आणला आहे ह्या कल्पनेतच आधी खुप सुखावलो होतो. मंडळाच्या साईटवर लगेच त्यांचा फोटो, त्यांच्याबद्दलचे निरनिराळ्या वर्तमानपत्रातील कौतुक झळकु लागले. कधी एकदा येणार २१ जानेवारी.... 

दुपारी ४ वाजता बरोबर कार्यक्रम सुरू होणार हे ठरले होते. (Early birds)  लवकर येणारं पाखरू ही स्पर्धा असल्यामुळे बर्‍यापैकी सगळे वेळेवर येणार आणि ठरल्याप्रमाणे संपूर्ण कार्यक्रमाचा आराखडा न गडबडण्यास ह्याची नक्कीच मदत होणार होती. आल्या आल्या आधी तासभर संक्रांतीचे हळदीकुंकू होते. पारंपारिक वेशभूषेच्या स्पर्धेमुळे अजुनच सगळीकडे नटणे-थटणे दिसत होते. ही स्पर्धी पुरुषांसाठी पण असल्यामुळे त्यांना पण प्रोत्साहन मिळाले आहे हे सगळ्यांकडे बघुन कळत होते. छान स्वागत, हळदीकुंकू, सौ. प्रज्ञा ने केलेली चविष्ट तीळगुळाची वडी, आकर्षक आणि उपयोगी वाण.. ह्या वेळी अजून एक वेगळी कल्पना होती ती जे एकटे पुरुष इथे आहेत त्यांना पण छोटीशी भेटवस्तु (वाण) दिली. मज्जाच होती. 
गरम गरम चहाचा आस्वाद घेऊन सगळे सभागृहाकडे वळत होते. 

मी आणि अश्विनी... पारंपारिक वेशभूषेचे परिक्षक म्हणुन..

मंच कार्यक्रमासाठी तयार होता. संक्रांतिचे प्रतीक असलेले...काळी साडी, हलव्याचे दागिने, तर्‍हे-तर्‍हेचे पतंग.. सगळ्या हॉलभर उडत होते. सजावट एकूणच लोभस आणि प्रसन्न मराठमोळी होती.


मंच आणि मंचावर जयश्री च्या सूत्रसंचालनासोबत भीमराव पांचाळे आणि त्यांचे सहकारी गजलगायनास तयार...

पारंपारिक वेशभूषेची एक झलक...

कार्यक्रमाला सुरुवात झाली ती जयश्री अंबासकर च्या मधूर लयबद्ध संचालनाने. सर्वप्रथम गणेशवंदना झाली.... अगदी ताला-सुरा-नृत्यावर. नव्या कार्यकारी समितीची ओळख, अध्यक्षांचे छोटे से भाषण झाले. त्यानंतर श्री. भीमराव पांचाळे, तबलावादक डॉ. श्री.देवेंद्र यादव व पेटीवर साथ देणारे श्री  जगदीश मिस्त्री, ह्यांची ओळख करून दिली गेली. श्री. पांचाळे ह्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. तिघेही स्थानापन्न होऊन गजलगायकीला प्रारंभ झाला. गजल गायन हा इथे अगदी नवीनच प्रयोग होता.

गजल हा काव्याचा प्रकार वाचण्यात सगळ्यांच्याच आला असणार पण तरी ही भीमरावांनी गजल थोडी अजून आमच्या जवळची करून दिली आणि सगळ्यांनाच त्यात आवड निर्माण केली. वेगवेगळ्या गजलकारांच्या गजला... भीमरावांचा आवाज... तबला व पेटी ची अप्रतिम साथ...मधे मधे जयश्री चे सुरेल गोड सूत्रसंचालन... अगदी मंत्रमुग्ध झालो. ‘’अंदाज आरशाचा...’’ पासून जी मैफिल मस्तं रंगली... ‘’तू चोर पावलांनी...’’, ‘’ख्वाब के जैसे झूठे मेरे यकीं निकले’’.. वा वा... रंगत रगंतच गेली. मराठी व उर्दू(हिंदी) ची सम्मिश्र गजलेने तर कहरच केला. रसिकांचा दिल खुश हो गया. दाद किती मिळावी.....हे सगळे कधी संपूच नये असे वाटत असून ३ तास संपलेतच. अविस्मरणीय अनुभव आहे हा.

बर्‍याच लोकांची इच्छा असणार व ते अनायसे एक दिवस अजून इथे राहणार होते तर रविवारी पुन्हा सुरेल मैफिलीचे आयोजन श्री. दिवेकर ह्यांच्या घरी केले. सगळेच गजलचे चाहते अति उत्साहात हजर होते. बहुतेक श्री भीमराव पांचाळे पण आज जरा ज्यास्तंच अफाट व कडक गजलांचा वर्षाव करण्याच्या तयारीने आले असावेत. 

तिथली रंगत कशी होती हे शब्दात सांगणे कठिण आहे. अगदी समोरासमोर बसून उर्दू गजलांचा आस्वाद घेणे... नशिबानेच घ्यावे लागते म्हणायला हरकत नाही. त्यांनी गजलगायकी मधे केलेले निरनिराळे यशस्वी प्रयोग अफलातून आहेत. गजल गाताना अर्थ कसे कसे बदलू शकतात हे सांगताना हशा पिकवला.  
मराठी गजलांमधे सुरेश भटांची... ‘’हा असा चंद्र....’’, संगीता जोशींची... ‘’आयुष्य तेच आहे....’’ अशी यादी तर बरीच मोठी आहे. उर्दू गजलांमधे... ‘’ठंडी हवा के झोंके...’’ वा वा... 

सहा सात आणि आठ मात्रांची खेळी कशी हे ‘’तू दिल्या जखमात मी हरवून गेलो...’’ ह्या गजलेत प्रयोग करून केली... तारीफ करत व टाळ्या वाsssssssजवतच राहीलो आम्ही.

रविवारी अशी रंगली पुन्हा एकदा मैफिल...

'आयुष्य तेच आहे.... ' वा वा.. काय सुंदर गजल..

कमाल आहे गजलकारांची आणि नंतर भीमराव पांचाळे सारख्या गजलगायकांची...
त्या सुखद क्षणांतुन.. त्या स्वप्नवत वाटणार्‍या गजल गायकीच्या सुरातुन बाहेर यावेसेच वाटत नाहीये. अजून तरी त्यातच मशगुल असल्यासारखे वाटतेय. पुन्हा कधी योग येईल ह्या सगळ्याचा ... पुन्हा पुन्हा यावा असे मनांत आहेच पण सध्या तरी आत्ता त्या मैफिलीतुन उठायची इच्छा नाहीये. त्यांनी गात रहावे व मैफिलीत गजलांचा सतत वर्षाव होत रहावा..... 

इतक्या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मंडळाचे प्रचंड धन्यवाद व आभार.

सगळ्या सभासदांच्या सहकार्याने पुढचे आपल्या ह्या महाराष्ट्र मंडळ रूपी कुटुंबाचे सम्मेलन उत्कृष्ट होईलच ह्यात शंका नाही.  

धन्यवाद.
अनेक शुभेच्छा !!