गुरुवार, ६ मे, २०१०

माझ्या बालपणीचा पहिला थांबा...

लेखन सुरू केल्यापासुन कधीचेच मनांत होते की लहानपणीच्या पण इतक्या छान छान घटना असतील ज्या पुन्हा उजळायला मज्जा येईल. तर आजच श्रीगणेशा करतेय... कुठे आणि कशा वळणावर ही माझी पावले थांबतील सांगता येत नाही... जे जे आठवेल ते ते च सही....

स्वतःची मदत स्वतःच केली पाहीजे ह्या वक्तव्यात किती सत्य आहे हे आज मी जाणते आहे. माझ्या स्वभावाचा असा एक पैलू प्रकर्षाने वयाच्या ह्या ५३ व्या वर्षात पोहोचल्यावर जाणवतो आहे. खंत नाही पण माझ्या ह्या लेखनांतुन कदाचित कोणाला त्याचे सहाय्य होऊ शकते. आजकाल खूप कार्यक्रम दूरचित्रवाणी वर येतात जे ज्ञानवर्धक आहेतच, मार्गदर्शक पण आहेत. परवा एका मैत्रिणीबरोबर फोनवर बोलतांना ती सहज म्हणली की आजकाल कुठले न कुठलेतरी तणांव आपल्या रोजनिशीमधे स्थान ग्रहण करून आहेत. त्यातुन थोडे दूर जायचे असेल.. मनःशांति शोधत असशील... काही कारणाने येणारी उदासी पळवायची असेल तर फक्त डोळे मिटून बस व जसे ध्यान करतो (मला कधीच ध्यान करणे जमले नाही. चंचल मनांस कसे ते जमावे.. ) तसे फक्त जेव्हढे शक्य आहे तितके खोल खोल बालपणांत डोकावून बघ. खूप हलके वाटते. नकळत आपल्या चेहर्‍यावर हसू उमटेल. व मन हलके नक्कीच होईल.

मी तसेच करून बघितले. खऱंच खूप छान वाटले. अर्थात आयुष्यात उलटी उलटी पावले टाकत माझ्या शाळेच्या दिवसांपर्यंत जाऊन एक थांबा आला. त्याला कारण तसेच आहे. सुरूवातीला जसे म्हंटले की स्वतःची मदत स्वतःच केली पाहीजे हे 'साम' टीवी वर बालाजी तांबे सांगत होते. त्यांचे बोलणे खूप छान वाटते. सगळ्यांतून जे आपल्याला आवडेल तेच घेणे असे माझे तत्व आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटेलच असे नाही... मग ते कोणीही कोणालाही सांगत असो. आमच्या लहानपणी नागपुर आकाशवाणीवर दर रविवारी मुलांसाठी एक कार्यक्रम येत असे. त्यात कुंदाताई आणि अरविंद मामा असे दोघे असत. त्यांची खऱी नांवे वेगळीच होती. पण आम्ही बालमंडळी त्याना ह्याच नांवाने जाणत होतो. दोघेही छान लाडिक-लाडिक आवाजात खूप गोड बोलत. एकदा मी कार्यक्रमाबद्दल पत्र लिहीले आणि त्यांना खूप भेटावेसे वाटते असे लिहीले होते. आवाजावरून दोघांची ही अशी प्रेमळ व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यासमोर होती. एका कार्यक्रमात माझ्या पत्राचा उल्लेख तर केला पण मला भेटण्याचे आश्वासन दिले नाही. त्या ७-८ वर्षाच्या वयात मी खूप हिरमुसले. ही गोष्ट लहानशी होती पण मनांत घर करून राहीली. ह्याचाच परिणाम की मला रेडिओ स्टेशनवर काम करावेसे वाटू लागले. तोपर्यंत माझ्या बारीक आवाजाची तारीफ ऐकून माझे (उंहं!! उंहं...!!) हे विचार पक्के होऊ लागले. एकदा आई बाबांना म्हंटले असेल बोलता बोलता... पण फारसे लक्ष दिले गेले नाही. मी ८-९वीत असतांना नागपुर रेडिओ स्टेशनसमोरून खूप चकरा मारत असे. पण उगीचच कोणी बरोबर असेल तर जाता येईल... ओफऽऽऽ त्या रेडिओ स्टेशनच्या आवारांत सायकल नेण्याची हिम्मत काही झाली नाही. गाणे शिकायचा, पेटी वाजवायला तरी यावी म्हणून तो पण प्रयत्न झाला. पण स्वप्न स्वप्नच राहीले. नंतर कॉलेज संपले, लग्न झाले, संसारात पडले. बाकी छंद खूप जोपासले. त्या गोष्टी मागे पडल्या. जे आहे त्यात आनंद मानून पुढचा प्रवास चालू आहे. आयुष्याच्या नवीन वळणांवर नवीन नवीन शिकतेच आहे. तरीही...... रेडिओवर आजकालच्या भाषेत जॉकी चे बोलणे ऐकले की नागपुर रेडिओ स्टेशन समोरची सायकलवरची मी आणि झी टीवी वर 'सारेगम' कार्यक्रम सुरू झाला की हातात गाण्याच्या क्लासची वही घेऊन जाणारी मी डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही.

पुढे पाऊल टाकण्यास थोडा विचार करणारा स्वभाव आणि त्या वेळी कदाचित मनाचा खंबीरपणा व ध्येय मजबूत करता आले नसेल पण किती खरे आहे नं की स्वतःची मदत स्वतःच करावी लागते. (जर्रासे उशीरा ध्यानी आले किंवा पटले ह्याला इलाज नाही..)

उलटी पावले टाकतांना ह्या थांब्यावर हे आठवले. अजून अशाच आठवणी खूप असतील त्या पुन्हा कधी...!!!!

दीपिका 'संध्या'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: