शनिवार, १७ एप्रिल, २०१०

विवाहबंधन वर्षगाठ... प्रेमाने भरलेले आशीश...

१२ एप्रिल चा दिवस उजा़डला आणि गेल्या वर्षीचे हे दिवस मी जगू लागले. रुचिर शिशिर १२ एप्रिलला भारतात आले होते. १५ एप्रिल २००९ ला लग्नं झाले दोघांचे व आपापल्या राण्यांना घेऊन २५ एप्रिल ला अमेरिकेला रवाना झालेत.

वर्ष कसे गेले खरंच कळलेच नाही. इंटरनेट मुळे सतत संपर्कात असल्यामुळे जरी दूर असले तरी वेबकॅम मुळे बघत होतो, माझ्या फिरक्यांनी त्यांना बेजार करणे माझे अगणित सुरू होते. बर्‍याच छान छान गोष्टी ह्या काळांत घडल्या... सुखावून गेल्यात. ऑगस्ट-सप्टेंबर मधे रुचिर-प्राची व शिशिर-लीनू ने आपापले मोठे बंगले घ्यायचे ठरवले... घेतलेत आणि ऑक्टोबर मधे वास्तुपूजा आणि दिवाळी साधून आम्ही अमेरिका गाठली व सगळेच एकमेकांना आनंद देऊन गेलो.

नोव्हेंबर मधे अजून एक खुशखबरी कानांवर आली आणि मी मुलींच्या प्रेमात वेडी पुन्हा एकदा जानेवारी मधे तीन आठवड्याची अमेरिकेची फेरी करून आले. आता काळजी व कौतुकाने हे दिवस सरताहेत. आनंदोत्सवाच्या स्वागताची तयारी सुरू झालीच आहे... व त्याच्या प्रतिक्षेत आम्ही सगळेच आहोत...

ह्या सगळ्यांत वर्ष संपले आणि पुन्हा १५ एप्रिल चा दिवस उजाडला पण २०१० चा... एक जोडी हवाई ला आणि दूसरी जोडी न्यूयार्क-वॉशिंग्टन फिरायला गेले आहेत.. धम्माल करताहेत. १५ एप्रिल ला फोन ने शुभेच्छा देऊन झाल्याच आहेत पण तरीही..अशा हौशी व उत्साहाने भरलेल्या माझ्या राजाबेट्यांसाठी व त्यांना पुरेपूर साथ देणार्‍या माझ्या मुलींसाठी माझे प्रेम ह्या भेटकार्डात व्यक्त केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: